Thursday, February 24, 2011

थलाईगार (रजनीकांत)



(हीरो आणि व्हिलन यांच्यातला नेहमीचा शाब्दिक खणाखणीचा सीन...)
एकाम्बरम : एकाम्बरम हे नावा घेतलं की अद्याप आईच्या पोटातून बाहेर न आलेलं मूलही तोंड बंद करतं...
अलेक्स पांडियन : आणि त्याच गर्भस्थ मुलासमोर अलेक्स पांडियन हे नाव घेतलं की ते मूल स्वत:बरोबरच स्वत:च्या हातांनी आपल्या आईचंही तोंड बंद करतं...
चित्रपट : मुंद्रू मुघम
अलेक्स पांडियनच्या भूमिकेत : रजनीकांत या सिनेमात रजनीकांतने आणखी दोन भूमिका केल्या होत्या... ट्रिपल रोल. वीसेक वर्षांपूर्वीचा हा सिनेमा आजही तामिळनाडू हाऊसफुल्ल जातो. रजनीकांत व्हिलनला कसा वाजवतो. ते `ऐकायला' पब्लिक वारंवार जात थेटरात.
रजनीकांतचा सिनेमा म्हणजे असला पंचलाइनवाला डायलॉग पाहिजेच पाहिजे.
``मी जे बोलतो, ते करतो... जे बोलत नाही, तेही करतो...''
``कळपानं फिरतात ती डुकरं... सिंह नेहमी एकटाच येतो...''
तामिळी कडकट्टी आघातांनी या फिल्मी पंचलाइन्समध्ये ठासून बारुद भरला जातो. त्यांना, सिगरेट फेकून ओठात झेलून पेटवणं, बंदुकीची गोळी हातानं अडवून रिबाऊंड करणं वगैरे रजनीकांती करामतींची जोड मिळते आणि रजनीकांत जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा तेव्हा थिएटरांमध्ये प्रचंड स्फोट होतो... टाळयांचा, शिटय़ांचा...
सत्यजित राय यांनी फार परखडपणे लिहून ठेवलंय की भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांना सिनेमाच्या पडद्यावर सर्कस पाहायची असते. त्यांना तीन तासांत ऍक्शन, इमोशन, कॉमेडी, सेक्स, देशप्रेम, सत्याचा असत्यावर विजय वगैरे सगळं सगळं ठासून भरलेलं हवं असतं...
रजनीकांत हा या `द ग्रेट इंडियन सिनेमा सर्कस' मधला या घटकेचा सर्वात लोकप्रिय डोंबारी आहे. अतिशय भावनाशील आणि कमालीच्या सिनेमावेडय़ा दक्षिण भारतावर या `थलाईगार'चं राज्य आहे... आणि हे साम्राज्य झपाटय़ानं विस्तारतंय. `शिवाजी द बॉस' या त्याच्या सिनेमात तामिळमधला `'ही ठाऊक नसणाऱयांना भारतभर कसं वेड लावलंय ते पाहा. म्हणजे त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. `अंधा कानून' या त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमात, हिंदीचे प्रेक्षक हा काळा, राकट हिरो कसा स्विकारतील, या सार्थ भयानं त्याला सुपस्टार अमिताभ बच्चनची (अर्धा सिनेमाभर पसरलेल्या `गेस्ट अपीअरन्स'ची) कुबडी घ्यावी लागली होती. आज त्याच अमिताभच्या आणि हिंदीतल्या सुपरस्टार्सच्या पाच- दहापट पैसे तो एका सिनेमासाठी घेतोय आणि असली शहेनशहा कोण, अमिताभ की रजनीकांत, अशा खमंग चर्चा मीडियामध्ये रंगल्या आहेत.
एक भाषिक अभिनेता असलेला रजनीकांतची लोकप्रियता जपानमध्येही कळसाला भिडलीये. त्याचा `मुथ्थू' जपानमध्ये सुपरहिट होता. `शिवाजी...'ला ब्रिटन आणि अमेरिकेत पहिला आठवडा हाऊसफुल्ल करणारं बुकिंग मिळालंय. भारतीय मसालापटांना नाकं मुरडणारे गोरे आता हाच मसाला भुरकून भुरकून ओरपताहेत.
रजनीकांतचा सिनेमा हा आता जवळपास लुप्त होऊ पाहणाऱया भारतीय मसालापटांचा सर्वात स्ट्राँग अर्क आहे.
साठीचा हा हीरो म्हणजे लोकप्रियतेचं एक अजब रसायन आहे. देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. व्यक्तिगत जीवनात तो टक्कल आणि काळ्यातले पांढरे केस न लपवता वावरतो. आपल्या कुटुंबाचं खासगी आयुष्य प्राणापलीकडे जपतो.
सार्वजनिक शोबाजीसाठी कुख्यात असलेल्या दक्षिण भारतात तो कुठल्याही समारंभात चमच्यांची फौज घेऊन जात नाही. शक्य तेथे स्वत: गाडी ड्राइव्ह करत जातो. सेटवरही त्याचे नखरे नसतात. झोप आली, तर एसी व्हॅनमध्ये न जाता तो सेटवरच एखाद्या कोपऱयात डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवून आडवा होतो.
याच साध्या माणसाचं कॅमेऱयासमोर मात्र कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. मेकपची कमाल त्याला ऍक्चुअली तिशीचा बनवते. डोळ्यांत (के. बालचंदरनी 32 वर्षांपूर्वी पहिली भूमिका देताना पाहिलेला) अंगार फुलतो. जिभेवर सरस्वती नाचू लागते आणि अंगात ऍक्रोबॅट संचारतो... तो पडद्यावर बहुतेक वेळा ऍक्रोबॅटिक्सच करत असतो.
त्याच्या सिनेमाला `चीप' म्हणून हिणवणं सोपं आहे... पण, त्याचा सिनेमा बनवणं सोपं नाही. त्यात त्याच्यासारखं काम करणं तर त्याहून अवघड आहे. तो पैसे घेतो ते पडद्यावरच्या सगळ्या अविश्वसनीय करामती कमालीच्या `कन्विन्सिंग' करण्याचे.

त्याच्या या अदेनंच आज पिटातल्या पब्लिकबरोबर क्लासेसनाही जोडून घेतलंय. त्याचा सिनेमा मल्टिप्लेक्सला धो धो चालतोच, पण त्याहून ओसंडून वाहतात ती सिंगल स्क्रीन थिएटर्स. मसाला सिनेमांचा तो शेवटचा (?) `थलाईगार' आहे... थलाईगार म्हणजे लीडर... पुढारी.
दक्षिणेतले त्याचे चाहते मात्र वाट पाहताहेत ती त्यांचा प्राणप्रिय थलाईगार सिनेमाच्या चौकटीतून बाहेर पडून तामिळनाडूची राजकीय सूत्रं कधी हाती घेतोय याची. चो रामस्वामींसारख्या जाणत्या पत्रकारालाही रजनीनं राजकारणात यावं असं वाटतं. त्यांना त्याच्यात साधेपणा आणि सच्चेपणा यांच दुर्मीळ मिश्रण दिसतं...
... स्वत: रजनीकांत मात्र फिल्मी अंदाजमध्ये उत्तर देतो, ``काल मी बस कंडक्टर होतो, आज नट आहे, देवाच्या कृपेनं उद्या काही वेगळाच होऊ शकतो!''
...त्याची ही पंचलाइनही नेहमीप्रमाणे सुपरहिट आहे.

(महाराष्ट्र टाइम्स)

Wednesday, February 23, 2011

लाडला (हृतिक रोशन)

लहानपणापासून तो तसा बुजराच होता...
चारचौघांत आत्मविश्वासानं वावरण्यासारखी स्थितीही नव्हती... जीभ जड, उच्चार तोतरे, चेहरा देखणा, पण अंगकाठी फाटकी. त्यात चहूबाजूंना 'यशस्वी' आईबापांची चमको मुलं. त्यांच्या तुलनेत याचे बाबा तर फ्लॉपमध्येच जमा होणारे...
...तरीही एकदा त्यानं निर्धार केला आणि प्रचंड मेहनतीनं तोतरेपणा पूर्ण घालवून टाकला...
...हुश्श करेपर्यंत पुढच्या वळणावर पुढची सत्त्वपरीक्षा वाट पाहात होती... ऐन एकविशीत स्कॉलिऑसिस या मणक्यांचा किचकट आणि चिवट विकारानं त्याची अक्षरश: 'पाठ धरली'... या आजारात त्याला साधं चालणंही मुश्कील होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं... मग नाचणं, मारामाऱ्या, स्टंट्स, चपळ हालचाली वगैरेंची बातच सोडा!...
ही त्याच्या आयुष्यभराच्या स्वप्नावरची कचकचीत लाल फुली होती... एन्ड ऑफ अ ड्रीम... तो कधीही रुपेरी पडद्यावरचा 'हीरो' होऊ शकणार नव्हता... अगदी लहानपणापासून त्याला एकदा तरी सुपरमॅनसारखं उडायचं होतं... तीही इच्छा अधुरीच राहणार होती...
...पण, त्याच्या जिद्दीपुढे तो हटवादी आजारही झुकला आणि सुपरमॅनसारखं आकाशात मुक्त विहरण्याचं त्याचं स्वप्न बत्तिशीत पूर्ण झालं... आज तो भारताचा पहिला 'सुपरहीरो' बनलाय... आबालवृध्दांचा लाडला 'क्रिश'...
...त्याला लहानपणापासून ओळखणारे आप्तमित्र म्हणत असतील, 'पडद्यावर आता झाला असेल हो, आमचा हृतिक लहानपणापासून सुपरहीरोच होता...' कारण, सदोदित 'झीरो'चाच बट्टा लागावा, अशा अनेक कमतरतांवर हृतिकनं लहानपणापासून चिकाटीनं, जिद्दीनं मात केलीये.... तोही कोणताही गाजावाजा न करता.... डिंडिम न पिटता.
पिताश्री राकेश रोशन हा दुसऱ्या फळीतला दुय्यम नट. हेमामालिनीचा नायक बनूनही आणि काही सिनेमांत बरी कामं करूनही त्याच्या मागचा 'ऑल्सो रॅन'चा शिक्का काही टळला नव्हता. जीतेंद्रअंकल, ऋषी कपूरअंकल या सक्सेसफुल अंकललोकांच्या घोळक्यात आपल्या वडिलांना नॉनएन्टिटी बनून बसलेलं हृतिकनंही पाहिलं असणार बऱ्याचदा. स्वत: राकेशनं कधीतरी सांगितलंय, 'जीतू आणि ऋषीच्या सहीसाठी उत्सुक चाहत्यांचा घोळका मला पालांडून जायचा अनेकदा तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं.'
तोतऱ्या हृतिकला बोलक्या करीना, करिश्मा, अभिषेक, टि्वंकल, तुषार, एकता यांच्या कंपूत वेगळं काय वाटलं असेल हो? तो एका फ्लॉप बापाचा हकल्या मुलगा होता... नॉट टू बी काउंटेड अमंग्स्ट दि हॉट ऍंड हॅपनिंग!
पण, राकेश रोशन मुळात हुशार. तो व्हाया के. विश्वनाथ आधी सेन्सिबल सिनेमाकडे आणि नंतर दिग्दर्शनाकडे वळाला. दिग्दर्शक म्हणून सर्वसमावेशक, सबगोलंकारी व्यावसायिक सिनेमाची लंबीचवडी पुडी बांधण्याची त्याची सवय अगदी 'क्रिश'मध्येही सुटलेली नाही. (याला अपवाद फँटास्टिक 'खेल'चा, पण तो पडला.) व्यावसायिक यशाचा बऱ्यापैकी मंत्र गवसलेल्या डिरेक्टर राकेश रोशनची गाडी व्यवस्थित चालू लागली. या गाडीचा एक छोटासा खिळा होता हृतिक रोशन. ज्याला पडद्यावर सिनेमाच्या शेवटच्या बारीक टायपातल्या श्रेयनामावलीतही क्रेडिट मिळालं नाही, असा राकेश रोशनचा पाचवा-सहावा असिस्टंट. तसं लहानपणापासून हृतिकला सिनेमातच यायचं होतं. म्हणूनच आजोबा जे. ओमप्रकाश यांच्या सुपरहिट 'आशा'मध्ये 'जाने हम सडक के लोगों से महलोंवाले क्यों डरते हैं' या खास सडकछाप गाण्यात तो जीतेंद्रबरोबर दे धूम नाचला होता. त्या गाण्यासाठी आजोबांनी दिलेले 100 रुपये ही त्याची पहिली कमाई. 'आप के दीवाने' आणि वडिलांच्या 'भगवानदादा'मध्येही त्यानं फुटकळ भूमिका केल्या होत्या.
कधीतरी हीरो बनण्याचं स्वप्न उरात दडवून तो वडिलांकडे असिस्टंटगिरी होता. राकेश रोशन हा नियतीनंच कायम जमिनीवर ठेवलेला इसम. त्यानं तो वारसा लेकाकडे सोपवला. असिस्टंटनं असिस्टंटच्याच औकातीत राहावं हा त्याचा पृथ्वीराज कपूरी शिरस्ता. दिग्दर्शक म्हणून बऱ्यापैकी यशस्वी वडिलांचा असिस्टंट हृतिक सेकंड क्लासनं प्रवास करायचा, कॅमेरा उचलायचा, क्रेन हलवायचा, शॉट सुरू असताना जमिनीवर फतकल मारून बसायचा... (हृतिक सांगतो की, अजूनही ती सवय सुटलेली नाही... तो कधीमधी एकदम क्रेनला हात द्यायला धावतो, शॉटला वेळ असेल तर जमिनीवर बिनधास्त बसतो... मग कुणीतरी स्पॉटबॉय येतो आणि 'सर, ये आप क्या कर रहे है?' असं विचारून हृतिकला त्याच्या 'सर'कीची जाणीव करून देतो)
...तोतऱ्या, स्कॉलिऑसिसग्रस्त, मुखदुर्बळ, न्यूनगंडग्रस्त अशा या बालकात लहानपणापासून एक अजब ऊर्मी होती, अभिनयाची. जाम किडा होता ऍक्टिंगचा. एकदा राकेशनं विचारलं, 'बेटा डुग्गू, तुला पुढे जाऊन काय बनायचंय?'
डुग्गू म्हणाला, 'ऍक्टर बनायचंय.'
दुधानंच नव्हे, तर ताकानंही तोंड पोळलेल्या राकेशनं त्याला समंजस बापाप्रमाणे आणखी काही वेळ विचार करण्याचा सल्ला दिला होता. अनेक वर्षं विचार केल्यानंतरही डुग्गूची आकांक्षा बदलली नव्हती. हा पठ्ठया बापाच्या 'कोयला'च्या शूटिंगच्या काळात शाहरुखनं केलेला प्रत्येक सीन पॅकअपनंतर त्याच लोकेशनवर एनॅक्ट करायचा. त्यानं पटवून ठेवलेली कॅमेरामनची माणसं तो शूट करायची आणि फुटेज चूपचाप काढून त्याच्याकडे सोपवायची. 'कोयला'च्या एडिटिंगच्या वेळी शिफ्ट संपल्यावर ही रिळं चढवून हृतिक आपल्या स्वत:च्या ऍक्टिंगचा अंदाज घ्यायचा. त्यातच 'करण अर्जुन'च्या काळात सलमाननं त्याला सांगितलं होतं, 'बेटा ऍक्टिंग कर ले, चमकेगा.' बॉडी बनवायला आपलं प्रायव्हेट जिमसुध्दा खुलं करून दिलं होतं त्यानं.
'कहो ना प्यार है' शाहरुखला घेऊनच करायचा प्लॅन होता राकेशचा. तसं त्यानं सांगितल्यावर डुग्गू म्हणाला, 'डॅड, शाहरुखला घेऊन तुम्ही टीनएज लव्हस्टोरीचा पोर्शन कसा करणार? इट विल लुक रिडिक्युलस. हे एखाद्या न्यूकमरला घेऊन करायचं पिक्चर आहे.' काही महिन्यांनी राकेशच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानं डुग्गूला सांगितलं, 'बेटा आय ऍम लाँचिंग यू विथ 'कहो ना प्यार है'! हृतिक म्हणाला, 'मला तयारीला वेळ हवाय.' राकेशनं चार महिने दिले. हृतिकनं किशोर नमित कपूरचा ऍक्टिंग क्लास जॉइन केला. अनुपम खेरअंकलचं ऍक्टिंग वर्कशॉप केलं, उर्दूची शिकवणी लावली आणि चार महिन्यांत राज आणि रोहित आत्मसात केले. रोहित... साधासुधा, निर्मळ, सोज्वळ, साधा, गरीब, सालस, स्वप्नाळू. आणि राज... स्टायलिश, डायनॅमिक, डॅशिंग, क्लासी, अग्रेसिव्ह. एकदम दोन ध्रुवांवरचे दोघे.
'कहो ना...' धो धो चालला यात नवल काहीच नव्हतं... सिनेमात जोश होता, स्क्रिप्ट टाइट होतं, गाणी तुफान होती आणि आजवरच्या कोणाही डेब्युटंटला मागे सारणारा सफाईदार, कडक अभिनय हृतिकनं केला होता... त्यानं पदार्पणात बेस्ट डेब्युबरोबरच बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड जिंकलं, त्याक्षणी सुपरस्टार शाहरुखलाही आपली इनसिक्युरिटी लपवता आली नव्हती.
हिंदी सिनेमाच्या हीरोला लागणारं सगळं काही एका ठिकाणी कुठे एकवटलेलं असेल, तर ते हृतिक रोशनमध्ये. निर्विवाद अभिनयकौशल्य, इंटरनॅशनल अपील असलेला देखणा चेहरा, पिळदार शरीर, अचाट नृत्यकौशल्यहिंदी-उर्दूवर प्रभुत्व, रोमँटिक हीरोचा गोडवा आणि ऍक्शन हीरोचा जोश... सब का मालिक एक!... तरीही पुढे 'कहो ना...'च्या उंचीचं यश मिळवायला हृतिकला पुन्हा वडिलांचाच सिनेमा करावा लागला... विधु विनोद चोप्रा, सूरज बडजात्या, सुभाष घई, फरहान अख्तर अशा मातब्बरांचे सिनेमे केल्यानंतरही. 'फिजा', 'मिशन काश्मीर', 'लक्ष्य'मधल्या त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं, पण 'सोलो' व्यावसायिक यशाचा टिळा लावण्यासाठी पुन्हा वडिलांचं बोट पकडून 'कोई मिल गया'च करावा लागला आणि आता 'क्रिश'...
हृतिक साधा सरळ आहे, हा त्याचा 'दोष' ठरतोय आजच्या जमान्यात. त्याच्या सिनेमाच्या पडद्याबाहेरच्या वागण्याबोलण्यात 'मसाला' नाही. खासगी आयुष्यात 'चमचमीत' काही नाही. तो पाटर्यांमध्ये धुमाकूळ घालत नाही, कोकेन स्नॉर्टिंग करत नाही, गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन रात्र रात्र भुंकत नाही, लोकांना मोबाइलवरून धमकावत नाही, गाडयांखाली चिरडत नाही, हरणं मारत नाही, पोरी फिरवत नाही... फक्त पडद्यावर मेहनतीनं सिन्सीअरली कडक ऍक्टिंग करतो आणि चूपचाप घरी जातो... अच्छा बच्चा... हाऊ बोअरिंग!
...म्हणूनच नॉटी, नॅस्टी, डार्क हीरोंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरण्या पोरीबाळींपेक्षा हृतिकचं अपील लहान मुलांमध्येच सॉलिड आहे...
...ही गोष्ट कुत्सितपणे सांगणारे एक गोष्ट विसरतात...
आज वयाच्या बत्तिशीत पाच-सात वर्षांच्या चिल्ल्यापिल्ल्यांचा तो सुपरहीरो आहे... त्यामुळेच ही मुलं बत्तिशीत पोहोचतील, तेव्हाही तो त्यांचा हीरो असू शकेल...
...तेवढी त्याची कुवतही आणि आणि सुपरजिगरही!

(महाराष्ट्र टाइम्स, १ जुलै, २००६) 

मणिभायचा टच नाय! (गुरू)

''कायदा तोडला म्हणून तुम्ही माझ्यावर कारवाई करायला निघालात... काही वर्षांपूर्वी असाच एक माणूस या देशात होऊन गेला होता. तोही कायद्यांविरुध्द लढला होता. फरक इतकाच की तो ब्रिटिशांच्या कायद्यांविरुध्द लढला, मी तुम्ही बनवलेल्या कायद्यांविरुध्द लढतोय. मी काही बापू नाही. पण, मला मोठं व्हायचंय आणि मी मोठा होणारच. त्यासाठी जिथे पैसे फेकावे लागतील, तिथे पैसे फेकणार, जिथे सलाम करावे लागतील, तिथे सलाम ठोकणार. पण मी मोठा होणारच...''
क्लायमॅक्सच्या दी एन्डला गुरुभाय हे सॉलिड भाषण ठोकतो... सिनेमातलं 'इन्क्वायरी कमिशन' अगदी मेलोड्रमॅटिकली भारावून जाऊन गुरुभायला मुक्त करतं आणि 'मी-माझा उत्कर्ष' याच्यापलीकडे काहीही पाहायला तयार नसलेलं, शेअर बाजाराच्या जुगारी अड्डयाचा 'आकडा' हा देशाच्या विकासाचा निर्देशांक समजणारं पब्लिक या महापुरुषाच्या थोर वचनांना टाळया-शिटया ठोकतं आणि काहीएक समज, भान शिल्लक असलेला प्रेक्षक कपाळावर हात मारून घेत म्हणतो, ''फरक एवढाच नाहीये गुरुभाय... बापू आणि तुम्ही गुजरातेत जन्मलात, इथेच साम्य संपलं. बाकी सगळा फरकच आहे. गांधींना त्यांच्या मूठभर 'शेअरहोल्डरां'च्या नव्हे, तर सबंध राष्ट्राच्या उत्थानाची काळजी होती. त्यांचा कायदेभंग देश जागवण्यासाठी होता आणि तुमचा कायदेभंग देशाच्या अर्थकारणाला कसर लावणारा, कायद्याला बटीक बनवणारा. गांधींच्या समोर या देशातला सगळयात गरीब माणूस होता. तुमच्यासमोर फक्त तुम्ही... ओन्ली गुरुभाय!''
...एवढी सगळी फिलॉसॉफी झाडण्याआधी मणिरत्नमच्या चाहत्यांना विचाराल, तर ते म्हणतील, मणिभाऊंच्या लाडक्या बदकांच्या, धबधब्यांच्या, चवळीशेंग फटाकडीच्या आयटम साँग्जच्या, बॅकलायटिंगच्या, पावसाच्या सोसापलीकडेही सांगण्यासारखं मणिभाऊंकडे काही असायचं, पाहण्यासारखं प्रेक्षकाला काही गवसायचं. इथे मात्र जत्रेत आईबापाचा हात सुटलेल्या पोरासारखे भिरभिरलेत मणिभाय.
साम-दाम-दंड-भेद वगैरे सर्व वापरून, कोणताही विधिनिषेध न बाळगता सरकारी यंत्रणाही पोखरून, वापरून, आड येणाऱ्या प्रत्येक माणसाला विकत घेऊन रिलायन्सचं साम्राज्य वाढवणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतलेला मणिरत्नमचा 'गुरू' हा अर्धकच्चा आणि अनपेक्षितपणे निराशा करणारा, मध्यम दर्जाचा सिनेमा आहे. ना धड प्रेमकथा, ना धड चरितकहाणी, ना धड संघर्षकथा असा काहीतरी गडबडगुंडा होऊन या सिनेमाची गोधडी होऊन बसली आहे... आता खास मणिरत्नम शैलीतली प्रसंगांची हाताळणी, काही चमकदार सीन्स, सगळयाच कलावंतांचा ए वन अभिनय, ए. आर. रहमानचं संगीत, राजीव मेननची सिनेमॅटोग्राफी, इतर तांत्रिक बाबी ही ठिगळं भरजरी आहेत खरी; पण...
...आपल्या मणिभायनी त्यांच्या परीनं पण केला आहे तो या देशातल्या समकालीन समस्यांचा, वास्तवाचा, व्यक्तींचा वेध घेण्याचा. कमर्शियल चौकटीत राहून असलं काही 'डोक्याला खुराक' छापाचं सुचणंच मुळात कौतुकास्पद. त्यात मणिभायच्या 'रोजा', 'बाँबे'ला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची पसंती लाभली. 'दिल से' डब्यात गेला असला, तरी तो उत्तम होता, अशी उपरती नंतर पब्लिकला झाली, समीक्षकांना तो आवडला होताच. आता या सिनेमांमध्ये मणिभायनी काश्मीर प्रश्, मुंबईतल्या जातीय दंगली आणि ईशान्य भारतातला असंतोष असे समकालीन प्रश् हाताळले होते. त्याबद्दल त्यांचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करताना आपण हे विसरलोच की मणिभायनी सांगितलीये ती त्यांच्या खास शैलीतली एक प्रेमकथा... समस्या आहे ती बॅकड्रॉपला... पार्श्वभूमीपुरती. मुख्य सिनेमा आहे तो उत्कट प्रेमाचा.
 'गुरू'मध्ये मणिभायचे वांधे नेमके इथेच झालेत. हा सिनेमा गुरुकांत देसाई आणि सुजाता या पतीपत्नींमधली नाटयमय प्रेमकथेचा नाहीये ना! इथे गुरुकांत देसाई नावाच्या येनकेनप्रकारेण 'बडा आदमी' बनू पाहणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. लक्ष देऊन पाहा. जेवढा वेळ, म्हणजे मध्यंतरापर्यंत, प्रेमकथेचा, मानवी संबंधांचा भाग प्रबळ आहे, तोवरचा 'गुरू', त्यातल्या अनेक घोटाळयांसकटही पाहण्यायोग्य आहे. तो प्रेक्षकाला बऱ्यापैकी बांधून ठेवतो. जिथे मणिकाकांना गुरूच्या उत्कर्षाची, तत्कालीन उद्योगजगताची, राजकारणी-उद्योजक साटयालोटयाची, लायसन्स-परमिट राजच्या दुष्टचक्राची कहाणी मांडण्याची वेळ येते, तिथे ते जामच गळाठतात आणि मग आधी मोकळी जमीन आणि डिझॉल्व्ह टु रेडीमेड फॅक्टरी, अशा मोंताजमधून तो प्रवास उरकून मोकळे होतात. मध्ये काय झालं? ही फॅक्टरी उभी करताना काय अडचणी आल्या? लालफीतशाहीनं कशी अडवणूक केली, त्यावर मार्ग कसा निघाला, हे काहीच नाही.
आता कुणी म्हणेल की असे ना का असं, आपलं काय जातंय? तर उत्तर असं आहे की आपला इंटरेस्ट जातो ना दादा. कारण असा एका सीनमध्ये घडणारा उत्कर्ष दाखवणारे डायरेक्टर इथे पैशाला पासरी पडलेत मुंबईत. त्याला मणिरत्नम कशाला पाहिजे! आणि आपल्या गुरूभायला नंतर दी एंडला भाषण ठोकायचंय ना जोरदार. ते कशाच्या आधारावर ठोकणार तो, ते दिसायला नको?
सहसा दिग्दर्शक अडकतात ते वकिलीच्या खोडयात. म्हणजे, एक कथा असते. तिच्यात एक मुख्य पात्र असतं. जोवर ते मुख्य पात्र असतं, तोवर त्याच्यात मानवी गुणदोष असतात. ते पात्र करडया छटांचं राहतं. पटकथाकार-दिग्दर्शक जेव्हा त्या पात्राच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो त्याचा 'हीरो' बनवतो... आणि स्वत: बनतो हीरोचा वकील. हीरो जे काही करेल, ते कसं 'बरोबर आणि अपरिहार्य' आहे, हे पटवण्याचा त्याचा धंदा सुरू होतो. मणिभायचं गुरूभायच्या बाबतीत तेच झालंय. फक्त बिनपुराव्याची केस उभी केल्यानं दी एंडला त्याची वकिली चौपट होते.
धीरूभाई अंबानी या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामधली 'मोठं होण्याची' आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची झिंग खरंतर मणिभायनी पूर्वार्धात व्यवस्थित पकडलीये. त्यात अभिषेकनं धीरूभाईंचं निरागस हास्य अगदी सही सही उचललंय. या माणसाला पैशाशी, त्यातून येणाऱ्या सुखांशी काही घेणंदेणं नाही; यश, अधिक यश, त्याहून अधिक यश यांचीच त्याला नशा आहे, त्यासाठीच तो हरप्रकारे मुसंडी मारतो, असं आपल्याला वाटतं. पण, लायसन्स-परमिट राजची चौकट मोडणं, उद्योगजगतातल्या प्रस्थापित मक्तेदारांना, त्यांच्या संस्थानांना शह देणं वेगळं आणि गंडवागंडवी करून एक्स्पोर्ट लायसन्स मिळवणं, नाना प्रकारच्या डयुटीज बुडवणं, क्षमतेपेक्षा जास्त उत्पादनाचे कारखाने उभारणं हे वेगळं. आधीचा भाग सिनेमॅटिक ऍंटिहीरोइझम म्हणून तरी क्षम्य आहे, दुसरा भाग हा उघडउघड देशद्रोह आहे. त्याचं उदात्तीकरण कसं योग्य ठरेल? आणि 'मी माझं एकटयाचं भलं केलं नाही, 30 लाख शेअरहोल्डर्सचंही भलं केलं', हे गुरूभायचं, एकदम अपीलिंग वाटणारं लॉजिकही पोकळ आणि भयकारी आहे. गुरूच्या कंपनीचे 30 लाख समभागधारक हा काही संपूर्ण देश नाही. त्यांचं भलं करताना त्यानं या देशातल्या किती यंत्रणांना आपण भ्रष्टाचाराची, जी हुजुरेगिरीची कसर लावली, ते समर्थनीय आहे? मग आज रिलायन्सचे अधिकारी सरकारी सुटीच्या दिवशी सरकारी ऑफिसांत बसून सरकारी कामकाज करताना दिसतात, त्याबद्दल त्यांना भारतरत्नच द्यायला हवं!
असल्या उफराटया तत्त्वज्ञानाची वकिली करताना जास्त जोर लावावा लागतो. तो न लावता मणिभाय मोंताजवर भागवून नेतात. कोणत्याही प्रोसेसच्या खोलात जात नाहीत. हा वरवरचेपणा समजून घ्यायचा तर या सिनेमातले एकंदर पत्रकारितेचे रेफरन्स पाहा. रिपोर्टरची कार्यशैली पाहा. आणि गुरूभायच्या बातम्यांचे पेपर पाहा. प्रत्येक पेपरात प्रत्येक वेळी आठ कॉलमी हेडलाइनच्या खाली नावच नाही! मणिरत्नमचा गुरूभाय उद्योगजगतातल्या किंवा राजकारणातल्या डावपेचांना जेमतेम स्पर्श करून पुन्हा आपल्या कौटुंबिक झोपाळयावर सुजाताबेन नी साथे झुलायला मोकळा होतो. तेच करत राहतो. आणि मणिकाका बदकांच्या थव्यात, पांगळया मुलीच्या लव्हस्टोरीत, महालांसारख्या सेट्सवरच्या निरर्थक नाचांमध्ये वगैरे जीव रमवत फिरायला मोकळे होतात.
एका वयानंतर हा गुरू 'गॉडफादर'च्या डॉन कॉर्लिओनीसारखा दिसायला लागतो, तसेच गाल फुगवून बोलतो. मग त्याला आठवण होते, ''माझ्या बाबांनी 'अग्निपथ' नावाचा सिनेमा केला होता.'' मग तो 'अग्नीपथ'मधल्या विजय दीनानाथ चौहानची नक्कल करत असल्यासारखा वागूबोलू लागतो. 'अग्नीपथ'साठी अमिताभला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अभिनयाचा. इथे अभिषेकला असा पुरस्कार मिळण्याची सुपारी घेतल्यासारखी त्याची व्यक्तिरेखा बेतली गेलीये. अभिषेकचा सध्याचा खुरटी दाढीधारी पॉप्युलर, सेक्सी लुक सोडून सफाचट लुक देणं (सफाचट अभिषेकच्या चेहऱ्यावर दिसणारा अवघडलेला निरागसपणा टिपल्याबद्दल मात्र मणिरत्नमला दाद द्यायला हवी), कोणत्याही गेटअपविना वयातली वाढ दाखवणं, त्यात वृध्द अभिषेकला लकवा भरवून तसं बोलायला लावणं, असे आपल्याकडे हुकमी अवॉर्ड मिळवून देणारे फंडेही 'गुरू'मध्ये आहेत. आणि अभिषेकनं 90 टक्के काळ अतीव मेहनतीनं या रोलमध्ये रंग भरलेत. हा अभिनयाची सणसणीत भूक असलेला हावरा अभिनेता आहे खरा! ऐश्वर्या, मिथुन चक्रवर्ती, माधवन, विद्या बालन यांच्यासह सगळीच मंडळी या सिनेमात वेगळी दिसतात आणि कडक अभिनय करून जातात. 'जोड जोड जोडियाँ' या, बहुधा भांगेच्या तारेतच बनवलेल्या, महापकाव गाण्याचा अपवाद वगळता रहमानचं संगीत ए वन छे! पण, सगळी गाणी स्पीडब्रेकरसारखी उपरी होतात... साक्षात मणिरत्नमच्या सिनेमात!
...असं म्हणतात की एखाद्या फिलॉसॉफीवर आपला विश्वास नसेल, तर तिची मांडणी करताना आपण गोत्यात येतोच. 'गुरू'चं तसं झालं असेल, तर बरंच आहे. निदान मणिभाय पुढच्या सिनेमात लायनीवर येतील, अशी आशा तरी करता येईल.

(महाराष्ट्र टाइम्स, २००७) 

हम (एकदाचे) दिल दे चुके सनम!


''अर्रर्रर्र चक चक! (सुस्कारा)
हाय रे दैवा! (दीर्घ सुस्कारा)
गेलं राव गिर्रेबाज पाखरू उडून! (प्रदीर्घ सुस्कारा)''
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लाँग अवेटेड साखरपुडयाची बातमी ऐकून भारतवर्षातल्या तमाम युवावर्गाची ही किंवा अशी प्रतिक्रिया झाली असेल, अशी कुणाची समजूत झाली असेल, तर ते नंदनवनात वावरत आहेत... कुणाच्या ते सांगायची गरज नाही.
मुळात 'ऍश'कडे ते अपील नाही.
अं हं हं! गैरसमज नको. हिंदी सिनेमाच्या नटीकडून ज्या प्रकारच्या आवाहक अपीलची अपेक्षा केली जाते, ते ऐश्वर्यामध्ये आहेच. (ते आपल्यात किती आहे, हे अक्षरश: दाखवण्याचा प्रयत्न तिनं नुकताच 'धूम 2'मध्ये करून दाखवलाय.)
पण, उपरोल्लेखित सुस्कारे सोडण्यासाठी, हळहळण्यासाठी जे अपील लागतं, ते ऍशमध्ये नाही.
तसं व्हायला, संबंधित पोरगी 'अ गर्ल यू कॅन टेक होम टु युवर मॉम' अशी असावी लागते... म्हणजे सोप्या मराठीत 'बायको मटिरियल'! ते आपल्या माधुरी दीक्षितमध्ये होतं. तिनं नेन्यांच्या नावाचं कुंकू भांगात भरलं, तेव्हा अखिल भारतवर्षात किती बांगडया फुटल्या असतील, त्याची गणती नाही. माधुरीत प्रेयसीची आवाहक मादकता होती आणि बायकोचं घरगुती अपील. म्हणूनच तिनं 'मला फक्त बटाटयाची भाजी येते' असं एका मुलाखतीत सांगताच तिचे चाहते तिन्हीत्रिकाळ ओन्ली पोटॅटो डाएटवर गेले आणि स्वत: बटाटयासारखे झाले. हे अपील आज विद्या बालनमध्ये आहे, पण ऍशमध्ये नाही.
ही गंमतच आहे. कारण, खरंतर ऐश्वर्या ही 'घरेलु' छापाची मुलगी. सुरुवातीच्या काही भूमिकांमध्येही तिनं हाच 'साधीसुधी सुंदरी'पणा जपला होता. नंतर 'ताल'मधला ग्लॅमरस लुक, 'आ अब लौट चले'मधली बिकिनी, 'चोखेर बाली'मधली उघडी पाठ, 'इश्क कमीना'चे लटके झटके, 'कजरारे कजरारे'मधली मादक अदा आणि आता 'धूम 2' मधला मोकळेपणा यातूनही तिचा तो घरेलुपणा काही सुटलेला नाही खरा! पण, तरीही, 'शी इज नॉट माय कप ऑफ टी' हेच फीलिंग कुठल्याही तरुणाला तिच्याकडे पाहून येतं.
एकतर तिची सुरुवातच 'मिस वर्ल्ड'सारख्या आंतरराष्ट्रीय किताबापासून झाली. आता या मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड म्हणजे आम पब्लिकसाठी मनातल्या मनातही 'फक्त पाहा' कॅटेगरी. तिच्या त्या वेळच्या सौंदर्यात एक खानदानी नजाकत होती आणि रॉयल ग्रेस. आता राजकुमारी काही गावखात्यातल्या लाकूडतोडयाच्या किंवा पाणी खात्यातल्या कारकुनाच्या हातात गावत नाहीत. त्यांची शोभा महालात, राजकुमाराच्या वामांगी.
दॅट डझन्ट मीन की राजकुमारीला कुणी फँटसाइझ करत नाही. पण, ऍशच्या रेखीव सौंदर्यात ऊबदार आवाहन नव्हतं, जाणवायचं ते मेणासारखं थंडगार बाहुलीपण... सुंदर, पण निर्जीव.
तिच्यात ऊब जाणवू लागली ती 'हम दिल दे चुके सनम'पासून. त्यात ती हंड्रेड परसेंट बायको मटिरियल दिसली होती. पण, त्याच सुमारास तिच्या आणि सलमानच्या वादळी अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. खल्लास. हे झाडही एका मर्कटानंच झपाटलं! आता ऍश आणि सलमान यांच्या स्वभावांची जरा जरी कल्पना असलेल्या कुणालाही हे प्रकरण म्हणजे अळवावरचं पाणी आहे, हे लक्षात आलंच असतं. ते तसंच निघालं. पण, त्यातून ऍशच्या नुकत्याच कुठे निर्माण झालेल्या अपीलला धक्का बसलाच. सलमानच्या त्रांगडयातून सुटण्यासाठी या बाईनं विवेक ओबेरॉयचा हात धरला, तेव्हा तर पब्लिकनं 'गॉन केस' म्हणून कपाळावर हात मारून घेतला होता. ही 'टाइमगॅप अरेंजमेंट' आहे, हे तर एक विवेक सोडल्यास अख्ख्या जगाला पहिल्या दिवसापासून कळलं होतं. मग आला अभिषेक... आणि मॅटर सेटलच झालं.
ऐश्वर्या हा ग्रह तमाम युवकांच्या कक्षेत कधी आलाच नाही; मग तिच्या जाण्याचे दु:ख कोण करी?
आता प्रश् उरतो तो तिच्या लग्नाचा तिच्या करीयरवर होणाऱ्या परिणामांचा.
अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे श्रीदेवी, माधुरीपर्यंत नटीचं लग्न झालं की ती नायिका म्हणून बाद झाली, असं सरळ समीकरण होतं. कारण, व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला त्यातल्या नटयांबरोबर मनोमन फँटसाइझ करायचं असतं. त्यासाठी ती 'प्राप्य' असणं गरजेचं असतं. ती लग्न करून 'अप्राप्य' झाली की तिच्याबद्दलचं आकर्षण सरलंच समजायचं.
पण, आता हे चित्र अगदी असंच उरलंय का? जुही चावलानं कितीही लपवलं, तरी तिचं जय मेहताशी लग्न झालंय, हे समस्तांसि ठाऊक झाले होतेच. प्रीटी झिंटा अजूनही अनमॅरिड असेल कदाचित, पण म्हणून तिची नेस वाडियाबरोबरची कम्पॅनियनशिप काही पब्लिकच्या नजरेतून सुटलेली नाही. बिपाशा-जॉन अब्राहम आणि करीना-शाहिद कपूर या तर या इंडस्ट्रीतल्या बिनधास्त जोडया. बिपाशा आणि जॉन एकत्रच राहतात, अशी पब्लिकची समजूत आहे आणि करीना अधूनमधून शाहिदच्या घरी जाऊन 'स्वयंपाक' करते, हेही जगजाहीर आहे. हल्लीच्या प्रेमीयुगुलांना 'वुई आर जस्ट फ्रेण्ड्स' म्हणून झाकपाक करावी लागत नाही, ते बेधडकपणे 'वुई आर सीईंग ईच अदर' असं सांगतात आणि म्हणजे काय, ते पाटर्यांमध्ये, फिल्मी समारंभांमध्ये स्वच्छपणे दिसत राहतं.
या सगळयाच नटया आम पब्लिकसाठी 'बुक्ड' आहेत, 'लायसन्स'धारक. पण, म्हणून 'बिडी जलाइले'तली बिपाशा 'भाभी' वाटत नाही किंवा 'ये मेरा दिल'मधल्या करीनाच्या झटकेबाज अदा 'फक्त शाहिदसाठी' वाटत नाहीत. आणि असलीच उदाहरणं कशाला चघळा. 'कॉर्पोरेट'मधली बिपाशा आणि 'ओमकारा'मधल्या करीनाच्या अभिनयाच्या आस्वादाआडही त्यांचं 'एंगेज्ड' असणं येत नाहीच.
जमाना बदल गया है मामू!
या नटयांचा पडद्यावरचा वावर आणि पडद्यामागचं आयुष्य यांची गल्लत पब्लिक करत नाही. 100-150 रुपये मोजून मल्टिप्लेक्सच्या खुर्चीत प्रेक्षक विसावतो, तेव्हा त्याला फक्त समोरच्या पडद्याशी मतलब असतो...
...या नटनटयांच्या त्यापलीकडच्या 'खेळां'ची जागा गॉसिप कॉलम्समध्ये आणि तेवढयापुरतीच आहे, ये पब्लिक समझ गयेली है!

(महाराष्ट्र टाइम्स, २००७)

Tuesday, February 15, 2011

फिनिक्स (संजय दत्त)

लेखाचं हे नाव वाचूनच अनेक भुवया वक्र झाल्या असतील... अनेक तोंडं वाकडी झाली असतील...
'फिनिक्स'?!...
 एक दीड दमडीचा नट, बडया बापाचा बिघडलेला बेटा, 'त्या' देशद्रोह्यांशी संधान साधलेला हाही देशद्रोहीच...
...त्याची काय औकात फिनिक्स वगैरे म्हणवून घेण्याची!... ह्या सिनेमावाल्यांनी चढवून ठेवलेत हे फडतूस नट!...
...आपल्या तथाकथित न्यायबुध्दीला कठोरात कठोर न्याय देण्यासाठी नेहमीच फक्त सिनेमावाले सापडतात... व्हेरी व्हल्नरेबल टार्गेट्स! त्यांची सगळी हीरोगिरी फक्त पडद्यापुरती असते. पडद्याबाहेर ती अतिसामान्य, असहाय माणसंच असतात... त्यांयाभोवती ना हितसंबंधियांचे गोतावळे असतात ना आंधळया अनुयायांचा फौजफाटा... कुणीही त्यांच्याबद्दल काहीही बोला...
...बोला हो, बिनधास्त बोला... पण, हेही आठवा की या माणसानं केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे, तिची सजा भोगली आहे, देशद्रोहाचा ठपका 13 वर्षं कपाळावर ठसठसत्या जखमेसारखा वागवला आहे... त्यासंबंधीच्या कायद्याखाली नाना यातना सहन केल्या आहेत. इथल्या अधिकृत न्यायव्यवस्थेनं संपूर्ण तपासाअंतीच त्याला देशद्रोहाच्या आरोपातून 'बाइज्जत बरी' केला आहे...
...पण संजय दत्तला 'बोलक्या' समाजमनाकडून असा न्याय मिळणं फार कठीण आहे... ते भाग्य त्याच्या नशिबात नाही... आता पन्नाशीच्या नजीक आला तरी त्याची पॉप्युलर इमेज व्यसनी, बाईबाज, गुंड प्रवृत्तीचा राडेबाज सांड अशीच आहे... कुणी त्याचा मन:पूर्वक तिरस्कार करतं, तर कुणाला त्याच्या या 'रांगडे'पणाचं जबर आकर्षण वाटतं... पण, त्याच्या आसपासची चारदोन गिनीचुनी टाळकी सोडली, तर त्याला सरळमार्गी, चांगला माणूस म्हणून कुणीच गणत नाही... संजूबाबा मनानं फार चांगला, उमदा वगैरे आहे, असं त्याचे मित्र, नातेवाईक, इतकंच काय, त्याच्या संपर्कात येणारे साधेसुधे लोकही सांगत असले, तरी त्याची लहानपणापासूनची चाल वाकडीच राहिली आहे, हेही खरंच... वाईटाचं त्याला बालपणापासून अतीव आकर्षण आहे की काय, देव जाणे! अतिशय सज्जन, सालस आईबापांच्या पोटी हा असला बेटा म्हणजे तुळशीत भांग, हे एकदम सोपं ऍनालिसिस आहे... अशा घरात जन्मलेला मुलगा बिघडावा आणि तो बिघडतो आहे, याची साधी शंकासुध्दा त्याच्या आईबापांना येऊ नये, हे फारच विलक्षण आहे... ड्रग ऍडिक्शन हे सहजगत्या लपून राहणारं व्यसन नसताना त्याला डि-ऍडिक्शनसाठी परदेशात नेण्याची स्थिती येईपर्यंत कसं कुणालाच काही कळलं नाही, हे गूढच आहे...
...आठवा 'रॉकी'मधला तो झोपाळू डोळयांचा झिपऱ्या, पेंगळट कोवळा पोरगा... सुनील दत्तपेक्षा नर्गिससारखा दिसणारा पण अभिनयात आईपेक्षा बापाच्या दगडीपणाशी अधिक नातं सांगणारा... संवादफेक, भावाभिव्यक्ती वगैरेचं वारंही न लागलेल्या या नटाच्या पहिल्याच सिनेमात चर्चा झाली ती टीना मुनीमबरोबरच्या त्याच्या हॉट हॉट प्रेमप्रकरणाची... नंतरही बराच काळ फक्त त्याच्या अनेकानेक अफेअर्सचीच चर्चा होत राहिली... जणू, हिंदी सिनेमातल्या आकर्षक माद्यांच्या कळपातला तो उद्दाम, उन्मादी नर होता... रती अग्निहोत्री ते रेखा अशी त्याची अफाट 'रेंज' असल्याची चर्चा होती...
...शिवाय ड्रग्जच्या विळख्यातून महत्प्रयासानं बाहेर आलेला संजय दत्त कोणत्याही ऍडिक्टप्रमाणे चेनस्मोकर झाला होता. इतर कोणत्याही व्यसनांचं त्याला वावडं नव्हतंच. त्याच्या लेखी ती व्यसनं तरी होती की नाही, कोण जाणे! त्याची ती 'लाइफस्टाइल' होती. महेश भटबरोबरच्या 'नाम', 'सडक', 'कब्जा' वगैरे थोडक्या सिनेमांचा अपवाद वगळता पडद्यावर फारसं नाव घेण्यासारखं तो काही करतच नव्हता. 'जॉनी आय लव्ह यू', 'मेरा फैसला', 'मेरा हक', 'नामोनिशान', 'मर्दोंवाली बात' असल्या त्याच्या त्या काळातल्या सिनेमांची नावं घेतली, तर या सिनेमांचं कथानक त्यालाही आठवायचं नाही कदाचित. 'त्यात कोणती नटी होती आणि...' असे काही रोमांचक तपशील आठवतील कदाचित. पडद्यावर अत्यंत सुमार कामगिरी करूनही या पोरात काहीतरी जबरदस्त 'ऍनिमल अट्रॅक्शन' होतं, नटयांबरोबरच देशापरदेशात कुठेही गेला तरी एकाहून एक फाकडू पोरींच्या उडयाच पडायच्या त्याच्यावर आणि तोही दयार्द्र दाता बनून कोणाही सुंदरीला कधी विन्मुख पाठवायचा नाही.
या काळातही त्याच्या कारकिर्दीवर फुल्ली मारली जाण्याचे असंख्य प्रसंग आले. कधी त्यानं बेंगलोरला बंदूक घेऊन केलेला राडा असो किंवा कधी रेखाच्या 'प्रकरणा'त बापाच्या तोंडाला आणलेला फेस... हा इसम कधीतरी बाराच्या भावात जाणार आहे, हे लख्खपणे दिसायचं. कारकिर्दीच्या बाबतीत बेफिकीरच असल्यानंही अनेकदा त्याच्या फ्लॉप्सची मालिकाच लागायची आणि आता हा संपला कायमचा, अशी हाकाटी व्हायची. पण, या राखेतून तो पुन्हा उभा राहायचा. एखादा 'थानेदार', एखादा 'हथियार', 'एखादा 'योध्दा' त्याला तात्पुरता हात द्यायचा. गडी पुन्हा रेकनिंगमध्ये यायचा.
सलमान-माधुरीबरोबरचा 'साजन' आला आणि एक वेगळाच संजय दत्त लोकांसमोर आला. भावखाऊ भूमिका सलमानची असली तरी सहानुभूती आणि पोरगी संजूला मिळाली... त्याहूनही मिळाली ती सुपरहिटची ऊब आणि संयत अभिनयाबद्दलची दाद. मग, 'सडक'च्या महारानीमुळे पुन्हा सुपरहिटची चव चाखता आली आणि संजय दत्त कारकिर्दीच्या दहाव्या वर्षात प्रथमच '' ग्रेडमध्ये आला. आता हा घोडा सुसाट सुटणार, अशी खात्रीच सुभाष घईच्या 'खलनायक'नं दिली होती... पण, त्या वळणावर त्याच्या कपाळावर खऱ्याखुऱ्या खलनायकत्वाचा शिक्का बसला... एका रात्रीत हा उगवता सूर्य नतद्रष्ट देशद्रोही ठरला... (नंतर काहीजणांच्या लेखी तो पुन्हा एका रात्रीत पुन्हा उगवता सूर्य बनल्याचा चमत्कारही पाहायला मिळाला.) गुंडपुंडांशी ठेवलेल्या संबंधांतून त्यानं शस्त्र बाळगण्याची घोडचूक केली होती, पण त्यातून बाँबस्फोटांसारख्या भीषण कटाशी त्याचा संबंध जोडला गेला होता... त्याच्या समर्थनार्थ थोडाफार आवाज झाला तरी निर्विवादपणे त्याच्या बाजूनं उभं राहण्याचा गाढवपणा करायला कोणीही धजत नव्हतं... महेश भटसारखे अपवाद वगळून.
...एकदा या प्रकरणात गोवला गेल्यानंतर त्यानं यातनांचा नरक भोगला... महाराष्ट्राच्या एका बडया काँग्रेसी नेत्यानं सुनील दत्तबरोबरच्या मतभेदांचं उट्टं काढण्यासाठी संजय दत्तला बख्शू नका, असा संकेत दिला आणि पोलिसांनी हात धुवून घेतले... प्रत्यक्षात त्यानं काय गुन्हा केला, हे सिध्द व्हायचं होतं... केलेल्या चुकांची कबुली तर त्यानं प्रत्यक्ष बापासमोर देऊन त्या सालस माणसालाही खचवून टाकलं होतं... पण, तरीही त्याचा भयाण वनवास संपला नव्हता... कारण, प्रसिध्द असणं, हीरो असणं, पैसेवाला असणं आणि मुस्लिमधार्जिण्या सुनील दत्तचा मुलगा असणं, हे 'गुन्हे' त्याच्यावर शाबित झाले होतेच... त्यांची 'शिक्षा' त्याला रोज मिळत होती... त्या दीड वर्षात त्याची सगळी अकड संपली, हिरोगिरी लोळागोळा झाली, डोळयांत साशंकता आणि भीती कायमची वस्तीला आली.
...पुन्हा एकदा राख होऊन तो तुरुंगाबाहेर आला तेव्हा त्याच्यापाशी काहीही नव्हतं, बायको गमावली होती, मुलगी परकी झाली होती, संकटकाळात प्रेमिकेनं पाठ फिरवली होती आणि सिनेमावाले त्याला घ्यायला कचरत होते... ज्या वनवासात त्यानं हे सर्व गमावलं, त्याच वनवासानं त्याला लाखमोलाची मॅच्युरिटीही दिली... ती त्याच्या अभिनयात दिसू लागली... मुळात 'अभिनय' दिसू लागला... 'दुश्मन', 'हसीना मान जाएगी', 'काँटे', 'जोडी नं. 1' अशा वेगवेगळया पिंडांच्या सिनेमांमध्ये तो वेगवेगळा दिसू लागला... 'वास्तव'मध्ये तर त्याला लाइफटाइमचा टेरिफिक रोल मिळाला. पण त्याची खरी मॅच्युरिटी दिसली ती 'मिशन कश्मीर'मध्ये. हृतिक रोशनची आई म्हणून सोनाली कुलकर्णीला पाहणं जितकं आश्चर्यकारक होतं, त्याहून मोठा धक्का बापाच्या भूमिकेतल्या संजय दत्तनं दिला... तो त्याचा 'बाप' होऊन गेला आपोआप!
एकीकडे संजय गुप्ता, महेश मांजरेकर अशा दोस्तकंपूच्या साथीनं कधी बरे, कधी वाईट सिनेमे सुरू होते. अधूनमधून एखादा चमकदार सिनेमा येत-जात होता. अशात शाहरुख खानसाठी लिहिलेला आणि त्यानं नाकारलेला मुन्नाभाई साकारण्यासाठी राजू हिराणीला चक्क संजूबाबाचं नाव सुचलं... आणि आज मुन्नाभाई म्हणून दुसऱ्या कुणाचा विचारही करणं शक्य नाही. मुन्नाभाईच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये अभिनयाचा जिम्मा सर्किट आणि बापूंवर जास्त होता... तरीही मुन्नाभाईचा रफटफ गोडवाही होता आणि तो संजय दत्तचाच होता... नव्हे अजूनही आहे...
...अख्ख्या देशाला 'गांधीगिरी'चा चस्का लावणारा एक सुपरहिट सिनेमा आणि त्याचवेळी पुन्हा राख करू शकणाऱ्या 'टाडा'च्या खटल्याची टांगती तलवार... एकाच वर्षात एकाच काळात भोगावा लागणारा हा केवढा मोठा कॉन्ट्रास्ट! पण, संजय दत्तचं अख्खं आयुष्यच अशा अतीव विरोधी रंगांच्या बेभान फटकाऱ्यांनी रेखाटलंय...
तो नायक आहे की खलनायक, ह्याची चर्चा फजूल आहे... ती कोणत्याही बाजूनं एकांगीच राहणार...

...आपण एवढं समजावं की तो आपल्यातुपल्यासारखाच आणि जरा जास्ती स्खलनशील माणूस आहे, त्याच प्रकारच्या चुका, घोडचुका करणारा.
...'पकडा गया वो चोर है' या न्यायानं गुन्हेगार ठरलेला...
...केवळ पकडले न गेल्यामुळेच साव ठरलेले अनेक गणंग आपल्या अवतीभवती, सिंहासनांवर, उच्चासनावर, हृदयसिंहासनांवर वगैरे मुक्कामी असताना उगाच ह्याला का झोडपा? त्याच्या कर्मांनी त्याला कमी झोडपलंय का?...
...लक्षात ठेवायचंच असेल, तर हे ठेवावं की जेव्हा जेव्हा, 'हा आता कम्प्लीट संपला' म्हणून नियतीसुध्दा त्याच्यावर काट मारते, तेव्हा तेव्हा तो त्या राखेतूनसुध्दा उभा राहतो आणि आधीपेक्षा पुढे झेपावतो...
...आत्ताही काही वेगळं होणार नाही...

... गॅरंटी है भाय, लगी बेट?

(महाराष्ट्र टाइम्स)