Wednesday, February 8, 2012

दिग्दर्शक नवा; सिनेमा जुनाच (लावारिस)


एखादा नवा दिग्दर्शक जेव्हा आपला पहिलाच सिनेमा प्रेक्षकांपुढे आणतो, तेव्हा सिनेमाररिकांमध्ये त्याच्याबद्दल एक स्वागतशील उत्सुकता असते. कारण, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी तो कथानकापासून हाताळणीपर्यंत कशात ना कशात, काही ना काही ताजे देईल, अशी अपेक्षा असते.
 दुर्दैवानं श्रीकांत आर. शर्मा या नव्या दिग्दर्शकाचा पहिलावहिला `लावारिस' या निकषांवर कमालीचा अपेक्षाभंग करतो. रस्त्यावर मवालीगिरी करीत वाढलेल्या एका अनौरस तरुणाच्या आयुष्यात एका सज्जन लढाऊ वकिलाच्या भेटीमुळे घडणाऱया परिवर्तनाची ही कथा `मशाल', `अंकुश'पासून गेल्या वर्षीच्या `गुलाम'पर्यंतच्या अनेक सिनेमांमध्ये येऊन गेली आहे. वर उल्लेखलेल्या प्रत्येक सिनेमात कथानकाचा गाभा तोच असला, तरी त्या-त्या काळात वेगळ्या ठरलेल्या, तत्कालीन वास्तवाशी नाते सांगणाऱया मांडणीमुळे हे सिनेमे लक्षवेधी ठरले होते. अशा प्रकारचं कोणतंही `पोटेन्शियल' नसलेली, सलीम-जावेदची `उरवळ' वाटावी अशी हनी इराणीची ही कथा-पटकथा दिग्दर्शकानं पहिल्या सिनेमासाठी का निवडली असावी, हे आश्चर्यच आहे.
  कॅप्टनदादा (अक्षय खन्ना) आणि त्याचे मवाली मित्र एका वस्तीत कालरा (गोविंद नामदेव) या गुंडासाठी हप्तावसुलीचं काम करतात. तिथे राहायला आलेला वकील आनंद सक्सेना (जॅकी श्रॉफ) आणि त्याची पत्नी कविता (डिम्पल) त्यांच्या दादागिरीला जुमानत नाहीत. कॅप्टन आणि गँगशी आनंद तर्ककठोरपणे वागतो, तर कविता मात्र कॅप्टनच्या व्यथावेदना समजून घेणारी मोठी बहीण, मैत्रीण बनू पाहते. त्यातच, आनंदची सहायिका अंशू (मनीषा कोईराला) कॅप्टनच्या प्रेमात पडते. तिच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी कॅप्टन स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करतो. हे कालराला रुचत नाही. त्यात अंशू ही कालराची संगनमत केलेल्या पोलिस कमिशनरची पुतणी असते. त्यातून उद्भवलेल्या संघर्षातून भरपूर गोळीबार, रक्तपात घडून अखेरीस नायक-नायिका एकत्र येतात.
  आनंद-कविता यांचा कॅप्टनला `हीरो' मानणारा चुणचुणीत छोकरा, हॉस्पिटलच्या आवारात एकमेकांच्या नकळत एकाच पेशंटला भेटायला येणाऱया कॅप्टन-अंशूमधील प्रेमप्रकरण, कॅप्टन आणि त्याच्या मित्रांमधल्या गमतीशीर उखाळ्यापाखाळ्या यातून सिनेमाचा पूर्वार्ध `रुटीन' असला, तरी सुसह्य होतो. मात्र, उत्तरार्धात त्यावर बोळा फिरतो आणि प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा कडेलोट करणाऱया सहनशक्तीचा कडेलोट करणाऱया रक्तरंजित प्रसंगांची मालिका सुरू होते.
 नायकाला पोतंभर गोळ्या झाडून आणि गॅलनभर रक्त गाठूनच सन्मार्ग गाठायचा होता, तर आधीची मतपरिवर्तनाची व्यर्थ भाषणबाजी केली कशाला, असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. कमलेश पांडे यांचे संवाद अधूनमधून पिटातल्या टाळ्या-शिटय़ा मिळवतात. क्वचित्प्रसंगी (उदा. नायक आपण सामूहिक बलात्काराचं अपत्य आहोत, हे सांगतो तेव्हा) बाल्कनीतल्या संवेदनांना धक्काही देतात. पण, त्यात गांभीर्याऐवजी सनसनाटीबाजपणाच अधिक आहे.
  कला-दिग्दर्शक आर. वर्मन यांनी सिनेमासाठी बस्तीचा मोठा सेट लावला आहे, तोही अतिशय फिल्मी पद्धतीचा, डुगडुगता. नजीब खान यांनी या सेटवर चित्रण करताना त्यातील कृत्रिमता झाकणारे कोन किंवा दृश्याकार निवडलेले नाहीत. बस्तीमधले जीवनव्यवहार दर्शविणाऱया दुय्यम कलावंतांच्या हालचाली आणि एकूण वावर साचेबद्ध असल्याने सिनेमाचा `खोटे'पणा सतत नजरेला खुपत राहतो. दिग्दर्शक श्रीकांत शर्मा यांनी व्याकरणशुद्ध आणि (तांत्रिकदृष्टय़ा) सफाईदार चित्रण केले असले, तरी अनेक प्रसंगांत पात्रांचे बोलणे आणि पात्रांचे `ऐकणे' यांच्यातील मेळ नीट साधला न गेल्याने प्रसंगाचा एकसंध परिणाम घडत नाही. संकलक आर. राजेन्द्रन यांनीही या कामी अधिक मेहनत घ्यायला हवी होती.
   सर्व कलावंतांचा ठीकठाक अभिनय ही `लावारिस'ची त्यातल्या त्यात बरी बाजू. अक्षय खन्नाचा चॉकलेटी चेहरा आणि बेतास बात शरीरयष्टी पाहता तो कॅप्टन`दाद' बनण्यास सर्वथैव अयोग्य होता. त्याच्या चेहऱयाला आणि शरीरभाषेला वळण देऊन राकट कॅप्टनदादा घडला असता, तर कदाचित `लावारिस' किमान प्रेक्षणीय झाला असता. पण, लेखक-दिग्दर्शकांनी अक्षयची गुणवत्ता कसाला लावून त्याला कॅप्टन बनवण्याऐवजी कॅप्टनचं पात्रच वळवून-वाकवून अक्षय खन्ना बनवलंय. अक्षयचा कालराकडून होणारा `चिकना' असा उल्लेख, कविताने त्याचं हसू लहान मुलासारखं आहे असं सांगणं, यातून लेखक-दिग्दर्शकांची `शॉर्ट-कट'ची हौस दिसून येते. मुळात `दादा' म्हणून `टेरर'न वाटणाऱया अक्षयमधलं परिवर्तन त्यामुळेच रंगत नाही. पांढऱया-पांढऱयाचा `कॉन्ट्रास्ट' कसा प्रभावी होईल?
  तरीही अक्षयमधली नैसर्गिक गुणवत्ता त्याचा पडद्यावरील वावर सुखद बनविते. त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर लेखक-दिग्दर्शकांना सावरून घेतो. पण, अलीकडचे त्याचे सिनेमे पाहता आपली अभिनशक्ती तो इतरांना सावरण्यातच वाया घालवून टाकेल, अशी भीती वाटू लागली आहे. जॅकी श्रॉफची समंजस आणि तडफदार `बडे भय्या' साकारण्यात `मास्टरी' आहे. इथेही तो तेच सफाईने करतो. डिम्पलची भाषणबाज दीदी नेहमीचा आक्रस्ताळा आरडाओरडा करीत नाही, हे आपलं सद्भाग्यच. ती कसर गोविंद नामदेव भरून काढतो. या गुणी कलावंतानं कालरा साकारताना स्वत:च्याच भूमिकेची- `सत्या'मधील भाऊची नक्कल मारावी, हे क्लेशकारक आहे.  
 मनीषा कोईरालाची असल्या सजावटीच्या भूमिकांसाठीची `नभिनया'ची खास शैली आहे. ती (समोर अक्षय असल्यामुळे की काय?) तिने `लावारिस'मध्ये वापरलेली नाही, हेच पुष्कळ. मात्र, तिची संवादफेक अशा भूमिकांमुळे इतकी वेगवान आणि सदोष का होते, हे समजत नाही.
  राजेश रोशनच्या संगीताचा एक साचा ठरलेला आहे. त्याच्या कोणत्याही सिनेमात एक ठेकेबाज गोड युगुलगीत (इथे `आ कहीं दूर चले जाये हम'), एक प्रयोगशील संथ लयीचं गाणं (इथे `मेरे दोस्तों मुझे आजकल') आणि एक पाश्चात्य चालीवरून थेट उचललेलं गाणे (इथे `ऍक्वा'च्या बार्बी गर्ल'वर बेतलेलं `तुमने जो कहा') आणि बाकीची अदखलपात्र गाणी असतातच. इथे गीतकार जावेद अख्तर असल्याने गाण्यांचे शब्द अर्थवाही आहेत, पण गाण्यांच्या `सिच्युएशन' आणि `टेकिंग'मध्ये कणमात्र नाविन्य नाही.  
जुन्या `लावारिस'मधल्या `अपनी तो जैसे तैसे'ची सुमार नक्कल करणारे `तुम जो फिरते हो लंबी कारों में' हे गाणं तर सिनेमातून पूर्ण कापण्याच्या पात्रतेचे आहे. यात सुनीता रावचा `स्पेशल अपिअरन्स' अगदी फुसका झाला आहे. `आ कहीं दूर चले जाये हम' हे सिनेमातलं सर्वाधिक लोकप्रिय गाणं ऐन क्लायमॅक्सच्या `मारो- काटो'च्या गदारोळात घातल्याने वाया गेलं आहे.
  एकूणात, या `लावारिस'वर प्रेक्षकांकडूनही वात्सल्याचा वर्षाव होणं कठीण आहे.

Tuesday, February 7, 2012

बेताल आणि बेतोल (तराजू)


विमलकुमारांचं सगळंच गणित चुकलंय यावेळी!
 एकतर त्यांनी `फ्रेश' मालाच्या बाजारपेठेत चोरबाजारातल्या जुन्या, पुराण्या, भंगार मालाचं दुकान लावलंय. त्यात `तराजू'च्या एका पारडय़ात प्रेक्षकांच्या सिनेमाकडून असणाऱया भरभक्कम अपेक्षा टाकल्या; दुसऱया पारडय़ात अक्षयकुमार, सोनाली बेंद्रे आणि स्वत: विमलकुमार असला हलका माल भरला. आता हे पारडं झुकणार कसं आणि समतोल साधणार कसा?
  `तराजू'मध्ये विमलकुमार तीच ती धिसीपिटी कहाणी सांगतात, पाप-पुण्याची. एका पारडय़ात पुण्य म्हणजे हीरो आणि मंडळी; दुसऱयात पाप म्हणजे व्हिलन आणि त्याचा गोतावळा. मध्यंतराआधी पापाचं पारडं जड झाल्यासारखं भासणार, मध्यंतरानंतर पुण्य पापाला झुकणार आणि पुण्याचा, सत्याचा, सत्प्रवृत्तीचा जय होणार, हे सांगायला `तराजू' कशाला तोलायला हवा?
 इथे पुण्यात्मा आहे राम यादव (अक्षयकुमार) हा पोलिस अधिकारी. त्याच्या पारडय़ात आहे त्याचा भाऊ राज (अनिल धवन), वहिनी शकुन्तला (शशी शर्मा) आणि प्रेमिका पूजा (सोनाली बेंद्रे).
  पापाच्या पारडय़ात अप्पा राव (अमरिश पुरी) हा दुरात्मा, त्याचा मुलगा जनार्दन (मोहनीश बहल) आणि खलनायकांची टोळी आहे. इन्स्पेक्टर राम अप्पा रावचे काळे धंदे रोखण्याचा प्रयत्न करतो. अप्पाला सामील असलेल्या आपल्याच सहकारी इन्स्पेक्टरचा (तेज सप्रू) अक्कल हुशारीनं खात्मा करतो.
  वाया गेलेल्या जनार्दनला रामनं गजाआड डांबल्यानंतर त्याच्या आईसमान गर्भवती वहिनीची त्याच्या डोळ्यादेखत हत्या केली जाते. पुराव्याअभावी अप्पा राव निर्देष सुटल्यावर राम त्याच्यावर गोळीबार करतो. बरोबरचे पोलिस अधिकारी पिसाटलेल्या रामवर गोळ्यांची बरसात करतात.
  रामला उपचारांसाठी डॉक्टरखान हिंदुस्थानीच्या (कादर खान) दवाखान्यात दाखल करतात. रामवरचा अन्याय लक्षात घेऊन डॉक्टर राम कोमात असल्याची बतावणी करतो. दरम्यान, रामच्या भावाचीही हत्या झालेली असते. राम मग रुद्रावतार धारण करून एकेका खलनायकाचा नि:पात करतो. क्लायमॅक्सला तो अप्पा रावला विजयादशमी मेळाव्यात रावणासोबत जाळून टाकतो.
असली ही कोणतंही नावीन्य नसलेली कथा खुलवण्यासाठी विमलकुमारांनी `इनोदा'चा आधार घेतला आहे. मध्यंतरापर्यंत राम आणि पूजा यांचं प्रेमप्रकरणच रंगवलं आहे. पूजानं रामच्या प्रेमात पडल्यावर त्याला गटवण्यासाठी केलेल्या युक्त्याप्रयुक्त्यांचा भाग माफक रंजन करून जातो. पण, त्याला बीभत्सतेचा, द्व्यर्थी, अश्लील विनोदाचं हिणकस गालबोट लावून विमलकुमारांनी `तराजू'मधल्या त्यातल्या त्यात बघणीय प्रसंगांची वाट लावून टाकली आहे.
  रामच्या प्रेमात पडल्यावर पूजा आपल्या सख्यांच्या मदतीने त्याला एका उद्ध्वस्त इमारतीत बोलावते. तिच्या ढालगज सख्या रामचा `विनयभंग' करण्याचा प्रयत्न करतात. तेवढय़ात ती `हीरो'च्या थाटात प्रवेशून गुंड मुलींना चोप देऊन पळवून लावते आणि `राम'ची `इज्जत' वाचवते, हा प्रसंग नेहमीच्या हीरोनं हिरोइनला वाचवण्याच्या प्रसंगांचं झकास विडंबन करतो. पण त्यातही बटबटीत हाताळणी करून विमलकुमारांनी मजा घालवलीये.
  रामला गटवण्यासाठी त्याच्या घरात मोलकरीण बनून घुसलेल्या पूजानं त्याच्या वहिनीला गरोदरपणाचं रहस्य विचारणं, रातांधळेपणाचं नाटक करून राम आंघोळ करत असताना बाथरूममध्ये घुसणं आणि नंतर स्वत: गरोदर असल्याचं नाटक करणं, हा सगळाच भाग ओंगळवाणा, शिसारी आणणारा.
  विमलकुमारांनी अभिरुचीहीनतेचा कळस गाठलाय `सू सू सू आ गया मै क्या करूं' या गाण्यात. लघुशंका उरकण्याची घाई व्यक्त करणाऱया (गाणी आता काय काय व्यक्त करू लागलीयेत पाहा!) या गाण्यात त्यांनी शाळकरी मुलांकडून जे काही हावभाव करून घेतलेत ते पाहिल्यावर या मुलांच्या आईबापांचीही मान शरमेनं झुकावी. आतापर्यंत हिंदी सिनेमातल्या गाण्यांमधली विकृती समूहनर्तकांना सूचक उत्तेजक हावभाव करायला लावण्यापर्यंत मर्यादित होती. आता निरागस मुलांना अंतर्वस्रांमध्ये नाचवून विमलकुमारांनी या विकृतीला वेगळं परिमाण मिळवून दिलंय.
  `बँडिट क्वीन' किंवा `कामसूत्र'सारख्या सिनेमांमध्ये कथानकाशी सुसंगत, प्रगल्भ `ऍडल्ट' भावनांचा आविष्कार दिसल्याबरोबर कापायला धावणारी सेन्सॉरची कात्री हे गाणं आणि `तराजू'मधले इतर ओंगळ प्रसंग संमत करताना कोणत्या कोपऱयात गंजून पडली होती देव जाणे! वडिलांच्या (रोशन) परंपरेतलं कर्णमधुर संगीत देण्याबद्दल प्रसिद्ध असणाऱया राजेश रोशन यांच्या कारकीर्दीवरचा `सू सू सू'हा मोठा `डाग' ठरणार आहे. गीतकार समीरनं त्याच्या `खटिया' परंपरेचंच पालन केलं आहे, त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
 उत्तरार्धात नायकानं खलनायकाचा सूड घेण्याचा भागही नीरस, नाविन्यहीन आणि निर्बुद्ध पद्धतीनं चित्रित करून विमलकुमारांनी `तराजू'मध्ये पाहण्यासारखं काहीच राहणार नाही, याची खातरजमा करून घेतली आहे.
  अक्षयकुमार हा मूलत: दगडी ऍक्शन हीरो. `तराजू'ची थरारदृश्य, विशेषत: धावत्या मोटारींच्या टपावरून धावण्याचा प्रसंग त्यानं उत्तम वठवला आहे. विनोदी प्रसंगांमध्येही त्यानं सहज वावरण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय, पण त्यानं कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या चेहऱयावर भाव उमटत नाहीत, उमटले तर चेहरा विलक्षण वेडावाकडा होतो आणि तेही समजून घेतलं तरी (जितेंद्रला नव्हतं आपण समजून घेतलं?' त्याच्या संवादातले भाव त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. डोळे निर्जीव राहतात. शिवाय अक्षयला चांगल्या आवाजाचीही साथ नाही.
  असल्या सिनेमात नायिकेला फारसं काम नसतं. सुदैवानं सोनालीला पूर्वार्धात बऱयापैकी वाव मिळालाय, पण बागेत फिरायला आल्यासारखं कॅमेऱयासमोर वावरलं की झाला सहज वावर, अशी समजूत तिनं करून घेतलीये. खलनायकाला गंडवण्यासाठी मराठी घाटणीचं सोंग वठवण्याच्या प्रसंगात तिला धमाल उडवता आली असती, पण या प्रसंगात एक मराठी वाक्य तिनं इतक्या अमराठी ढंगात उचारलंय की, ही `बेंद्रे'च ना, अशी शंका येते.
  अमरिश पुरींनी अप्पा राव साकारताना `इन्स्पेक्टर गारु' वगैरे दक्षिणी शब्दप्रयोग करून वैविध्य आणण्याचा प्रयत्न केलाय, पण तो तोकडा पडतो. .. . कादर खान महाराजांची थबथबलेल्या स्वरातली देशभक्तीपर भाषणबाजी उबग आणते.
  राजेश रोशनने शॅगीच्या `समरटाईम'ची उचलेगिरी करून (एकाच सिनेमातला हा दुसरा अपराध) बनवलेलं `हसीना गोरी गोरी' हे गाणं ऐकण्यासारखं जमलंय अहमद खाननं त्याचं एम टीव्ही स्टाईल चित्रण केलंय. पण हे गाणं पाहण्यासाठी `तराजू' पाहावा अशा दर्जाचं काही हे गाणं नाही बहुतेकांनी टीव्हीवर हजार वेळा ते पाहिलेलं आहेच.
 काढून काढून विमलकुमारांना `तराजू'च काढायचा होता तर त्यांनी निदान आपल्या पारडय़ात अक्षयऐवजी त्यांच्या फेवरिट `वजनदार' गोविंदाला तरी घ्यायचा होता. तो असता तर काटा मारून का होईना, किमान बोहनी तरी झाली असती.
...........................................................................
          तराजू
निर्माता - विनोद मल्होत्रा
दिग्दर्शक - विमलकुमार
संगीतकार - राजेश रोशन
कलाकार - अक्षयकुमार, सोनाली बेंद्रे, अमरिश पुरी, मोहनीश बहल, कादर खान, रणजीत, राकेश बेदी, टिकू तलसानिया, दिनेश हिंगू.
....................................

विशुद्ध बिनडोकबाजी (मिस्टर अँड मिसेस खिलाडी)


मनमोहन देसाईना `मूर्खशिरोमणी' म्हटलं जाई. ही पदवी देणाऱयांचा सूर कदाचित हेटाळणीचा असेलही; पण तिनं देसाचा गोरवच केला होता.
 कॅमेऱयाचा माध्यमातून पडद्यावर काय घडवायचं, याचा सर्वाधिकार एकदा दिग्दर्शकाकडे सोपवल्यानंतर त्याला मूर्खपणा घडवायचं स्वातंत्रही द्यायला हवं. प्रेक्षकानं इतकंच पाहायचं की, पडद्यावर साकारलेला मूर्खपणा किती अस्सल आहे? किती मनोरंजक आहे?
  आणि मनजींच्या `नशीब'पर्यंतच्या सर्वच सिनेमांनी घसघशीत मनोरंजन देऊन त्यांची `निजाम ऑफ नॉन्सेन्स' ही पदवी सार्थ ठरवली होती. मनमोहन देसाई `स्कूल'ची धुरा सध्या डेव्हिड धवनच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत त्यानं `शाळे'ला बुट्टी मारून दादा कोंडकेंचा खाजगी क्लास जॉईन केला असावा, अशी शंका त्याचे सिनेमे पाहिल्यावर यायची. हल्ली मात्र डेव्हिडचं मन शाळेत रमायला लागलेलं दिसतंय.
  अस्सल मनमोहन देसाई छापाचा तिरपागडेपणा थोडा आणखी पुढे() घेऊन जाणारा `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' काढून डेव्हिडनं शाळेच्या लौकिकात भर टाकली आहे.
  मनजींच्या सिनेमात नायकांमध्ये `नायक'पण वाईट मार्गाला लागलेले मुळचे सालस नायक होते. डेव्हिडचा नायक राजा (अक्षयकुमार) नालायक, कामचुकार, अंधश्रद्धाळू आई-बहिणीची पर्वा न करणारा (हेही मनजीपेक्षा हटके) उद्दाम, शेफारलेला तरुण आहे. चंदामामा नावाच्या ज्योतिषी मामानं (सतीश कौशिक) त्याला सांगितलंय की, तो एका वर्षात राजा होणार आहे. त्यामुळं त्यानं हलकी नोकरी करू नये. मामाच्या ज्योतिषावर त्याचा आणि त्याच्या आईचाही (हिमानी शिवपुरी) प्रचंड विश्वास. घरदार सांभाळावं. चार पैसे कमवावेत, तरुण बहिणीच्या लग्नाची काही तजवीज करावी, याची फिकीर त्याला नसते, बहीणही (एरवीच्या फिल्मी स्टँडर्डस्च्या तुलनेत) निर्लज्जपणे `लग्न करून दे नाहीतर दूधवाल्याबरोबर पळून जाईन', असं ठणकावणारी.
 श्रीमंत बापाची (कादरखान) एकुलती एक सरफिरी मुलगी शालू (जुही चावला) राजाच्या प्रेमात पडते. चंदामामानं मुलींपासून दूर राहायला सांगितल्यानं राजा शालूपासून फटकून राहतो. शालू मात्र लग्न करीन, तर राजाशीच, असा पण करून बापाच्या पोटात गोळा आणते.
  मुलीच्या प्रेमाखातर बाप चंदामामाला `चौदाव्या रत्ना'चा धाक घालून राजा-शालूचं लग्न घडवून आणतो. पण, राजाला वास्तवाची जाणीव व्हावी, स्वप्नांच्या जगातून त्यानं जमिनीवर यावं, यासाठी अट घालतो की, राजानं एक लाख रुपये दिल्यानंतरच त्याला शालूशी `सुहाग रात' साजरी करता येईल. (हा डेव्हिडवरचा `क्लास'चा प्रभाव असावा.)
  मग राजा स्वत:चं `भावी राजे' पण न सोडता पैसे कमावण्यासाठी काय काय युक्त्या लढवतो. त्यांच्या चोरटय़ा भेटींमध्ये शालूचा बाप कसा बिब्बा घालत राहतो, याची क्रॅकजॅक कहाणी म्हणजे `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' अर्थात राजाला शेवटी `इमोशनल' होऊन सरळ मार्गावर यावं लागतंच. (शेवटी हिंदी सिनेमा आहे ना हा!)
   कथानक म्हणून फारशा मोठय़ा नसलेल्या या `स्टोरीलाइन'ला डेव्हिड आणि लेखक रुमी जाफरी यांनी वेगवान फार्सिकल कॉमेडीचं स्वरुप दिलं आहे. पडद्यावर जे काही घडेल त्यातून प्रेक्षक हसलेच पाहिजेत. असा पण करून `वाट्टेल ते' घडवून प्रेक्षकांना हसवत ठेवलं आहे.
  इंग्रजीत `निर्दय' कॉमेडीची परंपरा आहे. उठसूट इंग्रजी सिनेमाच्या नकला मारण्यांनी `अ फिश कॉल्ड वॉन्डा' सारखा `हलकट' हास्यपट कधीही काढलेला नाही. `मिस्टर अँड...'मध्ये राजा कमालीचा हलकटपणा करत राहतो. पण हा हलकटपणा `शुद्ध' असल्यानं लोभस आणि हास्योत्पादकच होतो, हे लेखक दिग्दर्शकांचं यश आहे.
  सिनेमाचा नायक सासऱयाला `अरे, तुरे' करतो, उर्मटपणे वागतो; आपण हसतो. नायकाला अपघात होऊन तो जायबंदी होतो; आपण हसतो. एरवी नायकानं कुणाकडून मार खाल्लेला आपल्याला खपत नाही. पण, इथे अगडबंब सुमो पैलवान नायकाची यथेच्छ पिटाई करतो, तेव्हाही आपण हसतो. मानवी आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या भावनांमधून, वेगवेगळ्या रसांचा परिपोष करणाऱया प्रसंगांमधून हास्यरस निर्माण करणं, हे काही सोपं काम नाही.
  बापानं मुलीच्या शरीरात इलेक्ट्रिक उपकरण बसवून नायकानं तिला स्पर्श केल्यावर `सायरन'चा आवाज येईल, अशी व्यवस्था करणं किंवा नायकानं एकाला (दुसऱयाचीच) बकरी `बोलकी' बकरी म्हणून विकणं, हे प्रसंग तर फर्मासच जमलेले. सुसूत्र कथानक म्हणून काहीही न घडवता तीन तास चुटक्यांची मालिका सादर करूनही डेव्हिड प्रेक्षकाला खुर्चीत बसवून ठेवतो.
  अर्थात, शेवटचा बोधप्रद इमोशनल भाग डेव्डिड टाळू शकणार नव्हताच. तोही जमेल तेवढय़ा `सर्किट' पद्धतीनं चित्रित करण्याचा प्रयत्न डेव्हिडनं केला आहे. गाणी हे या सिनेमातले अडथळेच आहेत. `तू क्या बंगला बनायेगा' आणि `टायटल साँग' वगळता बाकीची गाणी कथानक पुढेही नेत नाहीत. बरं, पूर्ण `टेन्शन फ्री' असलेल्या या सिनेमात `रिलीफ' म्हणूनही गाण्यांची गरज नव्हती.
  डेव्हिड-रुमीच्या प्रयत्नांना सर्वच कलावंतांनी मस्त-मजेशीर साथ दिलीये. अक्षयकुमारला अभिनय जमतो, हे (बहुधा) पहिल्यांदाच सिद्ध झालंय. एरवी ऑकवर्ड पद्धतीनं, दगडी चेहऱयानं पडद्यावर वावरणाऱया अक्षयनं या सिनेमात शरीर मोकळं सोडलंय आणि चेहराही झरझर हालता ठेवलाय. एरवी वात आणणारा त्याचा चिरका आवाज इथे उच्चारणाची ढबच बदलल्यानं सुसह्य होतो. `अबे क्या बच्चेकी जान लेगा तून' हे त्याचं पालुपदही धमाल. जुहीही या सिनेमात फुल फॉर्मात सुटली आहे. डेव्हिडचा सिनेमा असूनही `जब तक रहेगा समोसे मे आलू' हे खटियागीत किंवा जुहीचं बिकिनीमधलं दर्शन `व्हल्गर' होत नाही, हे जुहीचं यश. बाकीची मंडळीही या बिनडोक कॉमेडीत धमाल उडवतात.
 सिनेमाच्या आस्वादाची तऱहा, आवडीनिवडी माणसामाणसांनुसार बदलत असल्या तरी जातकुळी पाहून सिनेमा पाहायचा असतो. सत्यजित राय यांचा सिनेमा पाहण्याची फुटपट्टी मनमोहन देसाइभच्या सिनेमाला लावायची नसते आणि तशी मोजमापं ठरवायची नसतात. प्रत्येक सिनेमानं जीवनाचा तळ खरवडून काढायचं ठरवलं तर सिनेमे पाहणं, ही शिक्षाच ठरेल. काही सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघायचे असतात. (त्यात डोकं `असणं' ही गृहीत धरलेले आहे.)
   पूर्णपणे निर्बुद्ध, निर्लज्ज आणि हलकट होऊन, डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहण्याचा वकूब असेल तर `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' पाहा. आपल्याला एरवीही डोकं बाजूलाच ठेवून जगता आलं असतं तर किती बरं झालं असतं, हे लक्षात येईल.

मनी नाही भाव। म्हणे `प्रेमा' मला पाव।। (इतिहास)


प्रेम... वय, धर्म, जात, भाषा वगैरे सर्व बंध मोडून, सर्व पाश तोडून दोन जिवांचं अद्वैत साधणारा अडीच अक्षरी सिद्ध महामंत्र... प्रेमाची महती मोठी, सत्ता निरंकुश आणि संचार सर्वव्यापी... परब्रह्म् परमात्म्यासारखा... कळ जीवघेणी, क्षणक्षणाला जाळणाऱया आणि कणाकणानं मारणाऱया एखाद्या असाध्य रोगासारखी.
  एकदा हा रोग जडला की रोगाचं रोगावरही प्रेम जडतं, प्रेम आणि प्रेयसापलीकडे दुनिया झूट भासू लागते, प्रेयसाचा निदिध्यास जडतो, प्रेमाची आसक्ती देवाच्या भक्तीच्या पातळीवर जाऊन पोहोचते... `माणसाच्या माणूसपणाइतक्या पुरातन आणि सनातन अशा या भावनेचं मोहक-दाहक इंद्रधनुष्य सर्व युगातल्या सर्व मानवी कलांमध्ये प्राणतत्व बनून राहिलं. विसाव्या शतकाची कला म्हणून ओळखला जाणारा सिनेमाही याला अपवाद कसा असणार?
  हिंदी सिनेमाची तर सगळी धुगधुगीच दोन हृदयांमधल्या या नाजुक धडधडीवर आधारलेली. बिनप्रेमाचा हिंदी सिनेमा म्हणजे बिनजीवाचा देह. पण प्रेमाच्या प्रगल्भ भावनेचा अविष्कार हिंदी सिनेमात विरळाच. कारण प्रेक्षकाचं मानसिक वयच मुळी पौगंडावस्थेतलं गृहीत धरण्याचा इथला रिवाज. हा रिवाज पाळण्याच्या अट्टाहासामुळे `प्रेमाचा इतिहास' मांडण्याच्या गमजा करणारा राजकंवर दिग्दर्शित `इतिहास' हा लवकरात लवकर इतिहासजमा व्हायच्या लायकीचा पोरखेळ होऊन बसला आहे.
  दोन जिवांमधलं प्रेम त्यांची ताकद बनून कळीकाळावरही मात करतं, हे `इतिहास'चं कथासूत्र असंख्य वेळा हिंदी सिनेमात येऊन गेलेलं. राजकंवरसारखा हुशार दिग्दर्शक या सूत्रावर नवी, ताजी, रसरशीत मांडणी करू शकला असता. पण इथं त्यानं प्रेमाला द्वेषाची, हिंसेची, वैराची फोडणी देण्याचा धोपटमार्ग स्वीकारला आहे. कथाही निवडलीये `कोयला' शी बरंच साधर्म्य असणारी.
  `इतिहास'चे प्रेमिक आहेत नैना (ट्विंकल खन्ना) आणि करण (अजय देवगण). करणच्या गावावर सत्ता आहे जमीनदार ठाकूर दिग्विजय सिंगची (राज बब्बर) शहरात मोठय़ा महालात राहणाऱया ठाकूरच्या गावातला कारभार करणचा इमानी पिता बलवंत (अमरीश पुरी) सांभाळतो. ठाकूरला देवासमान मानणारा बलवंत त्याच्या अय्याशीसाठी गावातल्या तरण्याताठय़ा मुली पुरवण्याचं गैरकृत्यही भक्तीभावानं करतो.
  ठाकूरची अत्यल्पवस्त्रांकिता बहीण अंजली (सपना बेदी) गावात येते. ती करणच्या पौरुषावर फिदा होते. त्याचवेळी ठाकूरची नजर गावतल्या : उफाडय़ाच्या नैनावर पडते. तो बलवंतला हुकूम देतो, नैनाला शहरातल्या महालांवर हजर करण्याचा. बलवंत ही जबाबदारी करणवर सोपवतो. ठाकूरच्या खास पाहुणीला जिवापाड जपून सहीसलामत त्याच्या हवाली करण्याच्या भावनेनं करण नैनाला घेऊन निघतो.
  प्रवासातल्या भांडणतंटय़ांमधून करण आणि नैना एकमेकांच्या प्रेमात पडतात. शहरात पोहचल्यावर अंजलीकडून करणला ठाकूरचा वाईट इरादा समजतो. तो नैनाला ठाकूरच्या कचाटय़ातून सोडवून पळ काढतो. ठाकूरनं उभारलेला हरएक अडथळा पार करून जाणाऱया करणला रोखण्यासाठी ठाकूर त्याच्या बापालाच बलवंतलाच पाचारण करतो. धन्याप्रतीचं इमान आणि पुत्रप्रेम यांच्या कैचीत सापडलेला बलवंत करणच्या जिवावर उठतो. पण नेहमीप्रमाणं शेवटी त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन अनेकांचे मुडदे पडल्यावर नैना-करणचं प्रेम सफल होतं.
  मुळात नैना-करणच्या प्रेमापायी घडणाऱया उत्पातांची व्याप्ती आणि भयावहता पाहता एवढे उत्पात न्याय्य वाटावेत, अशा लायकीचं, त्या दर्जाचं प्रेम चितारणं, ही लेखक-दिग्दर्शक राजकंवरची मुख्य जबाबदारी होती. पण `इतिहास'चा प्राण असलेलं हे प्रेम इतकं पातळ पचपचीत, भडक, बटबटीत झालं आहे की, असल्या फडतूस प्रेमासाठी इतका गदारोळ कशाला. अशीच प्रेक्षकांची भावना व्हावी.
  नैना-करणमधला प्रणय साचेबद्ध यांत्रिक पद्धतीनं खुलतो. त्यांच्या गावापासून रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास तर गिरीभ्रमणापलीकडे काहीच साधत नाही. या दोघांना एकमेकांबद्दल `दोन देह एक जीव' अशी भावना वाटायला लावणारं आधी काहीच घडत नाही. दर दीड मिनिटांनी आर्त साद घालून, पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांना मिठय़ा मारल्या की, झालं प्रेम, अशी राजकंवरची बालिश कल्पना आहे. त्यानं स्वत: प्रेम करून पाहण्याचं वय बहुधा हिंदीतले उथळ प्रेमपट पाहण्यात वाया घालवलेलं असावं.
  नैना-करणचं प्रेम तेवढं उदात्त, पवित्र आणि अंजलीचं करणवरचं प्रेम किंवा ठाकूरची नैनाबद्दलची आसक्ती मात्र शारीर, अशी प्रेमाची ढोबळ विभागणीही राजकंवरनं केली आहे. ती दांभिकही आहे. कारण शरीरानं शरीराला भिडण्याचं आव्हान देणाऱया अंजलीला करण भारतीय संस्कृतीतल्या उदात्त प्रेमपरंपरेचं चऱहाट ऐकवतो, उघडय़ावाघडय़ा पाश्चात्य संस्कृतीची निर्भर्त्सना करतो, तेव्हा त्याच्या शेजारीच खजुराहोच्या कामशिल्पांच्या प्रतिकृती चित्रचौकटीत दिसत असतात.
  बरं हिंदी सिनेमात सगळेच नायकनायिका एकमेकांवर देहभावापलीकडचं प्रेम करीत असतात तरीही नायकाला शीलभ्रष्ट नायिका चालत नाही. त्याला चालली तरी ते प्रेक्षकांना खपत नाही. त्यामुळं `इतिहास'मध्ये दिग्दर्शक नायिकेच्या शीलरक्षणाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे चक्क खलनायकावर सोपवतो, तेव्हा या ढोंगीपणाबद्दल हसूसुद्धा येत नाही. कीवच येते.
  गावातल्या मुलींचा एक रात्र उपभोग घेऊन त्यांना कुंटणखान्याची वाट दाखवणारा खलनायक दिग्विजय नैनाशी मात्र अधिकृत लग्नच करण्याचा हट्ट का धरतो. याचं लॉजिकलं उत्तर `इतिहास'मध्ये नाही. नैना आणि करणचं अपरिहार्य मीलन होणार तेव्हा नैना `कुमारिका'च असली पाहिजे, हा भंपक दंडक पाळण्यासाठी दिग्दर्शकानं योजलेली ही क्लृप्ती आहे.
  ठाकूरनं खास पाहुणी म्हणून शहरात बोलावल्यावर त्याचा `अर्थ' नैनाला कळत नाही का, करणला समजत नाही का, नैनाचे कुटुंबीय (ते पडद्यावर कधीच दिसत नाहीत) करणसारख्या दांडजवान पोराबरोबर तिची रवानगी कशी करतात, गावात राहून रेल्वेबद्दलची आश्चर्य वाटणारा करण प्रथमच शहरात आल्यावर अत्याधुनिक शस्त्रZ सफाईने कशी चालवतो. त्याला मुंबईची गल्लीबोळं कशी समजतात, हे आणि असले असंख्य प्रश्न `इतिहास' मध्ये अनुत्तरित राहतात. हे प्रश्न पडूच नयेत, असा वेगही `इतिहास'ला नाही.
  अभिनयाच्या आघाडीवरही `इतिहास'ची कामगिरी सुमार आहे. ट्विंकल खन्नाला पाहिलं की हिची आईच (डिंपल) हिच्यापेक्षा किती तरुण आणि आकर्षक दिसते. हाच विचार मनात येतो. तिनं आणि अजय देवगणनं मन लावून अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. पण `इतिहास'सारखा ढिसाळ चित्रपट `बघणीय' करायला फारच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनयाची गरज होती. मन लावून केला म्हणून अभिनयाचा दर्जा श्रेष्ठ होत नाही. राज बब्बर, अरुणा इराणी (करणची आई). अमरिश पुरी आणि दुहेरी भूमिकेतला शक्ती कपूर यांचीही कामगिरी यथातथाच.
   `बॉर्डर'मध्ये मिनिटभराच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या सपना बेदीला अंगप्रदर्शनाखेरीज `इतिहास'मध्ये फार काही करायला लागलेलं नाही. दुर्दैवानं अंगप्रदर्शनासाठी आवश्यक. आकर्षक शरीरयष्टीही तिला लाभलेली नाही. त्यामुळं तिच्यासाठी सगळी वजाबाकीच.
  प्रेमकहाण्यांच्या यशात संगीताचा मोठा वाटा दिसतो. `दिलकी कलमसे' हे टायटल साँग वगळता दिलीपसेन- समीरसेन यांनी खास मनात घोळवावं. असं एकही गाणं न देऊन `इतिहास'चं भवितव्य स्पष्ट केलं आहे. नरेश शर्मा यांनी पार्श्वसंगीतात `कोयला', `गुप्त' आणि `दुनिया दिलवालों की' मधल्या संगीताचे तुकडे निर्लज्जपणे उचललेले आहेत. उसनवारी करताना नक्कल मारण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलेले नाही. सरळ मूळ `साऊंडट्रक'च वापरला आहे.
   लोकांना मटणाचा तेजतर्रार रस्साही आवडतो आणि बासुंदीची गोडीही भावते. पण म्हणून कोणी मटण आणि बासुंदी एकत्र कालवून खात नाही `इतिहास'मध्ये प्रेमाला हिंसाचाराची फोडणी देऊन राजकंवरनं मटणावर बासुंदीची धार वाढण्याचा आचरटपणा केला आहे. ही खानवळ चालणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
..................................................................................
         इतिहास
 निर्माता-लेखक- दिग्दर्शक- राज कंवर
 पटकथा - रॉबिन भट, आकाश खुराणा
 संवाद - कमलेश पांडे
 गीते - समीर
 संगीत - दिलीप सेन-समीर सेन
 कलाकार - अजय देवगण, ट्विंकल खन्ना, सपना बेदी, शक्ती कपूर, अरुणा इराणी, राज बब्बर, अमरिश पुरी.

Monday, February 6, 2012

उद्रेक आप-तेजाचा! (व्होल्कॅनो)


लातूर उस्मानाबाद परिसरात प्रलयंकारी भूकंप झाला. हजारो माणसं मृत्युमुखी पडली. गावंच्या गावं नामशेष झाली. बीबीसी - सीएनएनसारख्या वृत्तसंस्थांनी या हृदयद्रावक आपत्तीची चित्रं जगभर पोहोचविली. ती पाहून अमेरिकेतली माणसं हळहळली... निसर्गाच्या कोपाचं रौद्र तांडव पाहून. आणि या माणसांमधले `प्रेक्षक' हळहळले... असलं काही आपल्याला पाहायला- `अनुभवायला' मिळालं नाही म्हणून. माणसाच्या (तेही अतिप्रगत अमेरिकन माणसाच्या) जन्माला येऊन भूकंप पाहिला नाही, म्हणजे व्यर्थच गेला ना हा जन्म?
  प्रेक्षकांची ही हळहळ लक्षात घेऊन तिथल्या निर्माता - दिग्दर्शकांनी कंबरच कसली. `भूकंप-भूकंप काय करता? ज्वालामुखीच्या तोंडावरच नेऊन बसवतो तुम्हाला', असं आव्हानच स्वीकारलं त्यांनी; आणि जन्माला आला `व्होल्कॅनो.'
  `व्होल्कॅनो'च कशाला, हॉलिवुडमध्ये आपत्तीपटांची (डिझॅस्टर फिल्म्स) जी परंपरा आहे, ती प्रेक्षकांची ही प्रत्यक्ष संकटात न सापडता संकटाचा थरार अनुभवण्याची `सिनिकल' गरज भागवत असते. `टॉवरिंग इन्फर्ने', `जॉज', `पॉसिडॉन ऍडव्हेंचर, `वेस्टवर्ल्ड'पासून `जुरासिक पार्क', `लॉस्ट वर्ल्ड'पर्यंतचे आपत्तीपट आठवून पाहा. कुठे नैसर्गिक आपत्ती, कुठे निसर्गाच्या क्रमात माणसानं केलेली ढवळाढवळ किंवा कुठे माणसानंच निर्माण केलेल्या राक्षसी यंत्रांमधले बिघाड विनाशकारी आपत्तींला आमंत्रण देतात आणि मग माणूसच या आपत्तींशी धैर्यानं मुकाबला करून त्यांच्यावर (कायमची किंवा पुढचे भाग काढायच्या सोयीसाठी तात्पुरती) मात करतो.
  सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आणि सुष्टांचा (फक्त कल्पनेतच शक्य असलेला) अंतिम विजय, या सनातन कथानकाचं हे सुधारित, चतुर रुप आहे. इथे दुष्ट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व माणसं करत नाहीत तर निसर्ग किंवा मानवनिर्मित भस्मासूर `खलनायक' बनून सिनेमाला वेगळेपणाचा आभास देतात. आपत्तीपटांची ही परंपरा हल्ली इतकी सशक्त पण साचेबद्ध झाली आहे, की `व्होल्कॅनो'ही `मेड टू ऑर्डर' वाटतो.
  `व्होल्कॅनो'मध्ये ज्वालामुखी हा खलनायक आहे. घटनास्थळ आहे लॉस एंजेलिसमधला मध्य विल्शायर जिल्हा. वास्तवातही लॉस एंजेलिसला भूकंप, वादळं, दरडी कोसळणं अशा आपत्तींचा सामना करावा लागला आहे. एल. . भूकंपप्रवण आहे. या वास्तवावर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कल्पनेचं कलम करून `व्होल्कॅनो'चं कथानक रचण्यात आलं आहे.
  माईक रोआर्क (टॉमी ली जोन्स) हा एल. . च्या आणीबाणी व्यवस्थापन कार्यालयाचा प्रमुख. मध्यमवयीन... घटस्फोटित...13 वर्षांची केली (गॅबी हॉफमन) ही त्याची बंडखोर प्रवृत्तीची मुलगी त्याच्यासोबत राहते.
  भुयारी रेल्वेसाठी खणलेल्या भुयारांमुळे भूभाग कमजोर झाला आहे. आत सर्वभक्षी लाव्हा उकळतो आहे आणि डॉक्टर ऍमी बार्न्स (ऍन हेश) ही भूकंपशास्त्रज्ञ वगळता कुणालाही परिस्थितीच्या गांभीर्याचं आकलन झालेलं नाही. भुयारात काम करणारे आठ कामगार गूढरीतीनं बेपत्ता होऊनही प्रशासकीय पातळीवर योग्य दखल घेतली जात नाही. आणि अखेर ऍमीला वाटत असलेली भीती खरी ठरते. जगप्रसिद्ध ला ब्री टार पिटस्च्या परिसरात लाव्हा जमीन फोडून उसळतो. ज्वालामुखीचा शहराच्या मध्यवस्तीत उद्रेक होतो.
  ज्वालामुखीच्या मुखातून उसळून बाहेर पडणारे तप्त लाव्हारसाचे गोळे बॉम्बसारखे आसपासच्या परिसरातल्या इमारतींवर, रस्त्यांवर कोसळून हाहाकार उडवून देतात आणि लाव्हारसाचा सर्वभक्षी प्रवाह एल. . च्या रस्त्यावरून वाहू लागतो.
   केलीसोबत मोटीरीतून निघालेल्या माईकसमोरच हा उद्रेक होतो. लाव्हारसानं वेढलेल्या मोटारीतून तो केलीची सुटका करतो. तिला सेडार्स - सिनाई हॉस्पिटलमध्ये रवाना करतो आणि ऍमीच्या साथीनं ज्वालामुखीचा सामना करायला सिद्ध होतो.
  रस्ते दुभागण्यासाठी वापरले जाणारे सिमेंट काँक्रीटचे डिव्हायडर आडवे टाकून लाव्हारसाचा प्रवाह अडविण्याचा, त्याच्यावर अग्नीशामक बंब आणि हॅलिकॉप्टर्समधून पाणी फवारण्याचा माईकचा उपाय यशस्वी होतो... पण तात्पुरताच.
  ऍमी माईकला सांगते, की लाव्हारस आता इतर कोणता न कोणत्या ठिकाणाहून जमीन फोडून उसळेलं. तिच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं, की लाव्हारस आता रेल्वेसाठी खणलेल्या भुयारीतून प्रवाह करून हे भुयार जिथे अर्धवट राहिलंय त्या `डेड एंड'ला उसळून बाहेर पडेल, हा `डेड एंड' आहे बेव्हर्ली सेंटर आणि सेडार्स-सिनाई हॉस्पिटलपाशी, ज्वालामुखीच्या तडाख्यात होरपळलेल्या असंख्य जखमी माणसांना लाव्हार्स आता हॉस्पिटमध्येच गाठणार...
   या प्रलयापासून एल.. वाचविण्याचा एकच मार्ग उरलेला असतो. लाव्हारसाचा प्रवाह वळवून सांडपाण्याच्या कालव्यामागे समुद्रात सोडण्याचा. त्यासाठी हॉस्पिटलशेजारची गगनचुंबी इमारत कोसळविण्याचा अचाट उपाय माईकला सुचतो. अर्ध्या तासात या उपायाची अमलबजावणीही होते आणि रौद्रभीषण ज्वालामुखीवर माणसाची बुद्धीमत्ता मात करते.
  उत्तम आपत्तीपटाचे सगळे घटक असलेलं हे कथानक पटकथाकार जेरॉम आर्मस्ट्राँग आणि बिली रे यांनी बंदिस्त पटकथेतून खुलवलंय. क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंटा, मध्यावरच आपत्ती टळल्याचा होणारा भास, त्यातून सुटणारे सुटकेचे नि:श्वास आणि हे नि:श्वास रोखून धरायला लावणाऱया वेगानं पुन्हा दुप्पट जोराने येऊन आदळणारी आपत्ती हे गणित त्यांनी परफेक्ट जुळवलंय.
  आपत्काळात सामान्य माणसांचे `हीरो' होतात, हा सिनेमाकलेतला पुरातन सिद्धांत सिद्ध करणारे प्रसंगही त्यांनी चपखलपणे पेरले आहेत; पण, स्वत:चा प्राण देऊन भुयारातल्या ट्रेनच्या चालकाला वाचवणाऱया अग्नीशामक दलप्रमुखाची व्यक्तिरेखा हिंदी सिनेमातून घेतली असावी. इतकी ढोबळ आहे. क्लायमॅक्सला कोसळणाऱया इमारतीखाली केली उभी असणं, तिला वाचवण्यासाठी माईकनं धाव घेणं आणि ढिगाऱयाखालून दोघांनी सहीसलामत बाहेर येणं, हे या सिनेमातही अतिरंजित वाटतं.
  दिग्दर्शक मिक जॅक्सननं भव्यता, वास्तवाभास आणि परिणामकारक हे या सिनेमाच्या यशासाठी आवश्यक घटक व्यवस्थित पुरवले आहेत. भूकंपानं हलकल्लोळ उडालेला असताना अचानक जमिनीचे हादरे थांबणं, सर्वत्र सन्नाटा पसरणं, पात्रांनी आणि प्रेक्षकांनी सैलावणं आणि त्याच क्षणी भूकंपाच्या जागी ज्वालामुखीचा उद्रेक होणं, हा खास दिग्दर्शक `दिसण्या'चा प्रसंग. तिथे मिक दिसतो.
  टॉमी ली जोन्सच्या व्यक्तिमत्त्वात एक आश्वासकता आहे. कुणालाही त्याच्याबरोबर `सुरक्षित' वाटू शकतं. या वैशिष्टय़ाचा मिकनं पुरेपूर वापर केलाय. एरवी टॉमीची अभिनयक्षमता कसाला लावणारा एकही प्रसंग सिनेमात नाही. टॉमीसारख्या मुरब्बी नटापुढे ऍन हेश कुठेही कमी पडत नाही. ती रुढार्थानं सुंदर नाही. आपल्या शास्त्रावरचा तिच्या विश्वास आणि आपत्तीशी झगडण्याची जिद्द तिला `सुंदर' बनवते. केली झालेली गॅबी हॉफमन आणि माईकच्या उपप्रमुखाचं काम करणारा डॉन शीडल्ही लक्ष वेधून घेतो.
  `व्होल्कॅनो'चा खरा नायकं आणि खलनायक आहे ज्वालामुखी आणि लाव्हारस. विलशायरचा तंतोतंत उभारलेला सेट आणि अप्रतिम दृक्परिणामांनी (स्पेशल इफेक्टस्) `व्होल्कॅनो'चा थरार वास्तवाच्या पातळीवर आणलाय. जो दृक्परिणाम `स्पेशल इफेक्ट' आहे. असं प्रेक्षकाला कळतच नाही. तो `स्पेशल इफेक्ट' यशस्वी झाला. असं मानतात. या निकषांवर `व्होल्कॅनो'कारांनी केलेली कामगिरी अद्भुत, अफलातून आहे. अल्ट्राव्हायोलेट किरण, रंग, संगणकीकृत इफेक्टस् मिनिएचर सेटस् यांचा वापर करून बनवलेला लाव्हारसाच्या प्रवाहाचा `इफेक्ट'असा रसरशीत आहे की, हा निराकार, विलक्षण लोभस धगीचा द्रवपदार्थ `व्होल्कॅनो'मध्ये (गरम रक्ताचा) खलनायकच बनून जातो. निसर्गक्रमाचं पालन करणाऱया एका निर्जीव द्रवावर खलप्रवृत्ती मानवी संकल्पनेचं आरोपण यशस्वी होतं, ते स्पेशल इफेक्टस्वाल्यांनी बजावलेल्या बिनतोड कामगिरीमुळं.
  चाळीस हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडल्यामुळे रांचो ला ब्री परिसराला भूगर्भशास्त्राeय महत्त्व आहे. त्याचा ज्वालामुखीच्या पहिल्या उद्रेकासाठी केलेला वापर `व्होल्कॅनो'ला वास्तवाचं परिमाण देतो.
   `व्होल्कॅनो' एल..मध्येच घडवण्याचं आणखी एक कारण आहे. मुंबईव्यतिरिक्तच्या भारतातल्या मंडळींना मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या अन्य शहरवासियांना पुण्याबद्दल जशी सुप्त असूया वाटते. तशी अमेरिकनांना एल.. वासियांबद्दल वाटते. एल..ला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त लाभलेलं आहे आणि लायकी नसताना लाभलेलं आहे. अशी एल.. बाहेरच्यांची धारणा आहे. त्यामुळं एल.. वासियांवर कोसळणारं (काल्पनिक का होईना) संकट उर्वरित अमेरिकनांना सुप्त आनंद देऊन जातं.
तेव्हा आता हा आनंद मिळवण्यासाठी नाशिकच्या एखाद्या निर्मात्यानं पुण्यातल्या पानशेत प्रलयाच्या आपत्तीवर मराठीत आपत्तीपट काढण्याची वाट पाहायची, की सरळ `व्होल्कॅनो' पाहून टाकायचा, हे ज्याचं त्यानं ठरवायचं.