Sunday, February 13, 2011

पटकथाः 00 ते 10

नव्या शतकाच्या आणि सहस्रकाच्या या पहिल्या वर्षावर कोरलं गेलेलं नाव म्हणजे हृतिक रोशन. या वर्षात साक्षात महानायक अमिताभ बच्चनचा मुलगा लाँच होणार होता. त्याच्या जोडीला करिश्माची धाकटी बहीण असणार होती. सगळी उत्सुकता या दोघांभोवती एकवटली गेली होती. राकेश रोशनच्या मुलाचं पदार्पण कोणाच्या खिजगणतीत नव्हतं. तो दिसतो छान आणि नाचतो अप्रतिम, एवढाच त्याच्याबद्दलचा बझ होता. फारशी अपेक्षा नसताना, फारशी हवा नसताना कहो ना प्यार हैप्रदर्शित झाला आणि हृतिक रोशन एका रात्रीत थेट सुपरस्टारच बनला.
या मुलाकडे केवळ चिकणा चेहरा आणि नृत्यकौशल्यच नाही, तर हा अभिनयाचा बंदा रुपया आहे, हे पहिल्याच सिनेमातल्या डबल रोलनं सिद्ध केलं. सवरेत्कृष्ट पदार्पणाबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनयाचं फिल्मफेअर पटकावणारा तो पहिला अभिनेता असेल. याच वर्षात आलेल्या फिजाआणि मिशन कश्मीरयांनी त्याच्या अभिनयकौशल्यावर शिक्कामोर्तब केलं..
 अमिताभचा मुलगा अभिषेक आणि करिश्माची बहीण करीना यांचं एकत्र लाँचिंग झालं खरं- पण, ‘रेफ्युजीऑल्मोस्ट भुईसपाट झाला. तेव्हा कोणाच्या खिजगणतीत नसलेला हृतिक आज 10 वर्षानंतरही मोठा स्टार आहे. काइट्ससारखा मेगाफ्लॉप सिनेमा दिल्यानंतरही त्याच्या गुजारिशकडे लोकांचे डोळे लागले आहेत. अभिषेक बच्चन मात्र अजूनही चाचपडतो आहे. त्याचा 68 वर्षाचा बाप कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून कोटय़वधी भारतीयांवर मोहिनी टाकत असताना अभिषेकचा सर्वोत्कृष्ट अभिनय आयडियाच्या जाहिरातींमध्येच पाहायला मिळतोय!
 या वर्षात विधु विनोद चोप्रा (मिशन कश्मीर), धर्मेश दर्शन (धडकन, मेला), मन्सूर खान (जोश) या आघाडीच्या दिग्दर्शकांच्या अस्ताचा प्रारंभ झाला. विधु विनोद चोप्रानं नंतर एकलव्यबनवून तो ऑस्करच्या वारीत नेऊन आणला.. पण, त्यात दम नव्हता. दशकभर ताजं राहण्याची क्षमता असलेला मन्सूर खान मात्र सर्वसंगपरित्याग केल्यासारखा ऊटीलाच जाऊन स्थायिक झाला. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही आधीचं दशक गाजवणारी जोडी रिटायर व्हायला आली आहे, याचंही सूतोवाच या वर्षात (पुकार) झालं. सत्याचा टेरिफिक भिखू म्हात्रे साकारणारा मनोज वाजपेयी हीरो म्हणून चालणार नाही (घात, दिल पे मत ले यार) हेही याच वर्षात स्पष्ट झालं. कमलहासनचा बहुचर्चित  हे रामत्याच्या नार्सिसिस्ट वृत्तीच्या अतिरेकामुळे हरे रामम्हणत आपटला. जाने भी दो यारोचा दिग्दर्शक कुंदन शाह यानं आपल्या प्रकृतीशी अतिशय विसंगत अशा क्या कहनाया रडारडपटातून पुनरागमन केलं. प्रीती झिंटाचा हा पहिला आणि शेवटचा सोलो हिट.
 
कमबॅक ऑफ द इयर : अमिताभ बच्चन
 
फ्लॉप्सनी पोळलेला, एबीसीएलच्या कर्जात बुडालेला आणि आता पुढे काय करावं याच्या विवंचनेत सापडलेला अमिताभ बच्चन एक दिवस उठला आणि थेट यश चोप्रांच्या घरी जाऊन थडकला. माझ्यासाठी काही काम आहे का तुमच्याकडे?’ त्यानं थेट विचारणा केली. त्याच्यासाठी मोहोब्बतेंआखण्यात आला. शाहरुखच्या समोर कार्डबोर्डसारखी सपाट, एकांगी व्यक्तिरेखा त्याला देण्यात आली. साडे तीन तासांचं असह्य दळण असूनही सिनेमा चालला आणि गेल्या शतकाचा महानायक नव्या शतकात रूपेरी पडद्यावर परतला.
 
सरप्राइझ ऑफ द इयर : हेराफेरी
 प्रियदर्शनचा हा स्लॅपस्टिक आणि सिच्युएशनल कॉमेडीचा मेळ घालणारा सिनेमा या वर्षीच्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत नव्हता. त्यानं तसा जेमतेमच धंदा केला. पण, व्हिडिओच्या सर्किटवर त्याला कल्ट सिनेमाचा प्रतिसाद मिळाला. अक्षयकुमार आणि सुनील शेट्टी मनात आणलं तर अभिनय करतात, हे या सिनेमातून पहिल्यांदा स्पष्ट झालं. हे दोन दोन हीरो असतानाही या सिनेमाचा नायक होता परेश रावळचा बाबुराव आपटे- तोही कोणत्याही कोनातून आपटेदिसत नसताना. प्रियदर्शनला हिंदीत हिट होण्याचा फॉर्म्युला सापडला, पण, हिंदी इंडस्ट्रीनं विरासतसारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक गमावला.  
***************

2001
नव्या-जुन्याच्या संगमावरचं वर्ष म्हणून या वर्षाचा उल्लेख करायला लागेल. या वर्षाच्या टॉप टेन हिट सिनेमांच्या यादीवर नजर टाकली, तरी लक्षात येईल की इतक्या वेगवेगळ्या जॉनर एकाच वर्षात पाहायला मिळालेलं दुसरं वर्ष सापडणं अशक्य आहे. एकही सिनेमा दुस-यासारखा नाही. हिंदी चित्रपटरसिकांना लक्षात राहील अशी मेजवानी या वर्षानं दिली.
 सनी देओलचा गदरहा या वर्षीचा सर्वात मोठा हिट होता. पण, सर्वात मोठा इम्पॅक्ट होता लगानचा. पाकिस्तानला शिव्या घालणारी कंठाळी देशभक्ती, सनीचा ढाई किलो का हाथ आणि उत्तमसिंगचं संगीत यांच्या बळावर गदरने पिटातलं पब्लिक जिंकून घेतलं. 

 लगानही गदरप्रमाणेच पीरियड ड्रामा होता आणि त्याचाही नायक खेडुत हा विलक्षण योगायोग. पण, ‘लगानहा अधिक धाडसी, प्रायोगिक आणि भारतीय चित्रपटांची वैशिष्टय़ं अभिरुचीपूर्ण पद्धतीनं आत्मसात केलेला सिनेमा होता. हिंदीतला यशस्वी झालेला हा पहिला क्रीडा-पट. परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत अंतिम पाच सिनेमांमध्ये धडक मारण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे. या चित्रपटानं आमिर खान हा अतिशय विचारी आणि यशस्वी निर्माता हिंदी चित्रपटसृष्टीला दिला आणि आशुतोष गोवारीकर हा मोठय़ा दमसासाचा दिग्दर्शक दिला. 

करण जोहरचा कभी खुशी कभी गमहा मल्टिस्टारर इमोशनल अत्याचार, ‘अजनबीहा थ्रिलर, ‘चोरी चोरी चुपके चुपकेही साठच्या दशकातल्यासारखी एक फूल, दो माळिणीछापाची कहाणी, ‘मुझे कुछ कहना हैही फ्रेश, संगीतमय कमिंग ऑफ द एजप्रेमकहाणी, गोविंदाचा धुमाकूळ (जोडी नंबर वन) आणि श्याम बेनेगलांचा सर्वात कमर्शियलसिनेमा (झुबेदा) हे या वर्षीचे सर्वात यशस्वी चित्रपट होते. या वर्षी राकेश ओमप्रकाश मेहरा या दिग्दर्शकानं अमिताभ बच्चनला घेऊन 'अक्स'मध्ये फेस ऑफचा भारतीय आध्यात्मिक रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी संतोष सिवननं सम्राट अशोकाला डिझायनर रूपात सादर केलं. ही दोन्ही कलमं रुजली नाहीत.
 एका पंजाबी लग्नाच्या धामधुमी- भोवती माणसा-माणसांमधील संबंधांचे, ताणतणावांचे गोफ विणणा-या मॉन्सून वेडिंगचं यश हे अर्थपूर्ण सिनेमांना बळ देणारं होतं.
 
सरप्राइझ ऑफ द इयर : चांदनी बार
 
मधुर भांडारकर या तरुण दिग्दर्शकाला स्वत्व शोधून देणारा हा सिनेमा. काही काळासाठीच मुंबईत अधिकृतपणे फोफावलेल्या डान्स बारमधील मुलींचं विदारक आयुष्य मांडणारा हा सिनेमा सरप्राइझ हिट झाला आणि मधुरला त्याचा फॉर्म्युला सापडला. तोच त्यानं पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशनआणि जेलमध्ये वापरला. अनवट जागांची ही फिल्मी टूरकधी चालली, कधी पडली. पण, हिंदीत एक विशिष्ट जागा मधुरनं निर्माण केली.
 
पाथब्रेकिंग फिल्म ऑफ द इयर: दिल चाहता है
 हा सिनेमा काही वेगळाच होता. अर्बन, अपमार्केट क्लासच्या जगण्याचं सहजचित्रण करणारा हा सिनेमा लुक, संवाद, दिग्दर्शन, संगीत या सगळय़ाच आघाडय़ांवर- मध्यंतरापर्यंत तरी- एकदम वेगळा आणि रिफ्रेशिंग होता. आकाश (आमिर खान) आणि शालिनी (प्रीटी झिंटा) यांचं प्रेमप्रकरण सुरू झाल्यावर तो नेहमीच्या वळणावर आला. पण, प्रेमकथेची मांडणीही या व्यक्तिरेखांमुळे मस्त जमून आली. या सिनेमानं किशोरकुमारसारखा एक जबरदस्त अष्टपैलू कलावंत इंडस्ट्रीत आणला, फरहान अख्तर. ज्याच्या फक्त लेखन-दिग्दर्शनाचाच पैलू दिल चाहता हैमध्ये दिसला. अभिनेता आणि गायक हे त्याचे पैलू पुढे रॉक ऑनमध्ये दिसले.  
***************** 
2002
हे हिंदी सिनेमाच्या इतिहासातलं सर्वात अपयशी वर्ष मानलं जातं. या वर्षात देवदास’, ‘साथियाआणि कंपनीहेच त्यातल्या त्यात नाव घेण्यासारखे सिनेमे आले. बंगाली देवदासच्या प्रेमकथेचा रंगीत संगीत गुजराती आविष्कार म्हणजे संजय लीला भन्साळीचा ग्रँड देवदास. त्यानं ही ऑल्मोस्ट कालबाह्य झालेली गोष्ट आजच्या पिढीला सांगण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली, असं मानणाऱ्यांची तोंडं गप्प करणारं सणसणीत उत्तर याच दशकाच्या अखेरीला येणार होतं.. देव डीच्या रूपानं. 
'साथिया' ही तरुण जोडप्याच्या भावजीवनाची मणिरत्नम स्टायलीतली कहाणी (क्लायमॅक्सचं दळण माफ करून) शाद अली या तरुण दिग्दर्शकाला हात देऊन गेली. सत्यानंतर रामगोपाल वर्मानं पुन्हा अंडरवर्ल्डचा विषय घेऊन कंपनीबनवला. विवेक ओबेरॉयचं प्रॉमिसिंग पदार्पण ओव्हर प्रॉमिसिंग ठरलं. त्याच्या करिअरमध्ये यशाचं सातत्य राहिलं नाही. आँखेहा आंधळय़ांनी घातलेल्या दरोडय़ाचा सिनेमा ब-यापैकी चालला. गुन्हेगारीपटांमध्ये मैलाचा दगड ठरेल असा काँटेही उत्तम चालला. मात्र, या सिनेमात भाषा सोडून काय देशी होतं, हा प्रश्नच होता.
 या वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीला शहीद भगतसिंगांचं अतीव प्रेम दाटून आलं. किमान सहा सिनेमांच्या घोषणा झाल्या, त्यात तीन बरे सिनेमे आले. एकात बॉबी देओल, एकात सोनू सूद आणि एकात अजय देवगण भगतसिंग होता. यांच्यात वयानं आणि चेह-यानं सगळय़ात विशोभित असलेला अजयचा भगतसिंगच इफेक्टिव्ह होता, कारण कॅमे-यामागे राजकुमार संतोषी होता. दुर्दैवानं सगळय़ा रणधुमाळीत हा चांगला सिनेमा तितकासा चालला नाही.
 मल्टिप्लेक्सेसमुळे छोटय़ासिनेमांना आलेला बहर दाखवणारं हे वर्ष मानायला हरकत नाही. 
ब्रिटनमध्ये बनलेली बेंड इट लाइक बेखमआणि अपर्णा सेनचा मिस्टर अँड मिसेस अय्यरहे दोन्ही वेगळय़ा वाटेचे सिनेमे उत्तम चालले. मकडीया बालचित्रपटाद्वारे विशाल भारद्वाजनं दिग्दर्शनात पदार्पण केलं.
 
सरप्राइझ हिट ऑफ द इयर : एक छोटीसी लव्ह स्टोरी
 
शशिलाल नायरचा हा छोटा सिनेमा अतिशय बोल्ड थीम आणि तिची बोल्ड मांडणी केल्याची हवा, यावर भलताच गाजला. 








 *****************

2003

हे वर्ष जादूचं होतं. हिंदी सिनेमाचे प्रेक्षक परग्रहावरील प्राण्यावर प्रेम करण्याइतके प्रगल्भ झाले आहेत, असं गृहीत धरून राकेश रोशननं ईटीवर नाचगाण्यांचं, प्रेमाचं कलम केलं आणि ते चांगलंच फुललं. 'कोई मिल गया'मध्ये गतिमंद नायकाची भूमिका साकारण्याचा हृतिकचा जुगारही यशस्वी ठरला. पण, राकेश रोशनच्या दिग्दर्शनातच तो हिट सिनेमे देतो, अशीही अपकीर्ती पदरात आली. 
बॉक्स ऑफिसवर तीन वर्षं जरा नरमगरम असलेला शाहरुख खान कल हो ना होया जोहरी सिनेमातून विथ अ बँगपरतला. अमिताभ बच्चन स्वत:च्या खांद्यावर सिनेमा खेचून नेऊ शकतो, हे बागबाँने सिद्ध केलं.
 या वर्षात रामगोपाल वर्मानं डरना मना हैच्या रूपानं एकाच सिनेमात एकापेक्षा अधिक, स्वतंत्र कथा मांडण्याचा प्रयोग केला. तो चांगलाच यशस्वी झाला. बराच काळ कमर्शियल सिनेमाची नस चाचपडत असलेल्या प्रकाश झा याला गंगाजलमधून ती सापडली. इश्क विश्कया माफक चाललेल्या प्रेमपटातून शाहिद कपूरनं पदार्पण केलं. बूमया अतिशय पडेल सिनेमाची नोंद- त्यातून कतरिना कैफनं- अतिशय फुटकळ भूमिकेत पदार्पण केलं म्हणून ठेवायला लागेल. ही संपूर्णपणे परदेशी दिसणारी, तसंच बोलणारी मुलगी हिंदी सिनेमात टॉपची हिरोइन बनेल, असं भाकित कुणी करू धजलं नसतं. पण.. असो.
 या वर्षानं दोन लवंगी फटाकडय़ा रूपेरी पडद्यावर आणल्या. असंख्य चुंबनांनी आणि स्फोटक दृश्यांनी गाजलेल्या ख्वाईशमधून मल्लिका शेरावत 
आणि जिस्ममधून (कोण म्हणतो नावात काय आहे?) बिपाशा बसू.
 






फिल्म ऑफ द इयर : मुन्नाभाई एमबीबीएस
या सिनेमानं या दशकावर निर्विवादपणे प्रभाव गाजवणा-या, फिल्ममेकिंगच्या सर्व अंगांवर प्रभुत्व असलेल्या बुद्धिमान दिग्दर्शकाला पहिली संधी दिली. मुन्नाभाई आणि सर्किट ही जय-वीरू यांच्याप्रमाणे हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाच्या भावविश्वाचा भाग झालेली जोडी या सिनेमातून रूपेरी पडद्यावर आली. इतर अनेकांनी नाकारल्यामुळेच मुन्नाभाई ज्याच्या पदरात पडला, त्या संजय दत्तच्या अवघडलेल्या भिनयातून मुन्नाभाई जिवंत झाला आणि संजूबाबा(सुद्धा) पडद्यावर अजरामर होण्याची सोय झाली. 
***************** 
2004
या वर्षावर सर्वात मोठी छाप शाहरुख खानची होती. त्याचा वीर झाराहा वर्षातला सर्वात हिट सिनेमा होता. त्यापाठोपाठही त्याचाच मै हूँ नाहोता. या दोन टिपिकल कमर्शियल सिनेमांपेक्षाही शाहरुखसाठी पाथब्रेकिंग सिनेमा होता स्वदेस’. 
आशुतोष गोवारीकरकडून लगाननंतर प्रचंड अपेक्षा होत्या. त्या कलात्मक अर्थानं त्यानं पूर्ण केल्या- खरं तर लगानच्या पुढे झेप घेतली. परंतु, फिल्म इंडस्ट्रीतल्या बडय़ा कुळांनी चालवलेलं निगेटिव्ह कॅम्पेन आणि शाहरुखची स्वत:चीच दोलायमान अवस्था यामुळे स्वदेसबॉक्स ऑफिसवर माफक यशाचा धनी राहिला. शाहरुखनं त्याच्या सगळय़ा लोकप्रिय स्टायली बाजूला ठेवून साकारलेला मोहन भार्गव आणि भारत देश महान नाहीये, मात्र तो तसा बनू शकतो, ती आपली जबाबदारी आहेहा संदेश यामुळे स्वदेसचं शेल्फ लाइफ या वर्षातल्या अनेक सुपरहिट सिनेमांपेक्षा अधिक आहे. त्या सिनेमापासून प्रेरणा घेतलेले अनेक मोहन भार्गवआजही देशात ग्रामीण भागात सामाजिक काम करताहेत, यापेक्षा मोठं यश ते काय?
 देशभरातील तरुणांना वेगानं बाइक चालवून स्वत:चा कपाळमोक्ष घडवून आणण्याची प्रेरणा देणारा धूम’, कार्टून्समधून व्यक्तिरेखा उलगडण्याचं तंत्र वापरत चोप्रा स्टाइल प्रेमकहाणी सांगणारा हम तुम’, मल्लिका शेरावतच्या अभिनयानं नटलेला मर्डरहे या वर्षातील अन्य यशस्वी सिनेमे. 
मणिरत्नमच्या युवामुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या- एक- अभिषेक बच्चनला अभिनय येतो आणि दुसरी- एकही शब्द ऐकू येत नसतानाही रहमानच्या संगीतातली गाणी हिट होऊ शकतात. पोलिटिकल ड्रामा असलेल्या या सिनेमानं तरुणांनो राजकारणात घुसाहा संदेश एकदम जोशात दिला होता.
चमेलीमध्ये करीना कपूरनं वेश्येची व्यक्तिरेखा साकारून हट केभूमिका करण्याची हौस भागवून घेतली. देवच्या निमित्तानं अमिताभ आणि गोविंद निहलानी असं समीकरण जुळून आलं, पण, ते बहुधा ते त्या दोघांनीच पाहिलं. 
विशाल भारद्वाजचं अ‍ॅडल्ट जगातलं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला मकबूलमल्टिप्लेक्सेसच्या उच्चभ्रू वर्तुळात बऱ्यापैकी गाजला. सोचा न थाया फारसा व्यवसाय न केलेल्या सिनेमाची नोंद घ्यायलाच हवी. कारण, त्यातून इम्तियाज अली हा दिग्दर्शक आणि अभय देओल हा अभिनेता यांचं पदार्पण झालं.
 
सरप्राइझ ऑफ द इयर- रंगीत मुघल ए आझम
 
भारताचा सर्वश्रेष्ठ सिनेमा अशी ज्याची ख्याती आहे, तो के. आसिफ दिग्दर्शित भव्य चित्रपट या वर्षात पुन्हा एकदा रिलीज केला गेला.. जवळपास ५० वर्षानंतर. मूळ ब्लॅक अँड व्हाइट मुघल ए आझममध्ये फक्त दोन गाणी रंगीत होती. तो नव्यानं रिलीज करताना संपूर्ण रंगीत करण्यात आला होता. त्यावर कृष्णधवल युगात रमलेल्या मंडळींनी टीका केली खरी; पण, रंगीत झाल्यामुळे हा चित्रपट नव्या पिढीपर्यंत पोहोचला, त्यातले खटकेबाज संवाद, उर्दू अदब, अप्रतिम टेकिंग, अफाट अभिनय आणि सर्वावर कळसासारखी विराजमान मधुबाला.. हा अनुभव ग्रेट होता.
****************
 
2005
नो एन्ट्रीही अंमळ चावट कॉमेडी या वर्षी सर्वाधिक गल्ला गोळा करून गेली. पण, हे वर्ष होतं बच्चन पितापुत्रांचं. या वर्षात सर्वाधिक चर्चा झाली ती दोन नंबरवर असलेल्या बंटी और बबलीची. युवानंतर अभिषेक-राणी जोडीच्या केमिस्ट्रीची कमाल, शंकर एहसान लॉय यांच्या फडकत्या संगीताची धमाल आणि अमिताभ बच्चन बेमिसाल. केवळ स्वार्थ या एकाच भावनेनं प्रेरित झालेल्या गंडवागंडवीबहाद्दर जोडगोळीची ही कथा भन्नाट होती. 
त्यात अव्वल भाभी आयटम दिसणाऱ्या ऐश्वर्याचं कजरारेहे आयटम साँग म्हणजे आयसिंग ऑन द केक. 
आमिर खानच्या पिळदार मिशांचा मंगल पांडेयाच वर्षी आला आणि केतन मेहताचं दिग्दर्शन असूनही सिनेमात पिळदार मिशांपलीकडे काहीच नाही, हेही पब्लिकच्या लक्षात आलं. 
अमिताभ-अभिषेक हीच जोडी सरकारमध्ये राजकारणातील माफिया टोळीचे सर्वेसर्वा बापलेक बनून पडद्यावर आली. ब-याच काळानंतर रामगोपाल वर्माची भट्टी जमून आली होती. चोप्रा फॅक्टरीतला सलाम नमस्ते’, एकदम हॉलिवुड स्टायलीतला थ्रिलर दसआणि कौटुंबिक जिव्हाळय़ाचा वक्तहे या वर्षातील इतर यशस्वी सिनेमे.
 
रोहन सिप्पीच्या ब्लफमास्टरनंही उत्तम यश कमावलं. श्रीराम राघवनच्या पटकथेला विशेष दाद द्यावी, अशी तिची वीण होती. प्रकाश झा याला बिहारच्या रूपानं त्याच्या सिनेमाचं कायमस्वरूपी नेपथ्य सापडलंय, हे अपहरणनं सिद्ध केलं. 
मधुर भांडारकरच्या पेज थ्रीनं उच्चभ्रूंची आकर्षक पण कचकडय़ाची दुनिया उजागर केली. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार लाभला. मराठीजनांसाठी आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे इक्बालमधून श्रेयस तळपदेच्या रूपानं हिंदीच्या पडद्यावर एका मराठी नायकाचा उदय झाला. अमोल पालेकर दिग्दर्शित पहेलीहा कोडय़ात पाडणारा सिनेमा ऑस्करसाठी पाठवला गेला, ही त्यांच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट ठरली.
 
सरप्राइझ हिट ऑफ द इयर : परिणीता
 

अगदी बिमल रॉय यांच्या सिनेमात शोभावी अशी ही टिपिकल बंगाली कथा प्रदीप सरकार यांनी रूपेरी पडद्यावर पुन्हा आणली. ही विशिष्ट संस्कृतीतली पिरियड फिल्म कितपत रुचेल, हा प्रश्नच होता. पण, विद्या बालनच्या आकर्षक तरी सोज्वळ परिणीतानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या वर्षात गुलजारसारखी आशयघन कवितेची शब्दकळा मिरवणा-या स्वानंद किरकिरेसारख्या हरहुन्नरी गीतकार-गायकाचं पदार्पण झालं.
 
फिल्म ऑफ द इयर : हजारो ख्वाहिशे ऐसी
 आणीबाणीच्या काळातला हा प्रेमतिढा अनेक अर्थानी महत्त्वाचा होता. एकतर राजकीय-सामाजिक घडामोडींवर थेट भाष्य करणारा, थेट आढावा घेणारा सिनेमा हिंदीत फारसा बनत नाही. कारण, राजकारणी नामक जमातीची कातडी गेंडय़ाची असली, तरी भावना फार नाजूक असतात आणि त्या दुखावल्यावर त्यांची धडक गेंडय़ाचीच असते. शिवाय या देशातील बुद्धिवादी मंडळींनी या देशाच्या राजकीय-सामाजिक उत्कर्षाशी स्वत:ला निरलसपणे जोडून घेण्याचं स्वप्न पाहिलं ते याच काळात. त्यांचा स्वप्नभंगही याच काळात झाला आणि मग या वर्गानं स्वत:च्या उत्कर्षालाच वाहून घेतलं.. तोच त्याचा मूळ स्वभाव होता. या (अ)घटिताची अतिशय प्रत्ययकारी नोंद घेणारा हा सिनेमा. केके, चित्रांगदा सिंग आणि शायनी आहुजा या तिघांनीही व्यक्तिरेखांना न्याय दिला आणि हिंदीत अभावानंच आढळणारा खऱ्याखुऱ्या मॅच्युअर कन्टेन्टचा एक सिनेमारूपी दस्तऐवज तयार झाला. 
************ 
2006
हे वर्ष सिक्वेल्सचं किंवा यशस्वी चित्रपटांच्या दुस-या भागांचं होतं. यशस्वी सिनेमाचा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर चालत नाही, ही समजूत आधी धूम २नं खोटी पाडली. या भागात हृतिक रोशन (प्रथमच अँटीहीरोच्या भूमिकेत) आणि ऐश्वर्या राय यांची ऑसम जोडी भाव खाऊन जाणार होती. ती भाव खाऊन गेलीच. अभिषेक दातओठ खात राहिला.  
कोई मिल गयाचा पुढचा भाग असलेला क्रिशही तुफान चालला. हृतिक रोशनचा सुपरहीरो बालकांना आणि सर्व वयाच्या बालिकांना भावून गेला. 
आमिर खानची दोन रूपं या वर्षात प्रेक्षकांसमोर आली. तो वर्षाकाठी एकच सिनेमा करत असल्यामुळे असं घडण्याचा योग दुर्मीळ. यातील एक रूप होतं शाहरुख खानचं. शाहरुखला डोळय़ासमोर ठेवून लिहिला असावा असा प्रेमी बन गया टेररिस्टछापाचा रोल त्यानं 'फना'मध्ये टेचात केला. सोबतीला एव्हर डिपेन्डेबल काजोल होतीच. हिट म्युझिक होतं. 
पण, आमिरचा महत्त्वाचा सिनेमा होता रंग दे बसंती.शेवटच्या भागातला भाबडेपणाचा कळस सोडला, तर या सिनेमात रचनेच्या दृष्टीनं गंमत होती. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिका साकारताना टपोरी कॉलेजयुवकांना देशकालस्थितीचं भान येण्याचा भाग अव्वल होता. रहमानच्या संगीताची मस्ती की पाठशालाही जमून आली होती. करण जोहरनं आपला आणि आपल्या प्रेक्षकांचा वयोगट विसरून कभी अलविदा ना कहनाच्या रूपानं एका अ‍ॅडल्ट सब्जेक्टला हात घातला.. तो पोळला.
 
या वर्षात प्रायोगिकतेचा कळस गाठला गेला होता. सैफ अली खानचा सायको-थ्रिलर बिइंग सायरस’, मधुर भांडारकरचा कॉपरेरेटजगतावरचा सेल्युलॉइडवर लिहिलेला निबंध, नागेश कुकनूरचा डोर’, अनुराग बसू या दिग्दर्शकाला दुर्लक्षिता येणार नाही याची खूणगाठ बांधायला लावणारा गँगस्टर’, ‘अनलिमिटेड फनचा वर्षाव करणारा गोलमाल’, हिंदी सिनेमाला सरहदीपार नेणारा काबूल एक्स्प्रेस’, रक्तपातानं ऑथेल्लोलाही झीट आणणारा ओमकाराहे एकापेक्षा दुसरा पूर्णपणे वेगळा असे उत्तम सिनेमे या वर्षात आले. 
मात्र, त्यात सर्वात कमी गाजावाजा होऊन सगळय़ात लक्षवेधी ठरला तो खोसला का घोसला’. दिबाकर घोष हा मोठा दिग्दर्शक या सिनेमातून हिंदीत अवतरला. मध्यमवर्गाचे बंडहा या सिनेमाचा गाभा फारच लक्षणीय होता. 
समाजाला दिशा देण्याचं काम जो वर्ग नेमस्तपणे करतो, त्याला नाडण्याची, पिडण्याची, लुबाडण्याची, छळण्याची आणि वर त्याचीच हुयरे उडवण्याची रोगट अहमहमिका देशात सुरू आहे. अशा फसवणुकीचा बुद्धी वापरून बदला कसा घेता येतो, याची ही खुमासदार कहाणी अगदी वेगळ्या शैलीतली होती. शिवाय, या दिग्दर्शकाला दिल्ली शहराचा आत्मा गवसलेला आहे, हे त्याच्या पुढच्या सिनेमांमधून स्पष्ट होणारच होतं.
 
फिल्म ऑफ द इयर : लगे रहो मुन्नाभाई
 इतकं विसंगत आणि विसविशीत टायटल धारण करणारा हा सिनेमा मात्र ग्रेट होता. कमर्शियल सिनेमाच्या चौकटीत कुठेही कसलाही आव न आणता केवढा परिणामकारक संदेश देता येतो, याचं हे उदाहरण.  
मुन्नाभाई एमबीबीएसला खूप मागे टाकून हा सिनेमा पुढे आला होता. कारण, या सिनेमात अतिशय चतुराईनं गुंफलेला गांधीजींचा अफलातून ट्रॅक होता. गांधी नावाचं गारुड अजूनही किती प्रभावी आहे, याचं दर्शन या सिनेमानं घडवलं. गांधीगिरीहा शब्द अख्ख्या देशाला बहाल करणाऱ्या या सिनेमानं राजकुमार हिराणीला व्यावसायिक सिनेमांचा दिग्दर्शक म्हणून त्याच्या पिढीत अबव्ह ऑलनेऊन ठेवलं.   
 **************
2006
हे वर्ष मधुमतीचं होतं.. ही जुनी, खानदानी दारू फरहा खाननं नव्या चकचकीत बाटलीत भरली आणि हे कॉकटेल एकदम किकबाज ठरलं. व्यावसायिक सिनेमातली एकमेव यशस्वी महिला दिग्दर्शक बनण्याकडे फरहा खानची वाटचाल या सिनेमानं आणखी बळकट केली. 
अनीस बाज्मीच्या विनोदाच्या बाजाला याही वर्षी प्रेक्षकांची दाद मिळाली. प्रेक्षकांनी या विनोदाला वेलकमकेलं
स्वदेसमधला अभिनय कारकिर्दीतला सर्वश्रेष्ठ म्हणताय काय, हा घ्या चक दे इंडियाअशा ईर्ष्येने शाहरुखनं हॉकी कोच कबीर खान रंगवला. 
तिकडे प्रियदर्शन-अक्षयकुमार जोडीनं भुलभुलय्याच्या रूपानं विनोदी भयपट सादर केला. 
फरहा खानचा भाऊ साजिद खान यानंही हे बेबीच्या रूपानं हिंदीत डायपर विनोद इन्ट्रोडय़ूस केला. 
मणिरत्नमनं बदनाम व्यक्तींची उजळ बाजू आणखी चकचकीत करून मांडण्याच्या उपक्रमाला नायकननंतर ब-याच काळानं पुन्हा हात घातला आणि गुरूतयार झाला. अभिषेकचं झकास काम ही गुरूची जमेची बाजू. ओम शांती ओमसमोर झोकात प्रदर्शित झालेला संजय लीला भन्साळीचा सावरियामात्र सावरू याम्हणायच्या आत आपटला. ब्लॅकनंतर भन्साळी आपल्या स्वप्नांच्या दुनियेत अधिक रमून तीच पडद्यावर आणण्याचा आटापिटा करतोय की काय, असं वाटवणारा हा सिनेमा होता. या सिनेमातून हिंदी पडद्यावर दोन आश्वासक पदार्पणं झाली. रणबीर कपूर आणि सोनम कपूर. वेगळ्याच तारेतलं स्वप्न असावं, असा आणखी एक सिनेमा या वर्षात आला.. नो स्मोकिंग’. तो डोक्यावरून जाणारा असला तरी त्याची चित्रशैली विचारप्रक्रियेशी खेळणारी होती.. दिग्दर्शक होता अनुराग कश्यप. 
आणखी एका अनुरागनं या वर्षी पहिल्यांदाच मेनस्ट्रीमयश मिळवलं. 
अनुराग बसूचा लाइफ इन अ मेट्रोहा प्रमुख पात्रांच्या कधी समांतर जाणा-या तर 
कधी एकमेकांना छेदणा-या जीवनकथांचा बोल्ड कल्लोळ होता.
 
एक चालीस की लास्ट लोकल’, ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.या सिनेमांनी अभय देओल या नटाची दखल घ्यायला लावली. 
हा देओल खानदानातला चिकणा हिरो असूनही व्यायाम न करण्याकडे आणि अभिनय करण्याकडे त्याचा कल दिसत होता. शिवाय त्याला माणसं बुकलण्यात किंवा छोकऱ्या पटवण्यात (पडद्यावर) फारसा रस दिसत नव्हता. उलट जे करायला कोणीही तयार होणार नाही असल्या नॉन हीरो टाइप व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तो उत्सुक दिसत होता. हे प्रकरण औरआहे हे समजत होतं. 
या वर्षात फारशा न चाललेल्या, पण दखलपात्र सिनेमॅटिक कामगिरी असलेल्या जॉनी गद्दारमधून नील नितीन मुकेशचं दमदार पदार्पण झालं.
 
या वर्षावरच नव्हे तर येणा-या अनेक वर्षामधील तरुण-तरुणींच्या भावजीवनावर प्रभाव टाकणारी जब वुई मेटही उत्कट प्रेमकहाणी व्यक्तिगत जीवनातही प्रेमिक असलेल्या शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या सहजसुंदर अभिनयानं आणि वास्तवातील त्यांच्या ब्रेकअपनं यादगार करून टाकली. 
इम्तियाज अलीचं बस्तान बसलं. 
अशीच एक लक्षणीय प्रेमकथा मांडणारा सिनेमा होता चीनी कम’. 64 वर्षाचा तोआणि 34 वर्षाची तीयांची अनोखी प्रेमदास्तान. 
अहाहा! तबू आणि अमिताभ बच्चन यांची अशी काय जुगलबंदी आणि लाह्यांसारखे तडतडणारे डायलॉग. अमिताभ ही काय चीज आहे, याचं अतिशय दुर्मीळ दर्शन या सिनेमानं घडवलं.
 
फिल्म ऑफ द इयर : तारे जमीं पर
 आमिर खान हा भयंकर इसम आहे. तो काहीही करतो आणि ते प्रेक्षकांच्या गळी उतरवू शकतो. तो चक्क सेन्सिबल सिनेमा काढतो. बापाजन्मात ज्याच्या वाटेला कोणी जाणार नाही, असले काहीतरी विषय घेतो आणि मनापासून सिनेमा काढतो.
तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतो आणि गंमत म्हणजे आमिरवर विश्वास ठेवून लोक तो सिनेमा पाहायला आनंदानं गर्दी करतात.. ढसाढसा रडण्यासाठी! हा चमत्कार घडवणारा सिनेमा होता तारे जमीं पर.अभिनेता (तो अभिनयात बालनाही, त्यामुळे अभिनेताच) दर्शील सफारी आणि हरहुन्नरी क्रिएटिव्ह डायरेक्टर अमोल गुप्ते अशा दोन अनमोल देणग्या आमिरनं या सिनेमातून दिल्या. 
***************** 
2008
सगळं देओल खानदान धन्य व्हावं आणि सलमान खानला शर्ट घालण्याची इच्छा व्हावी, असा एक उद्योग आमिर खाननं या वर्षी केला.. गजनीया रक्तपातपटासाठी त्यानं शरीर कमावून सिक्स पॅक अ‍ॅब्ज नावाचं एक फॅड देशात आणलं. मेमेन्टोया क्लासिक सिनेमाची खांडोळी खांडोळी करणा-या या सिनेमात आमिरनं अभिनयाचा नवा प्रकार आणला.. स्नायूअभिनय. 
त्याच्या अक्राळविक्राळ आकारासमोर शाहरुखचा रब ने बना दी जोडीअगदीच काडीपैलवान ठरला. 
आशुतोष गोवारीकरनं जोधा अकबरयांच्या आंतरधर्मीय लग्नाची कहाणी मुघल ए आझममीट्स रायगडाला जेव्हा जाग येतेअँड बोथ मीट क्यूं कि सास भी कभी बहू थीअशा शैलीमिश्रणातून मांडली. अब्बास मस्तान यांचा हिट थ्रिलर देण्याचा परिपाठ रेसनं चालवला. गोलमालचा पाळणा एक वर्षातच हलला आणि गोलमाल रिटर्न्‍सचा जन्म झाला. 
गे मैत्रीचा बोल्ड पदर असलेला दोस्तानाही उत्तम चालला. यात गे शेडच्या व्यक्तिरेखा स्वीकारणा-या अभिषेक आणि जॉन अब्राहमच्या धाडसाचं कौतुक झालं. मधुर भांडारकरनं फॅशनच्या विश्वावर क्ष-किरण झोत टाकला आणि प्रियांका चोप्राला उत्कृष्ट अभिनयाची संधी मिळाली.
 
वेगळय़ा शैलीतला तरी चांगलं यश मिळवणारा रॉक ऑनहा सिनेमा फरहान अख्तरचं अष्टपैलुत्व दर्शवून गेला. रॉक बँडसारखा हिंदीत बिल्कुल नाळ नसलेला विषय या सिनेमात होता. त्यातल्या गाण्यांनीही इंग्रजी गाणी ऐकणारी तरुणाई नादावली. 
अशाच प्रकारचं चमकदार यश श्याम बेनेगल यांच्या वेलकम टु सज्जनपूरनं मिळवलं आणि रुरल इंडिया (स्टिल) रॉक्स हे दाखवून दिलं. या सिनेमात आपल्या श्रेयस तळपदेनं पुरभय्या बोलीचा बाज असा काही उचलला होता की यंव रे यंव!
सरप्राइझ हिट ऑफ द इयर : अ वेन्सडे
 प्रमुख भूमिकांमध्ये नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर. गाणीबजावणी, नाच, हीरो-हीरोइन कुछ नही. असं असूनही विषयाच्या आणि टेकिंगच्या ताकदीवर हा सिनेमा उत्तम चालला. 
दहशतवादाला सामान्य माणसानं दहशतवादानंच उत्तर द्यावं, हा सिनेमातला संदेशथोडा पचनी पडायला अवघड. पण, सामान्य माणसाचं फ्रस्ट्रेशन काय प्रकारचं स्वप्नरंजनमागतं, याचं हे अस्वस्थ करणारं चित्र होतं. 
दहशतवाद्यांच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या सामान्य माणसाची अंगावर काटा आणणारी कथा सांगणारा आमिरफारसा चालला नाही. पण, त्याचीही चर्चा खूप झाली. अमित त्रिवेदी या गुणाढय़ संगीतकाराकडे या सिनेमामुळे लक्ष वेधलं गेलं. 
***************** 
2009
या वर्षी हिंदी सिनेमाच्या इतिहासातला आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाला.. थ्री इडियट्स’. चेतन भगतचं फाइव्ह पॉइंट समवनहे आत्मकथनपर पुस्तक मानवी व्यक्तिरेखांमुळे संस्मरणीय झालं होतं. 
राजकुमार हिराणी आणि अभिजात जोशी या जोडगोळीनं त्यातला फक्त आयआयटी कॅम्पसमधल्या गंमतीजंमतींचा भाग ठेवला आणि कामयाब नही, काबिल बनोअसा संदेश देणारा आदर्शवादी सुपरहीरोकल्पून त्याच्याभोवती सिनेमा फिरवला. 
या सिनेमातून बाकी काही झालं असो वा नसो- बाळाचा जन्म कसा होतो, हे मौलिक ज्ञान भारतवर्षातील सर्व कच्च्याबच्च्यांना झालं. अतिशय प्रभावी, एकदम टाइट पटकथा, ग्रेट अभिनय, अव्वल दिग्दर्शन आणि तुफान धंदा असं सगळं जुळून आलेलं असतानाही हा सिनेमा राजकुमार हिराणीच्या लगे रहो..चा बार क्रॉस करू शकला नाही. चेतनच्या पुस्तकाशी प्रामाणिक राहणारा सिनेमा कदाचित इतका यशस्वी आणि प्रेरक ठरला नसता, पण ह्यूमन डॉक्युमेंट म्हणून अधिक प्रभावी ठरला असता.
इम्तियाज अलीचा प्रेमाचा फॉर्म्युला लव्ह आज कलमध्ये काळात पुढे मागे हेलकावत प्रेक्षकांनाही गुंगवून गेला. 
राजकुमार संतोषी आणि रणबीर कपूर या दोघांच्या गुणवत्तेबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही. 
पण, दोघांनाही एका हिटची गरज होती. ती अजब प्रेम की गजब कहानीनं भागवली. जागतिक दहशतवादाचे पडसाद उशिरानं का होईना हिंदी सिनेमात उमटू लागले. न्यू यॉर्कआणि कुर्बानयांनी त्याची दखल घेतली. 
विशाल भारद्वाजनं कमीनेच्या रूपानं क्वेन्टिन टॅरेन्टिनोला त्याच्या हयातीतच श्रद्धांजली वाहिली. 
शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा या दोघांनाही नेहमीपेक्षा वेगळं काही करण्याची संधी मिळाली. मसालापट नावाची गोष्ट इतिहासजमा होते की काय? आता तसे सिनेमे पाहायचे तर रजनीकांतचा नवा सिनेमा येण्याची वाट पाहायची की हिंदीत डब केलेल्या तामिळ, तेलुगू सिनेमांवर तहान भागवायची, हे सगळे प्रश्न सलमान खानच्या वाँटेडनं (अक्षरश:) एका फटक्यात सोडवले. 
सलमानच्या (अंगा)पिंडाला मानवणारी भूमिका असली की तो काय तो काय बहार उडवतो, हे या सिनेमानं दाखवून दिलं. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या असे चांदनी चौक टु चायना’, ‘डेल्ही सिक्स’, ‘व्हॉट्स युअर राशीअसे अनेक सिनेमे पडले. 
पण, जो सिनेमा न चालल्याचं तो पाहिलेल्या मोजक्या प्रेक्षकांना दु:ख व्हावं, असा सिनेमा होता, ‘रॉकेटसिंग- सेल्समन ऑफ द इयर’. मूल्यशिक्षणाचा तास न घेता मूल्य आणि मोल यांची सांगड कशी घालता येते, हे शिमित अमीनच्या या सिनेमानं रोचक पद्धतीनं शिकवलं होतं.
 
फिल्म ऑफ द इयर : देव डी
 
देवदासची गोष्ट कोणीतरी दारू पिता पिता मावे खात आणि चरस ओढत वाचली असावी आणि त्याच तारेत सादर करावी, अशा विलक्षण रंगरूपात शरदचंद्रांचा देवदासआधुनिक काळातला देव डीबनून आला. मूळ आयडिया अभय देओलची. 
तिला अनुराग कश्यपसारखा दिग्दर्शक मिळाला आणि एक कल्ट मूव्ही जन्माला आली. देव डीचं लेखन, टेकिंग, अभिनय, अमित त्रिवेदीचं फाकडू संगीत या सगळ्याबद्दल तावच्या ताव खरडून काढता येतील. पण, सर्वात महत्त्वाचं आणि नोंदवलंच पाहिजे असं वैशिष्टय़ म्हणजे, या 
सिनेमानं चक्क देवदासला जीवनोन्मुख केलं आणि झक मारत गेली पारो, आता चंद्रमुखी हेच तुझं वर्तमानअसं स्वीकारायला लावलं. ग्रेट!
 
आणि आता सध्या सुरू असलेलं वर्ष.
याला रेट्रोवर्ष म्हणायला हरकत नाही.. 

 या वर्षातला सर्वात मोठा हिट दबंगआणि दुसरा हिट वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, तिसरा हिट राजनीती’.. दहा वर्षाचं चक्र फिरायला सुरुवात झाली होती, तेव्हा वाटलं होतं की आता फक्त मल्टिप्लेक्सचा जमाना आला. आता शहरी सेन्सिबिलिटीचे सिनेमे चालणार किंवा मक्के दी रोटीआणि सरसों दा सागचं अजीर्ण जिरवायला युरोपची सैर घडवणारे चोप्रा-पट तरी. पण, कालचक्र कसं फिरलं पाहा! 
सलमानच्या वाँटेडनं मसाला सिनेमाची मजा कशी असते याची चव पुन्हा चाखवली आणि त्याच मसाल्यात घोळवलेला, वर यूपीवाला तडका दिलेला दबंगपब्लिकनं मल्टिप्लेक्सेसवर उडय़ा मारून बघितला. 
सत्तरच्या दशकातल्या गुन्हेगारीचं त्याच दशकातल्या गुन्हेगारीपटांच्या शैलीत चित्रण करण्याची मिलन लुथ्रियाची आयडियाही सॉलिड क्लिक झाली 
आणि वन्स अपॉन अ टाइम..त्यातल्या खटके पे खटका डायलॉग्जसकट हिट झाला. 
ग्रामीण भारतातल्या राजकारणाचे पदर उलगडणारा राजनीतीआणि याच भागातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या स्टोरीवरून इलेक्ट्रॉनिक मिडियाचे वाभाडे काढणारा पीपली लाइव्हहे सगळे सिनेमे काय सांगतात?
हिंदी सिनेमाचा प्रेक्षक आपली मूळ (अभि)रुची विसरलेला नाही.. वास्तवातली आणि थिएटरच्या अंधारातलीही.. तो चवीत बदल म्हणून पिझा, बर्गर, पास्ता, थाय, चायनीज हे सगळं खाईल.. त्याचीही चव आता ग्लोबल होतेय.. 
पण, उदरभरणासाठी त्याला भरभक्कम बिर्याणी, मसालेदार तंदुरी, चौरस थाळी किंवा गोळे करून मनगटावरून ओघळत्या सांबारासह गटकन मटकावयाचा भाताचा डोंगरच लागतो केळीच्या पानावर...काहीच नाही मिळालं तर वरणभातावर लिंबू पिळलं तरी स्वर्गसुख लाभतं मराठी माणसाला!

(प्रहार,  दिवाळी २०१०)

No comments:

Post a Comment