Sunday, March 27, 2011

तीन दिलवाले + तीन दुल्हनियाँ = साडेतीन तास (मोहब्बतें)

 आदित्य चोप्राचा `दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' प्रदर्शित झाला तेव्हा त्या सिनेमानं हिंदीत एक नवा ट्रेन्ड आणला.
तोवरच्या बहुतांश प्रेमपटांमध्ये प्रेमिक आणि प्रेमाचे दुश्मन यांच्यातला संघर्ष तीव्र करून `दिलवाले' आपल्या `दुल्हनिया'ला जबरदस्तीने- समाजाशी, प्रसंगी तिच्याच कुटुंबयांशी दोन हात करून, पळवून नेताना दाखविले जात. `दिलवाले...'नं परिपक्व प्रेमाची फ्रेश कहाणी सांगितली. तिथला नायक प्रेमिकेला पळवून नेत नाही. तो तिच्या कुटुंबियांची मनं (भले फिल्मी सहजतेनं का होईना) जिंकून, त्यांच्या संमतीनं तिला आपली `दुल्हनिया' बनवतो.
फिल्मी प्रेमाकडे पाहण्याचा हा दृष्कोन निराळा होता, तसंच या सिनेमातलं अनिवासी भारतीयांचा दर्शनही अनोखं होतं. शिवाय, उत्तम पटकथा, सुरेख संवाद, सुरेल गाणी आणि दिग्दर्शकाची माध्यमाची जाणकार हाताळणी यांनी या सिनेमाला विक्रमी यश दिलं. अभ्यास करून, भरपूर मेहनतीनं पटकथा रचणाऱया या लेखक- दिग्दर्शकाच्या दुसऱया सिनेमाबद्दल अभूतपूर्व उत्सुकता निर्माण झाली.
आदित्यचा हा दुसरा सिनेमा- `मोहब्बतें' महत्त्वाकांक्षी आहे.
त्यात अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान हे सुपरस्टार आणि तरुण प्रेमिक साकारणारे सहा कलावंत (तीन जोडय़ा) आहेत. सिनेमावर मोठा खर्च करण्यात आला आहे. सिनेमांची लांबी वीस रिळांची- म्हणजे जवळपास साडेतीनहून अधिक तासांची आहे.
पण, ही महत्त्वाकांक्षा इथेच थांबते. `मोहब्बतें' हा `दिलवाले...'च्या तुलनेत भव्यपट ठरतो, पण गाभ्यात `दिलवाले...'च्या पुढे जाणारं काही मांडत नाही.
`मोहब्बतें'मध्ये वाढतं काय तर `दिलवाले' आणि `दुल्हनियाँ'ची संख्या आणि साहजिकच त्यांच्या स्वतंत्र प्रेमप्रकरणांची एकत्रित लांबी. बाकी याही सिनेमात प्रेमानं नफरतीवर `अहिंसक' मार्गानं मिळवलेला विजयच दिसतो.
या प्रेमकहाण्या आकार घेतात नारायणपूर या गावातील `गुरुकुल' या एका (भारतातल्या महाप्रख्यात वगैरे) कॉलेजात. इथे प्रवेश मिळणंच प्रतिष्ठेचे असतं. या कॉलेजचा प्राचार्य आणि सर्वेसर्वा असतो नारायण शंकर (अमिताभ बच्चन) हा खत्रुड म्हातारा. या कॉलेजमध्ये शिस्त कडक आणि कुणालाही प्रेमात पडायला बंदी. माणूस प्रेमात पडला की अकारण गुंते वाढवून ठेवतो; प्रेमातून वेदना आणि कमकुवतपणाखेरीज काहीच निर्माण होत नाही, हे नारायण शंकरचं ठाम मत.
त्याच्या या कॉलेजात विकी (उदय चोप्रा), समीर (जुगल हंसराज) आणि करण (जिम्मी शेरगिल) हे तीन नवयुवक प्रवेश घेतात. या कॉलेजात `लव्हॉलॉजी' किंवा तित्सम विषयाचीच पदवी मिळते, अशा गैरसमजुतीनंच हे तिघे या कॉलेजात येतात की काय, देव जाणे! कारण ते कोणत्याही क्षणी अभ्यास करताना दिसत नाहीत, `आज फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला काय बोंब झाली' छापाची विद्यार्थीवर्गाला साजेशी चर्चा करताना दिसत नाहीत. त्यांना एकमेकांव्यतिरिक्त कोणी मित्र नसतात आणि प्रेमाव्यतिरिक्त काही उद्योग नसतो.
कॉलेजात आल्याबरोब्बर हे तिघे साधारम एकाच सुमाराला (पण सुदैवानं तीन वेगवेगळ्या मुलींच्या) प्रेमात पडतात. विकीला भेटते बडय़ा घरची बिगडी बेटी इशिका (शमिता शेट्टी). समीर लहानपणापासून जिच्यावर एकतर्फी प्रेम करत असतो ती संजना (किम शर्मा) त्याला याच गावात भेटते. आणि रेल्वे स्टेशनवर दिसलेल्या किरणमध्ये (प्रिती झांगियानी) प्रथमदर्शनातच करणचा जीव गुंततो.
नारायण शंकरच्या कठोर शिस्तीचा भंग करून आपापली प्रेमकहाणी सुफळ- संपुर्ण कशी करायची या विवंचनेत असलेल्या या त्रिकुटाला राज आर्यनच्या (शाहरूख खान) रुपानं देवदूतच भेटतो
हा व्हायोलिनधारी मूर्तिमंत- अंतर्बाह्य प्रेमस्वरूप संगीतशिक्षक गुरुकुलात येतो. गुरुकुलाची पंचवीस वर्षांची परंपरा मोडून नारायण शंकर त्याला नोकरी देतो. संगीताच्या जादूनं तो विद्यार्थ्यांना आपलंसं करतो आणि त्यांच्यातले प्रेमवीर अचूक हेरतो. या प्रेमवीरांना वेळोवेळी गुरुकुलाचे सगळे नियम, सगळी शिस्त धाब्यावर मारून प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची `प्रेरणा' तो देत राहतो, जमेल ती सगळी मदत करतो, अडीअडचणीला त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहतो.
संगीताच्या मिषानं प्रेमाचं, बंडखोरीचं शिक्षण हा राज आर्यन का बरे देत असतो?
कारण हा राज आर्यन म्हणजेच राज मल्होत्रा असतो. गुरुकुलाचा माजी विद्यार्थी. खुद्द नारायण शंकरच्याच मुलीवर (ऐश्वर्या राय) प्रेम करण्याचं, तिला प्रेमात पाडण्याचं धाडस त्यानं केलेलं असतं. त्याबद्दल नारायण शंकरनं त्याचा चेहराही न पाहता, कोणताही खुलासा करण्याची संधी न देता त्याला गुरुकुलातून हुसकावून लावलेलं असतं. आपला पाषाणहृदयी बाप कधीही द्रवणार नाही, आपलं प्रेम कधीही सफल होणार नाही, याची खात्री पटलेल्या त्याच्या मुलीनं आत्महत्या केलेली असते.
आता तोच राज आर्यन, नारायण शंकरला आपली `ओळख' न देता त्याच्या गुरुकुलातल्या नफरतीच्या, प्रेमद्वेषाच्या साम्राज्याला सुरुंग लावायला आलेला असतो.
हा संघर्ष कसा घडतो, वाढतो, त्याची परिणती प्रेमाच्या विजयात कशी होते याची लंबीचवडी कहाणी म्हणजे `मोहब्बतें' हा सिनेमा.
कथा- पटकथा- संवाद- दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी पेलणाऱया आदित्य चोप्राला या चारही अंगांचं ज्ञान आणि समज आहे, याची खूण `मोहब्बतें'मध्ये दिसते. लेखक म्हणून आठ प्रमुख पात्रांना न्याय देणारी, त्यांचे ताणेबाणे एकमेकांमध्ये चलाखीनं गुंफणारी मांडणी त्यानं केलेली आहे. यात त्याची अभ्यासू आणि मेहनती वृत्ती दिसते. त्यानं तीन प्रेमकहाण्या मांडताना त्यातल्या सहा तरुण- तरुणींच्या व्यक्तिरेखाही अतिशय स्पष्टपणे रेखाटल्या आहेत. या तीनही जोडय़ा वेगवेगळ्या जातकुळीच्या, वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या. त्यांची प्रेमप्रकरणंही एकमेकांपेक्षा अगदी वेगळी.
आधी नफरत किंवा प्रेमाला स्कोपच नसलेली सिच्युएशन आणि त्यातून हळुहळू आपल्या प्रेमवीरांनी फुलवलेलं प्रेम असा साधारण तीनही प्रेमकथांचा प्रवास आहे. पण, त्याव्यतिरिक्तची मांडणी अगदी वेगवेगळी आहे. शिवाय या तीनही प्रेमकथांच्या सुरुवातीला भला मोठा अडसर येतो.  
गर्विष्ठ इशिकाला विकीचा चेहरासुद्धा नजरेसमोर नको असतो ती त्याचा द्वेष करते. संजनाच्या लेखी समीर हा केवळ छान मित्र असतो, कारण तिचा बॉयफ्रेंड कुणी वेगळाच असतो. सगळ्यात पंचाईत असते ती करणची. कारण, किरण ही चक्क विवाहिता असते. तिचा सैनिक नवरा लग्न होताक्षणी (म्हणजे `सुहागरात' होण्यापूर्वी, फिल्मी प्रेमात ही `अक्षता' महत्त्वाची) युद्धावर रवाना होऊन तिकडेच मरण पावलेला असतो. पण मुलाच्या मृत्यूचा स्वीकार करू न धजणाऱया तिच्या सासऱयानं तिला अखंड सौभाग्यवती बनवून ठेवलेलं असतं.
यातली प्रत्येक सिच्युएशन अगदी `इम्पॉसिबल'आहे, अशी प्रेक्षकांची समजूत करून द्यायची आणि त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत त्यालाही गुंतवून घ्यायचं, ही मुख्य जबाबदारी पटकथाकार म्हणून आदित्य उत्तम पार पाडतो. प्रेमाच्या या उलघालींमध्ये उलझल्यामुळेच प्रेक्षक पावणेचार तासांचा हा प्रवास फारसा न कंटाळता पार पाडू शकतो. राजच्या मनात राहणारी आणि त्याच्या वाटचालीत सदैव त्याच्या साथीला येणारी अदृश्य प्रेयसी दाखवण्याची नेहमीची यशस्वी हळवी कल्पनाही त्यानं चपखल वापरून घेतली आहे. त्यामुळे, राजच्या सगळ्या कृत्यांना वजन येतं.
पण, हाच पटकथाकार नारायण शंकर आणि राज आर्यन यांच्यातला संघर्ष रेखाटताना फार कमी पडतो. म्हणजे बाह्यत: त्यांचे स्वभाव रेखाटणं, त्यानुसार त्यांच्यातली खडाजंगी किंवा शीतयुद्ध रचणं, चटकदार, मर्मग्राही संवादांच्या फैरी झडवणं वगैरे नैमित्तिक जबाबदाऱया तो चोख पार पडतो. पण, हा संघर्ष तकलादू आणि बिनबुडाचा आहे, हे काही काही केल्या लपत नाही. याला कारण नारायण शंकरची धूसर व्यक्तिरेखा. त्याचं मितभाषी असणं त्याच्या व्यक्तिरेखेला साजून `दिसणारं', ती प्रभावी करणारं आहे, पण फार वरवरच्या पातळीवर. प्रेमाबद्दल इतकी तीव्र द्वेषभावना त्याच्या मनात का आहे, याचं काही स्पष्टीकरण त्याच्या वर्तनातून मिळत नाही. त्याचं त्याच्या मुलीशी असलेलं नातं ममत्त्वाचं आहे. अशा वेळी तिचं प्रेम- तिला आत्महत्या करण्यावाचून दुसरा मार्गच उरू नये एवढं- असफल होणं हे पटत नाही. आणि इतका एकांगी- हट्टी नारायण शंकर पुढे राज आर्यनला गुरुकुलात नोकरी देतो
`मला कोणत्याही पद्धतीचं परिवर्तन पसंत नाही', असं एकीकडे बोलतो आणि दुसरीकडे राज आर्यननं घडवून आणलेला प्रत्येक बदल कुरकूर करत- पण, कोणतीही मोठी कारवाई न करता स्वीकारतो. हे तर अनाकलनीयच आहे. राज आर्यनची `ओळख' लपवण्यासाठी केलेली कारागिरीही सतत जाणवते, खटकते.
शिवाय या भल्यामोठय़ा कॉलेजात जेमतेम शेपाचशे विद्यार्थी दिसतात, तेही बिनचेहऱयाचे. त्यांच्यातल्या घडामोडी, अन्य शिक्षकवर्ग वगैरे काहीच कुठेच दिसत नाही. गुरुकुल हे परदेशातलं लोकेशन आहे हे चटकन लक्षात येतं. गुरुकुलाबाहेरच्या गावातला अनुपम खेर आणि अर्चना पूरणसिंग यांच्या अधेड प्रेमाचा ट्रक सर्वस्वी अनावश्यक वाटतो. आणि तो अगदी पाचकळ विनोदीही आहे.
दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा `ओल्ड स्कूल'चा विद्यार्थी आहे. मोठे, तपशीलसमृद्ध प्रसंग, त्यांच्या चित्रणासाठी रचलेले दीर्घ, भव्यतादर्शक शॉट, त्यांतील कॅमेऱयाच्या संथ हालचाली, कलाकारांकडून नेमकी आणि अव्वल कामगिरी करून घेण्याचा आग्रह हे या `शाळे'चे गुण त्याच्यात दिसतात. त्याच्या गाण्यांच्या चित्रणातही वैविध्य आणि गाण्यातून कथा पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो. एरवी `दिल तो पागल है' आणि `दिलवाले दुल्हनिया' या यशस्वी चोप्रापटांची छाप असलेलं, स्वतंत्रपणे ऐकताना अतिशय रिपिटिटिव्ह वाटणारं जतीन- ललितचं संगीत या टेकिंगमुळे थिएटरात श्रवणीयही होऊन जातं. `हम को हमीसे चुरा लो', `चलते चलते युँही', `आँखे खुली हो या हो बंद' आणि `हम तेरे दीवाने है' ही गाणी सिनेमात मुरून गेली आहेत. थीम म्युझिक म्हणून रचलेल्या संगीताच्या तुकडय़ावर सर्व प्रेमप्रकरणांचं सुफळ, संपूर्ण होणंही झकास चित्रित झालंय.
अमिताभ बच्चनचा नारायण शंकर पटकथाकारानं त्याच्यावर लादलेल्या सर्व मर्यादांतही प्रभावी होतो. या भूमिकेला काही तर्काधार असता तर ही कामगिरी अधिक प्रभावी झाली असती. सर्व नवोदित जोडय़ाही या सिनेमात सहज सफाईने वावरल्या आहेत. त्यांत, (भावमारू रोल मिळाल्यामुळे आणि त्या रोलला न्याय देण्याची कुवत असल्यामुळे) उदय चोप्राचा विकी लक्षात राहतो. त्याची स्वाभाविक विनोदनिर्मिती धमाल मजा आणते.
शाहरूखचा राज आर्यन हा `मोहब्बतें'चा कणा आहे. प्रेमपागल हिरोच्या बऱयाचशा छटा दाखवल्यानंतरही तो राज आर्यनला ताज्या उत्साहानं सामोरा जातो. नारायण शंकरच्या तुलनेत अधिक सहानुभूतीखेचक भूमिकेचा फायदा त्याला मिळाला आहे. पण, प्रेमाचं (ऐकायला, सिनेमात पाहायला) फार आकर्षक भासणारं तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. अमिताभबरोबरच्या संघर्षाच्या प्रसंगात त्याच्या नॉर्मल बोलण्याआड नारायण शंकरबद्दलची अतिशय संयमित शिसारी जाणवत राहते. अशा काही खास जागा त्याच्या परफॉर्मन्समध्ये जाणवत राहतात.
मनमोहन सिग यांचं छायालेखन, फरहा खानचं नृत्यदिग्दर्शन आदी तांत्रिक बाजू भव्य नेटक्या निर्मितीच्या जबाबदाऱया पार पाडतात.
एकूणात, साडेतीन तासांची ही प्रदीर्घ प्रेमगाथा `दिलवाले...'च्या तुलनेत फिकी आहे. ती अर्ध्या-पाऊण तासाने कमी असती तर...? असा प्रश्न सिनेमा पाहताना कायम मनात येत राहतो. पण, संपूर्ण सिनेमा पाहवतो. चोप्रा मंडळीकृत प्रेमपटांचं अगदी अजीर्णच झालं नसेल तर `मोहब्बतें' पाहायला हरकत नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment