Thursday, April 28, 2011

आमिरचा नॉकआऊट पंच (गुलाम)


फिल्मी दुनियेतल्या तमाम पैलवानांनो, सावधान!!
एक नवा ऍक्शन हीरो पैदा झालाय... आमिर खान.
आश्चर्य वाटतंय ना? अनेकांना तर कुत्सित हसूही फुटलं असेल. आमिर खान...? ओठ पिळले तर दूध निघेल असा दिसणारा चिकनाचुपडा हीरो. कुणीही दोन कानफटात मारल्या तर पाणी मागेल असं वाटतं त्याची गिड्डी अंगकाठी आणि गुलगुलीत चेहरा पाहिल्यावर! पोरीबाळींबरोबर झाडांमागे पाठशिवणीच्या लव्हस्टोऱया करण्याऐवजी ऍक्शन फिल्म करतोय? ऍक्शन फिल्मच्या भाषेत बोलायचं तर `ये जायेगा बाराके भावमे... सीधा वरली के गटर में!'
आमिरचा ऍक्शन हीरो बनण्याचा पहिला प्रयत्न असलेला `बाजी' आपटल्यावर अनेकांची ही भावना झाली होती. `हे तो आमिकरचे काम नोहे' म्हणून मंडळी टाळ्या पिटीत होती. `गुलाम'मधून आमिरनं तमाम टीकाकारांच्या नाकाडांवर जबरदस्त पंच मारला आहे.... नॉकआऊट पंच.
`गुलाम'चा नायक सिद्धार्थ मराठे हौशी बॉक्सर आहे. एका झोपडपट्टीवजा वस्तीत राहणारा अनपढ टपोरी. त्याचा मोठा भाऊ (रजित कपूर) वस्तीच्या दादाचा- रौनक सिंग ऊर्फ रॉनीचा (शरद सक्सेना) एक पित्तू. बॉक्सिंग, टपोरीगिरी, भुरटेगिरी, दारूबाजी आणि मौजमस्ती करत फिरणाऱया सिद्धार्थ ऊर्फ सिद्धूची एकदा अलिशा मफतलाल (रानी मुखर्जी) या बडय़ा घरच्या बेटीशी `टसल' होते. चार्ली (दीपक तिजोरी) या तिच्या मुजोर मित्राचा सिद्धू नक्षा उतरवतो आणि सिद्धा तिच्या मनात उतरतो.
एकीकडे ही लव्हस्टोरी फुलत असताना दुसरीकडे रॉनीचं अत्याचारसत्र आणि दहशतीचं राज्य निर्धोक सुरू असतं. गोरगरिबांवर जुलुमाच्या काही घटना सिद्धूच्या नजरेसमोर घडत असतात. पण स्वत: रॉनीसाठी किरकोळ गुंडगिरीच्या कामगिऱया पार पाडणारा सिद्धू या जुलमांकडे दुर्लक्ष करतो. `जियो और जीने दो' या स्वत:च्या सोप्या सोयीस्कर तत्त्वज्ञानानुसार वागत राहतो.
 त्याला पहिला धक्का देतो हरी (अक्षय आनंद) हा सामाजिक कार्यकर्ता. रॉनीच्या दहशतीविरुद्ध झोपडपट्टीवासियांना संघटित करू पाहणाऱया हरीची निर्भय निरलस वृत्ती सिद्धूला त्याच्या दिवंगत स्वातंत्र्यसैनिक पित्याची (दिलिप ताहिल) आठवण करून देते. वडिलांनी दिलेले संस्कार आपण बासनात गुंडाळून ठेवले आहेत, याची टोचणी सिद्धूच्या मनाला लावते.
 त्यात एकदा हरीला `समजावण्या'साठी रॉनी सिद्धूमार्फत त्याला रेल्वेपुलावर बोलावून घेतो. हरी सांगून समजण्यातला नाही, हे लक्षात आल्यावर त्याला सिद्धूच्या डोळ्यांदेखत पुलावरून फेकून देऊन ठार मारतो. सिद्धू पहिल्यांदाच बेभान होऊन थेट रॉनीच्या अंगावर धावून जातो... त्याचा भाऊ थोडक्यात हे प्रकरण मिटवतो. गरीबांच्या वस्तीत तनमनधन अर्पून त्यांच्या हितासाठी झगडणारा हरी हा सुखवस्तू अलिशाचा भाऊ होता हे समजल्यावर सिद्धूला दुसरा हादरा बसतो. आपला भाऊ गैरमार्गावर चालतोय आणि आपण त्याच्यामागे फरफटतोय, हे लक्षात आल्यावर सिद्धू रॉनीविरुद्ध न्यायालयात साक्ष द्यायला तयार होतो. रॉनीवर समन्स बजावलं जातं. झोपडपट्टीवर नांगर फिरवून बडा बिल्डर बनण्याची स्वप्नं पाहणाऱया रॉनीचे सारे बेत उधळण्याचा धोका निर्माण होतो.
 सिद्धूची समजूत काढायला गेलेल्या भावाला सिद्धू एकदम खरीखोटी सुनावून टाकतो. सिद्धू ऐकणार नाही म्हटल्यावर त्याच्या भावाची हत्या अटळ असते. ती होतेच. सूडानं आंधळा झालेला सिद्धू रॉनीचा बदला घ्यायला निघतो. पण, त्याच्यातलं स्वत्व जागं करणारी वकील बाई (मिता वसिष्ठ) त्याला अडवते. रॉनीला खऱया अर्थानं संपवायचं तर त्याला न्यायालयात खेचायला हवं, हे ती सिद्धूला पटवून देते.
न्यायालयात सिद्धूनं साक्ष दिल्यावर रॉनीच्या संतापाचा उद्रेक होतो. तो वस्तीत येऊन सिद्धूचं घर उद्ध्वस्त करून टाकतो. दहशतीच्या बळावर संपूर्ण वस्तीत `बंद' घडवून आणतो. माणसं असूनही सुनसान झालेल्या वस्तीत सिद्धू पाऊल टाकतो तेव्हा त्याच्यासमोर आव्हान असतं रॉनीची पाशवी ताकद संपवण्याचं... त्याची दहशत खच्ची करण्याचं.
  हे काम तो कसं करतो ते अनुभवण्यासाठी `गुलाम'चा प्रदीर्घ आणि अत्यंत बुद्धीमानपणे रचलेला कळसाध्याय (क्लायमॅक्स) प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवा. एरवीचे, ऍक्शन हीरो पिस्तुलं, बंदुकी, बॉम्ब वापरून, रक्ताचा सडा शिंपून खलनायकाचा नि:पात करतात. यातलं काहीही न करता सिद्धू खलनायकाला खच्ची करून अधिक मोठा परिणाम साधतो हे `गुलाम'चं सर्वात मोठा यश आहे.
आमिरसारखा शारीरिक मर्यादा असलेला अभिनेता एकावेळी पंचवीसजणांना हातोहात लोळवतोय, हे आपल्याला पाहायला रुचलं नसतं. ते टाळूनही ऍक्शन फिल्मला साजेसा क्लायमॅक्स रचल्याबद्दल लेखक अंजुम राजाबली आणि दिग्दर्शक विक्रम भट खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत.
  अंजुम यांची अत्यंत बंदिस्त पटकथा आणि आमिरचे सर्व गुणदोष लक्षात ठेऊन रचलेला नायक ही `गुलाम'ची बलस्थानं आहेत.
  आमिर ऍक्शन हीरो कसा, असा प्रश्न पडणाऱयांना सनी, सुनील शेट्टी, अक्षयकुमार हे ऍक्शन हीरो कसे, असा प्रश्न पडत नाही; कारण त्यांची सणसणीत उंची आणि बलदंड शरीरयष्टी. पण जरा विचार करून पाहा किंवा चुकूनमाकून कधी खरी मारामारी पाहिली असेल तर आठवून पाहा.
  सनी- सुनील- अक्षयइतक्याच उंचीच्या ताकदीच्या माणसावर पाच-पंचवीस तुटून पडले तर तो त्यांना लिलया लोळवू शकतो का? खऱया मारामारीत सिनेमातल्यासारखे नायकाच्या सोयीनं (खरंतर त्याच्याकडून मार खाऊन घेण्यासाठी) गुंड रांग लावून हल्ला करीत नाहीत. ते गिधाडांसारखे तुटून पडतात एकदम.
 मग सिनेमातली नायकाची एकतर्फी मारामारी आपण कशी चालवून घेतो? ते स्वप्नरंजन असतं. जे वास्तवात घडतं ते पाहायला आपण थिएटरात जात नाही; वास्तव कसं असावं, याची आपली कल्पना साकार स्वरुपात पाहण्यासाठी जातो.
 किरकोळ शरीरयष्टीचा मुद्दा बाद करायचा तर आपल्या `परिचया'चे सगळे `डॉन' आठवा. यातला कोण राकट आणि बलदंड होता वा आहे? सगळी आपल्यातुल्यासारखी माणसं... काही तर आपल्यापेक्षा किरकोळ अंगकाठीची. ते मोठमोठय़ा महानगरांवर राज्य करतात, अनेक बलदंड गुंड पोसतात ते शरीराच्या नव्हे तर अकलेच्या ताकदीवर. पैलवान गुंड हे मारामारीची कामं रोजंदारीवर करणारे मजूर असतात त्यांचे.
  `गुलाम'चा नायक सिद्धू रेखाटताना लेखक अंजुम यांनी या गोष्टीचं अचूक भान ठेवून बाजी मारलीये. सिद्धू गिड्डा, चिकणाचुपडा असला तरी बॉक्सर आहे, त्याची शरीरयष्टी बलदंड नसली तरी पिळदार आहे आणि टपोरीपणातून आलेली `अरे ला का रे' करण्याची वृत्ती आहे. त्याचं अंतिम रिळांमधलं शौर्य हा या वृत्तीचा परिपक्व आहे. तो सुरुवातीला नायिकेवर इंप्रेशन मारण्यासाठी तिच्या मित्राबरोबर पैज लावून सुसाट वेगाने येणाऱया लोकलगाडीच्या दिशेने रुळांवरून धावत जाण्याचं अचाट धाडस करतो. हा शॉट तीन कोनांमधून दाखवून त्यात `ट्रिक' नाही; आमिरनं स्वत:च हे धाडस केलंय, हे दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनावर ठसवतो. प्रेयसीला भेटण्यासाठी पाईपावरून बावीस मजले चढून जाणारा सिद्धू जिगरबाज आहे, हेही प्रेक्षकांवर बिंबवल जातं.
  रॉनीसाठी एका क्रिकेटपटूला धमकावायला गेलेला सिद्धू त्या उंच- तगडय़ा क्रिकेटवीराशी मारामारी करत नाही. तो हिंसक भाषा वापरून, त्याच्या बॅटनं टॉयलेट उद्ध्वस्त करून त्याला गर्भगळित करतो. वास्तवातल्या गुंडांची दहशत माजविण्याची पद्धत हीच असते. त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी शारीरिक हिंसा करावी लागत नाही.
 इतर ऍक्शनवीरांप्रमाणे आमिरचा सिद्धू कुंगफू, कराटे, मार्शल आर्टस्, कुस्ती आणि इतर द्वंद्वकौशल्यांचं बाळकडू प्यायल्यासारखी मारामारी करीत नाही, हे `गुलाम'चं आणखी एक वैशिष्ट आहे. तो बॉक्सर आहे त्यामुळे त्याच्या मारामाऱयांमध्ये मुष्टीयुद्धावरच जास्त भर दिसतो. प्रसंगी (विशेषत: क्लायमॅक्समध्ये) ताकदवान प्रतिस्पर्धी असेल तर तो बेदम मारही खातो.
नायकाभोवतीचे प्रसंग रचताना, इतर पात्र रेखाटताना अंजुम यांनी वास्तवाशी इमान राखून त्यावर कल्पिताची चपखल कलाकुसर केली आहे. सिद्धूच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचं सतत फ्लॅशबॅकमध्ये दिसणारं पात्रच पाहा.
  स्वातंत्र्यसंग्रामात आपल्याला ब्रिटिशांनी कसं पकडलं होतं आणि दोन दिवस त्यांचे निर्घृण अत्याचार सहन करू आपण आपल्या साथीदारांचा ठावठिकाणा त्यांना कसा कळू दिला नाही, याची शौर्यगाथा ते लहानग्या सिद्धूला वारंवार साभिमान सांगत असतात. एक दिवस त्यांचा जुना मित्र भेटायला येतो आणि सिद्धूच्या वडिलांनी ब्रिटिशांना नावं सांगितल्यामुळेच पाच क्रांतिकारक मारले गेले होते, हे सिद्धूसमोरच उघड होतं. त्याचे शरमिंदे वडील स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करतात. सिद्धूचा हा अस्वस्थ करणारा भूतकाळ पटकथेत अंजुम यांनी चपखलपणे वापरला आहे.
  सिद्धूचं भावाशी असलेलं नातं स्पष्ट करणारी बॉक्सिंगची मॅच हाही `गुलाम'चा हायलाईZट आहे. सिद्धू भावासाठी ही मॅच जाणीवपूर्वक हरतो त्यावेळीच पुढील उद्रेकाची नांदी होते. हरी हा अलिशाचा भाऊ असल्याचं त्याच्या मृत्यूनंतरच सिद्धूला आणि प्रेक्षकांना समजतं; तो धक्काही पटकथाकार- दिग्दर्शक यांनी सुरेख वापरलाय.
 या बुद्धिमान मांडणीमुळेच सुरुवातीचा काही काळ `रंगीला'चा मुन्नाच वाटणारा सिद्धू हळूहळू आपलं वेगळेपणा सिद्ध करतो. तो जातो `घायल', `घातक'च्या मार्गानंच, पण बाहुबळाबरोबर बुद्धीबळ वापरून शारीरिक सामर्थ्याची उणीव भरून काढतो.
 अर्थात `गुलाम' हा काही परिपूर्ण सिनेमा नाही. गल्लापेटीच्या सोयीसाठी() यात नायिका आहे. तिची स्वप्नगीत, पाऊसगीतं आहेत. स्वप्नात हिमशिखरांवर जाऊन आमिरनं आपल्याच `पहला नशा'च्या (जो जिता वही सिकंदर) स्लो-मोशन हालचालींमध्ये गायलेली गाणी आहेत. सामाजिक कार्यकर्त्याची भाषणबाजी आहे. नायकाच्या मदतीला अचानक धावून येणाऱया उपनायकाचा भंपकपणाही आहे.
  पण, वास्तवाच्या खूप जवळ जाणारी तरीही नाटय़मय मांडणी आणि पटकथेतले `फ्रेश' प्रसंगात प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतात. त्यासाठी शरद सक्सेनापासून रजित कपूर, मिता वसिष्ठ, अक्षय आनंदपर्यंत गुणवान पण प्रेक्षकांना अतिपरिचित न झालेले कलावंत वापरण्याची चतुराई विक्रम भटनं दाखवली आहे. शरद सक्सेनाला मुख्य खलनायक साकारण्याची मिळालेली ही पहिलीच मोठी संधी त्यानं सार्थकी लावली आहे. रजित, मिता, अक्षय यांचा सहजाभिनय `गुलाम'ला वास्तवाचं परिमाण द्यायला उपयोगी पडतो.
 राणी मुखर्जीला अभिनयकौशल्य दाखवायला फारसा वाव नव्हताच. पण, ती दिसेत छान, वावरते सहज आणि थोडाबहूत अभिनय करण्याच्या प्रसंगांमध्ये बुजत नाही. ती `अभिनेत्री' आहे हे तिनं यापूर्वीच `राजा की आयेगी बारात'मध्ये सिद्ध केलं होतं. `गुलाम'मध्ये ती टिपिकल हिंदी नटीची कर्तव्यं लिलया पार पाडते.
 अर्थात `गुलाम'चा सर्वात मोठा स्टार आहे आमिर खान. पटकथेपासून दिग्दर्शनापर्यंत सर्व खात्यांमध्ये रस घेतल्याखेरीज तो सिनेमाच करत नाही. फिल्मी दुनियेत याला ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप म्हणतात. पण, वर्षातून एकदोन सिनेमे करणारा आमिर आपल्याकडून कोणतीही कसर राहणार नाही, याची काळजी घेत असतो. (त्यामुळेच `गुलाम' आमिरनंच दिग्दरर्शित केलाय, अशी चर्चा झाली.)
 आमिरच्या या सवयीमुळे त्याच्या सिनेमांकडून प्रेक्षकांच्या मोठय़ा अपेक्षा असतात. तो आपल्याला काहीतरी वेगळं आणि प्रेक्षणीय देईल, अशी खात्री असते. `गुलाम'मधून त्यानं या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. `गुलाम'चा क्लायमॅक्स केवळ त्यात आमिर आहे म्हणूनच तसा घडतो आणि आमिरमुळेच प्रेक्षकाला पटतो- आवडतो, त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिका आणि चित्रपटांमध्ये `गुलाम'चा क्रम बराच वर लागेल, यात शंका नाही.
 `गुलाम'मुळे दिग्दर्शक विक्रम भटवरचा `अपयशी दिग्दर्शका'चा शिक्का धुवू निघण्याची शक्यता आहे. पण, या यशावर निर्विवादपणे अधिकार सांगण्यासाठी त्याला आमिरशिवाय आणि `गुलाम' इतकाच परिणामकारक सिनेमा करून दाखवण्याची कसोटी द्यावी लागेल.
 छायालेखक धर्मा तेजा यांनी सुरुवातीला ग्लॅमरस सॉफ्ट फोकस तंत्र आणि पुढेपुढे वास्तवाधारित प्रखर प्रकाश योजना वापरून `गुलाम'ची परिणामकारकता वाढवली आहे. `जादू हे, तेरा ही जादू है', `आँखो से तुमने ये क्या कह दिया' आणि सुपरडय़ुपर हिट `आती क्या खंडाला' ही सणसणीत गाणी जतीन-ललित यांनी दिली आहेत. अमर हळदीपूर यांचं पार्श्वसंगीतही `गुलाम'च्या आशयाला पूरक ठरतं.
  हिंदी सिनेमांना हल्ली गल्लापेटीवर लागलेल पनवती संपवून यशाचं अधिराज्य प्रस्थापित करण्याचा वकूब `गुलाम'मध्ये निश्चितच आहे.
...................
निर्माता : मुकेश भट
दिग्दर्शक : विक्रम भट
गीते : इंदीवर, समीर, नितीन रायक्वार, विनू महेंद्र
संगीत : जतीन- ललित
छायालेखक : धर्मा तेजा
ऍक्शन : अब्बास हनीफ
कलाकार : आमिर खान, रानी मुखर्जी, रजित कपूर, मीता वसिष्ठ, दीपक तिजोरी, अक्षय आनंद, शरद सक्सेना, दिलीप ताहिल.
.........................
(महाराष्ट्र टाइम्स)

दोन बायका चंगळ ऐका!(घरवाली बाहरवाली)


हिंदी सिनेमांचे वरवर पाहता बरेच प्रकार दिसतात... कौटुंबिकपट, हास्यपट, ऍक्शनपट, प्रेमपट वगैरे. पण नीट निरखून पाहिलं तर यातले बहुतेक सिनेमे एकाच जातकुळीचे असतात... `पुरुषपट', पुरुषांनी, पुरुषी भूमिकेतून, पुरुष प्रेक्षकांसाठी तयार केलेले सिनेमे. यात खास बायकांसाठी म्हणून बनवलेले रडारडपटही येतात बरं! कारण, बायकांना रडवून गल्ला गोळा करणाऱया असल्या सिनेमांमधल्या स्त्राeप्रतिमाही पुरुषांना सोयीस्कर पद्धतीनंच रंगवलेल्या असतात.
अर्थात दुटप्पी पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आपल्या देशात सिनेमावाल्यांना प्रतिभा वापरून काही वेगळं घडवण्याची गरज नसते. इथली ढोंगी मूल्यं ते इथल्या ढोंगी समाजाला साफसूफ करून विकतात इतकंच.
 `घरवाली बाहरवाली'मध्ये डेव्हिड धवनही तेच करतो. द्विभार्यप्रतिबंधक कायदा असलेल्या देशात दोन बायकांच्या `सुखी' दादल्याची गोष्ट `हलक्याफुलक्या' पद्धतीनं मांडून गाण्याबिण्यांनी सजवून खपवतो. या सिनेमातला नायक अनिल कपूर पाहताना राज कपूरच्या सिनेमातल्या नायिकेची आठवण येते. राज कपूरची नायिका पांढरी साडी लपेटून झऱयाखाली सांगोपांग न्हाताना दिसते तेव्हा तिच्या चेहऱयावर कमालीचे निरागस पवित्र भाव असतात. ती काय बापडी, भोळीभाबडी आंघोळ करतीये. आता अंगावर पाणी पडतंय, पारदर्शक साडीतून तिच्या अंगप्रत्यंगांचं दर्शन प्रेक्षकाला घडतंय, तो हपापून पाहतोय, हा निव्वळ योगायोग. तिच्या चेहऱयावर कधी `तसलं' काही दिसायचं नाही.
  तसाच इथे नायक एक बायको असताना दुसरी करतो. पहिलीला दुसऱया लग्नाची, त्यातून झालेल्या अपत्यप्राप्तीची कल्पनाही देत नाही. दुसरीला पत्नीपदाचा अधिकार देत नाही. स्वत:च्या मुलाला `अनाथ' ठरवून त्याच्यावर अन्याय करतो. पण, सिनेमाची रचना अशी चपखल की, एवढं सगळं करूनही तो गरीब बिच्चाराच. कारण, हे उत्पात घडवते परिस्थिती. बिचारा परिस्थितीपुढे लाचार, असहाय्य. (परमेश्वर करो आणि सर्व पुरुषांना अशी असहाय्यता लाभो.)
या विलक्षण चतुर आणि प्रभावी मांडणीचं श्रेय द्यायला हवं कथाकार के. भाग्यराज (`आखरी रास्ता'चा दिग्दर्शक) आणि पटकथाकार रुमी जाफरी यांना. `अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी' म्हणत रवीना आणि रंभा अशा दोन बायकांशी एकाच वेळी संसार करणाऱया अनिल कपूरची गोष्ट पूर्णपण त्याच्या दृष्टिकोनातून मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. फक्त `अगं अगं म्हशी' ऐवजी `अरे, अरे रेडय़ा' म्हणायला हवं.
 हा रेडा म्हणजे नायकाचा- अरुणचा म्हातारा बाप (कादरखान) अरुण आणि काजल (रवीना टंडन) यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नाही, म्हणून मन रमवण्यासाठी हे गृहस्थ शेजारपाजारची मुलं गोळा करून त्यांची कोडकौतुकं पुरवतात. त्याची लाडाची पद्धत काय, तर मुलांना घरातल्या काचेच्या वस्तू फोडायला द्यायच्या आणि जास्तीत जास्त तोडफोड करणाऱया कारटय़ाला बक्षीस द्यायचं. असल्या नतद्रष्ट म्हाताऱयाकडे शेजारीपाजारी कशाला मुलं पाठवतील?
  मग एकटा पडलेला हा म्हातारा मुलाला सुनेला बोल लावायला लागतो. त्यातून ते दोघे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेतात. डॉक्टर (असरानी) अरुणला सांगतो, की काजलमध्ये दोष आहे, ती कधीच आई बनू शकणार नाही. हे वडिलांना कळलं तर ते आपलं दुसरं लग्न लावून देण्याचा हट्ट धरतील, हे ठाऊक असलेला अरुण काजलवरच्या प्रेमापोटी घरी थाप मारतो. आपल्यामध्येच दोष असल्याचं सांगून खोटे औषधोपचारही सुरू करतो. पण, त्याच्या बेरकी बापाला खरी गोष्ट कळायला वेळ लागत नाही. तो अरुणच्या मागे तरुण पोरींची फौजच्या फौजच पाठवतो. यातली कुणीही पसंत कर, लग्न कर आणि मला नातू (लक्षात घ्या `नातू', नात नाही) दे, असा लकडा लावतो. त्याच्या लेखी मुलगा म्हणजे नातू देणारं यंत्रच.
अरुण आपल्या मिनतवाऱया, धाकटपटशाला बधत नाही म्हटल्यावर तो चक्क आजाराचं नाटक करतो, आत्महत्येच्या धमक्या देऊन अरुणकडून दुसऱया लग्नाचं वचन घेतो. नंतर मित्रासोबत नेपाळमध्ये गेलेल्या अरुणला मनीषा (रंभा) ही नेपाळी मुलगी भेटते. तिचं लग्न होत नसल्यानं तिचा बाप एका वासराचा बळी द्यायला निघालेला असतो. ती त्या वासराला हाकलत असताना गैरसमजुतीनं अरुण ते वासरू उचलतो. पुढे अरुणचा बाळवट मित्र (सतीश कौशिक) वासराचा जीव वाचवण्यासाठी अरुण मनीषाची लग्न करील, अशी तात्पुरती थाप ठोकतो. पण, नेपाळमधले कडक नीतीनियम, आणि खोटं बोलणाऱयाला तिथे मिळणारी कठोर शिक्षा पाहिल्यावर तो अरुणला पूजेच्या बहाण्यानं मंदिरात घेऊन जातो आणि नकळत त्याचं लग्न लावून टाकतो. हे समजल्यावर भडकलेला अरुण मनीषाला आपण विवाहित असल्याचं सांगतो. त्याला मनोमन वरलेली मनीषा त्याच्यावरचं बालंट स्वत:वर घेऊन विधवेचं आयुष्य पत्करण्याची शिक्षा भोगायला तयार होते. तिची त्यागवृत्ती पाहून खजील झालेला अरुण तिचा स्वीकार करतो. या निमित्तानं वडिलांची इच्छा पूर्ण होणार म्हणून हरखतोही.
  पण, मनीषाला नेपाळमध्ये ठेवून भारतात आलेल्या अरुणला बापाचं नवंच रुप दिसून येतं. म्हाताऱयानं आता पुन्हा टोपी फिरवलेली असते. आपली सून किती महान आणि प्रेमळ आहे, याचा साक्षात्कार झालेला म्हातारा अरुणला सांगतो, की मला नातू नको, माझी पहिली सूनच हवी. आता मी कधीही तुझं दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरणार नाही.
  पण, इकडे अरुणनं मनीषाबरोबर `शादीका फर्ज' आधीच पुरा केलेला असल्यानं म्हाताऱयाला नको असला तरी नातू नेपाळात मनीषाच्या उदरात वाढत असतोच. मग मनीषा भारतात येऊन म्हाताऱयासाठी नातू पैदा करते. तिचा जन्मच मुळी त्याग करण्यासाठी झालेला असल्यानं तान्ह्या मुलाला मागे सोडून ती नेपाळला परत जाते. हा मुलगा अनाथ असल्याचं सांगून अरुण स्वत:च त्याला दत्तक घेतो.
 या मुलामधले गुरख्यांचे `गुण', अंगावरच्या जन्मखुणा आणि अरुणच्या संशयास्पद नेपाळवाऱया यांची सांगड घालून उपद्व्यापी आणि रिकामटेकडा म्हातारा या मुलाच्या जन्मरहस्याचा उलगडा करतोच. आणि मग आपल्या वंशाला `दिवा' होणाऱया धाकटय़ा सुनेलाही इथंच आण, असा हट्ट मुलापाशी धरतो. मनीषा घरात मोलकरीण बनून येते. काही घटनांमधून काजलला संशय येऊ लागतो. संशयकल्लोळातून वास्तवाचा स्फोट होतो आणि अखेर दोन्ही बायका एकाच दादल्याबरोबर सुखानं नांदू लागतात.
 कथानक अंमळ विस्तारानं सांगितलं;
कारण त्यातून भाग्यराज- रुमी- डेव्हिड या त्रयीनं अरुणला कसा निष्पाप ठेवलाय, ते अभ्यासण्यासारखं आहे. त्याची कुठलीच चुकीची कृती त्याच्या स्वत:च्या प्रेरणेतून होत नाही. मूल होत नाही, यात त्याचा दोष नाही. दुसरं लग्न होतं ते मित्राच्या चुकीमुळं आणि नादान बापाच्या आग्रहामुळं. पहिल्या पत्नीवर अन्याय होतो तो तिच्याच सुखाखातर. दुसऱया पत्नीवर, मुलावर अन्याय होतो ते प्रथम पत्नीवरील अपार प्रेमापोटी आणि सतत बिचारा तारेवरची कसरत करत सर्वांना सुखी ठेवण्यासाठी झटतोय, झटतोय...
 अरे चोरा! (हे नायक, कथाकार, पटकथाकार आणि दिग्दर्शक या सर्वांना उद्देशून असलेलं संबोधन) बाकी सगळ्या ठिकाणी या नायकाची असहाय्यता कळू शकते. अगदी नकळत दुसरं लग्न लागणंही समजून घेता येतं. पण इतक्या विचित्र स्थितीमध्ये, पहिल्या पत्नीवर अन्याय करीत असल्याची भावना पोखरत असताना अपघातानंच पत्नी बनलेल्या अपरिचित मनीषाबरोबर इतक्या कमी वेळात `शादी का फर्ज' कसा पूर्ण करतो तो! तिच्याशी लगेच शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची तर काहीच गरज नसते. की आगीजवळ लोणी ठेवलं तर पाघळायचंच म्हणून गप्प बसायचं? तसं असेल तर या नायकाच्या सगळ्या कृतींना उदात्ततेचा, असहाय्यतेचा मुलामा देण्याचा `डेव्हिडी प्राणायाम' कशाला केला?
म्हणजे अरुणाचाही दोष नाही, मनिषा तर त्यागमूर्तीच आणि अरुणचा बाप तर साधाभोळा, रांगडा, नातवंडांच्या प्रेमासाठी आचावलेला म्हातारा. मग दोष कुणाचा, तर काजलचा. बाईच्या जन्माला येऊन साधा नातू नाही देऊ शकत? `क्लायमॅक्स'मध्ये अरुणच्या दुसऱया लग्नाची- मुलाची भानगड समजल्यावर संतापलेल्या काजलला गप्प करण्यासाठी हाच मुद्दा वापरलाय.
  भाग्यराज-रुमी-डेव्हिड यांनी हे खास पुरुषी स्खलनशीलतेची भलापण करणारं लॉजिक प्रभावीपणे मांडलंय हे त्यांचं क्रेडिट. सर्व दुटप्पीपणा कळत असूनही प्रेक्षक शेवटच्या काही रिळांमध्ये काजलला `खलनायिका' मानायला लागतो, तिचा काहीच दोष नाही, हे विसरून जातो, हे या त्रयीचं मोठं यश आहे. तसंच या कथानकात खरा खलनायक असलेला अरुणचा हट्टाग्रही बापही मोठय़ा चतुराईनं भाबडा, निरागस बनवलाय. अरुणचं दुसरं लग्न लावायला कारणीभूत ठरणारा मित्र तर सिनेमातलं विनोदी पात्रच. त्यामुळे सगळा दोष परिस्थितीवर ढकलला जातो.
 अर्थात, सुरुवातीलाच म्हटल्यानुसार भाग्यराज- डेव्हिड- रुमी प्रभृतींनी काही समाजजागृतीचा (आणि स्वत:ची दुकानं बंद करण्याचा) वसा घेतलेला नाही. ते इथल्या पुरुष प्रेक्षकांना आणि पुरुषांच्या पद्धतीनं विचार करण्याची गुलामी स्वखुशीनं पत्करलेल्या बायकांना `हलकंफुलकं मनोरंजन' देऊन गल्ला गोळा करण्यासाठी जमले आहेत. एकदा ही विचारसरणी मनात स्पष्ट झाल्यावर ती सिनेमातून पटवून देण्यासाठी, तर्कशुद्ध बनवण्यासाठी ते ज्या- ज्या क्लृप्त्या वापरतात त्यांना दाद द्यायला हवी. डेव्हिडचा सिनेमा असूनही नायिकांचं ओंगळवाणं अंगप्रदर्शन नाही, हीसुद्धा एक जमेची बाजू.
  `एक तरफ है घरवाली', `नेपाल की ठंडी हवाओं में', `तारा रारा रारा रारा' वगैरे अनु मलिकच्या ठेकेबाज संगीतातली सोप्या, सुश्राव्य चालींमधली गाणी (त्यात तीन स्वप्नंगीतचं) पेरून, फार गंभीर वळणं न येण्याची खबरदारी घेऊन, फाफटपसारा टाळून डेडव्हडनं सर्वसामान्य प्रेक्षकाला तीनं तासांचा टाईमपास दिला आहे.
 अनिल कपूरच्या अत्यंत संयत अभिनयानं सिनेमाचा तोल राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. वयोमानपरत्वे व्यक्तित्त्वात आलेली परिपक्वता, अभिनयक्षमता आणि मोना- बोनी- श्रीदेवी प्रकरणातून घरच्या घरी मिळालेलं अनुभवशिक्षण यांचा पुरेपूर वापर करून त्यानं अरुण झकास साकारलाय. पण `जुदाई', `विरासत' आणि आता `घरवाली, बाहरवाली' मधून अनिलचं `दोन बायकांचा दादला साकारण्यात `स्पेशलायझेशन' होण्याचा धोकाही दिसतो.
 रवीना एकाच सुरात बोलते. तरीही तिची काजल सुसह्य आहे. रंभाला फारसे संवादच न देऊन डेव्हिडनं तिच्या बाबतीत तीही अडचण ठेवलेली नाही. ती अभिनयाचा यशाशक्ती प्रयत्न करते; पण तो जाणवण्यासाठी तिच्या चेहऱयावर () नजर ठेवण्याची `प्रॅक्टिस'च करायला लागते.
  हिंदी सिनेमा हा भारतीय संस्कृतीचा समाजजीवनाचा आरसा मानतात. डेव्हिडनं `घरवाली, बाहरवाली'च्या रुपानं जत्रेतल्या आरसेमहालातला विरुपदर्शक आरसा मांडला आहे. इथे आपलंच विरुप प्रतिबिंब पाहून दचकू नका, मोठ्ठय़ानं हसा. साधा सोपा, हलकाफुलका टाईमपास आहे हा! फार गांभीर्यानं घेऊ नका.

(महाराष्ट्र टाइम्स)

`अचानक' कसला? भयानकच!


`अचानक' हा गोविंदाचा सिनेमा असूनही विनोदपट नाही किंवा आचरटपट नाही; गोविंदाला वेगळ्या नायकाच्या भूमिकेत पेश करणारा `सस्पेन्सफुल ऍक्शन थ्रिलर' आहे.
`अचानक' पाहताना प्रेक्षक कायम हतबुद्ध किंवा साध्या भाषेत भांजाळलेल्या अवस्थेत असतो, आता पुढे काय घडणार, असा प्रश्न त्याला सतत पडत असतो.
तुम्ही म्हणाल, वा! `सस्पेन्सफुल ऍक्शन थ्रिलर' पाहताना प्रेक्षकाची अशीच स्थिती व्हायला हवी.  मुद्दा बरोबर आहे. फक्त `अचानक' पाहताना `पुढे काय घडायचं ते एकदा घडून जाऊदे आणि या चरकातून सुटका होऊ दे', अशी भावना निर्माण होते. हे काही `अचानक'चं यश म्हणता येणार नाही.
ना धड रहस्य, ना धड मारामारी, ना धड उत्कंठावर्धक रोमांच, असलं हे विलक्षण बेचव कडबोळं (बि) घडवण्यात सर्वात मोठा वाटा आहे बुजुर्ग पटकथाकार सचिन भौमिक यांचा. काही माणसांना झोपेत चालण्या-बोलण्याची सवय असते. एकेकाळी बऱयापैकी मनोरंजक सिनेमे लिहिलेल्या भौमिकसाहेबांना अलीकडे झोपेत लिहिण्याची सवय जडलेली दिसते. त्यांनी `अचानक' जागेपणी लिहिलाय यावर `अचानक' पाहिलेला माणूस झोपेतदेखील विश्वास ठेवणार नाही.
`अचानक' नाव `अचानक'का, तर नायकावर `अचानक' संकटांची पेचप्रसंगाची मालिका कोसळते म्हणून अरे, पण प्रेक्षकाला काही अचानक घडल्यासारख वाटू द्याल की नाही?
`अचानक'चा नायक अर्जुन नंदा (गोविंदा) हा बडय़ा घराण्यातला धाकटा खुशालचेंडू कुलदीपक. वडील (सईद जाफ्री), मोठा भाऊ (राहुल रॉय), वहिनी (फरहा), पुतण्या अशा सुखी, आनंदी कुटुंबातला `लाडला बेटा' सिमल्यात एका मोटार शर्यतीच्या वेळी त्याची पूजाशी (मनीषा कोईराला) नजरानजर होते. तो तिच्या प्रेमात पडतो. येन केन प्रकारेण तिलाही आपल्या प्रेमात पाडतो. आणि अचानक सिमल्यात या प्रेमी युगुलावर प्राणघातक हल्ला होतो. त्यातून दोघे केवळ सुदैवानेच बचावतात.
नंदा कुटुंबाचा पातळयंत्री वकील सागरच (परेश रावळ) या हल्ल्याचा सूत्रधार असतो. अर्जुन आणि त्याचा भाऊ विजय यांना ठार मारून नंदा मंडळींची सर्व मालमत्ता हडप करण्याचा त्याचा कट असतो. अर्जुन उच्च क्षिणासाठी परदेशात गेलेला असताना विजयचा त्याच्याच पत्नीच्या (फरहाच्या) हातून अपघाती मृत्यू होतो. त्याच वेळी, मुंबईत आलेल्या पूजाला या खुनाचा आरोप स्वत:वर घ्यावा लागतो. परदेशातून परतलेल्या अर्जुनला हा विचित्र प्रकार समजल्यावर तो पूजाला तुरुंगातून पळवून नेतो. इतक्यात त्याच्या वडिलांचाही मृत्यू होतो आणि तो खून असल्याचंही उघडकीला येतं. सागरच या खुनांचा सूत्रधार आहे, हे समजल्यावर अर्जुन आणि पुजा एक नाटक रचतात आणि सागरला रंगेहाथ पकडतात, हे `अचानक'चं कथानक.
 त्यावर पटकथा रचताना भौमिक यांनी अतर्क्यतेची परिसीमा गाठली आहे. मुळात, हा `रहस्यपट' करायचा की `थ्रिलर' याचाच गोंधळ उडालाय. कारण, हा `रहस्यपट' असता, तर खुनी माणसाची ओळख अन्य पात्रांप्रमाणेच प्रेक्षकांपासूनही गुप्त राहायला हवी होती. पण इथे नायकावरच्या पहिल्या हल्ल्यानंतर लगेचच खलनायक स्वत:ची ओळख करून देतो आणि आपल्या भावी कुटिल कारस्थानांचीही वेळोवेळी प्रेक्षकांना माहिती करून देतो.
आणि दिग्दर्शक नरेश मल्होत्रांचीही त्रेधातिरपिट पाहा. नायकावरच्या हल्ल्याची तयारी सुरू झाल्यापासून हल्ला फसेपर्यंत ते खलनायकाला कॅमेऱयाकडे पाठ करायला लावून, अंधारलेल्या चेहऱयाचे अँगल लावून लपवून ठेवतात. आपल्याला वाटतं, आता खलनायक शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहणार बहुतेक! आणि पुढच्याच प्रसंगात परेश रावळ थेट नंदा खानदानाच्या बरबादीचा `ब्लू-प्रिंट'च मांडतो. मग, आदल्या प्रसंगात एवढा आटापिटा करून लपवाछपवी केलीत ती कशाला?
 आणि या खलनायकाची कारस्थानं, तर `भयानक विनोदी' आहेत. विजयचा स्वत:च्या बायकोकडून होणारा खून आणि त्याचा आळ पूजावर जाणे, हा या सिनेमातलाच नव्हे, तर आजतागायतच्या सर्व फसलेल्या, रहस्यपटांमधला सर्वात हास्यास्पद पटकथालेखनाचा नमुना आहे. या खून प्रकरणात कुठेही, ना तपास करणारे पोलिस दिसत ना न्यायालय! इथं नंदा कुटुंबाचे सदस्यच मिळून मधूला वाचवायचा निर्णय घेतात. सिमल्याहून पहिल्यांदाच मुंबईत आलेली पूजा सागरच्या जाळ्यात सापडते आणि कुंटणखान्यातून सुटका करून घेण्यासाठी थेट खुनाचा आरोप पत्करायला तयार होते, हे तर्कबुद्धीला पटत नाही. तेही पटवून घेतलं, तरी विजयचा खून तिनं- एका सर्वस्वी अनोळखी मुलीनं केलाय, हे पोलिसांना- न्यायालयाला कसं पटतं? विजयचा खून करण्यासाठी पूजाकडे काय कारण होतं, याचा तपास कुणी का करत नाही? हे प्रश्न प्रेक्षकांना पडूच नयेत, अशी भौमिक- मल्होत्रांची अपेक्षा दिसते. कारण, यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर न देता ते तिला थेट खुनाबद्दलची शिक्षा भोगायला तुरुंगात पाठवतात.
अर्जुनच्या वहिनीचे संशयास्पद वर्तन आणि त्याचा शेवटी होणारा उलगडा यातच `अचानक' मधलं माफक रहस्य आणि थोडाफार धक्का आहे. पण, पटकथेच्या झोपाळू मांडळीमुळे चाणाक्ष प्रेक्षकांना मधूच्या वर्तनाबद्दल अंदाज येतोच आणि ज्यांना तो येत नाही ते तोवर एकूणच सिनेमाबद्दल बेफिकिरीच्या अवस्थेला पोहोचलेले असतात.
 नायक- नायिका पोलिसांच्या गोळयांना बळी पडलेले दाखवताना प्रेक्षकांना आपण काय हुशारीनं गंडवतोय, असा पटकथाकार- दिग्दर्शकाचा अविर्भाव आहे. पण, हिंदी सिनेमात नायक- नायिका (प्रेमपट वगळता) कधी मरत नसतात, हे साधं गणित न समजण्याइतका प्रेक्षक दुधखुळा आहे काय? नायक-नायिकेचं नाटक आणि सिनेमाचा ताणताण ताणलेला कळसाध्याय (क्लायमॅक्स) या प्रसंगातच उघड होतो.
 पूजाला गटवण्यासाठी अर्जुननं उधारीवर कुत्रा घेऊन तिच्या (जनावरांच्या) दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आणि जॉनी लिव्हरची तिळ्या भावांच्या भूमिकेतली धमाल अदाकारी वगळता `अचानक'मध्ये पाहण्यासारखं काहीही नाही. त्यात `ये दिल्लगी'कार नरेश मल्होत्रांचा सिनेमा भरमार आहेच. `एक सोणी कुडी दिला दे', `जाने जाना', `दिल ले के गया चोर' ही उडत्या ठेक्याची गाणी सिनेमाच्या प्रेममय `चित्रहार' सदृश पूर्वार्धात धडाधड येऊन जातात. पुढे कथानकाच्या थ्रिलर भागात मल्होत्रा अक्षरश: गाणी `घुसवतात.' तुरुंगात खितपत पडलेल्या पूजाला अर्जुन जिवावर उदार होऊन सोडवतो. मागे पोलिसांचा ससेमिरा, विदेशात घेऊन जाणारी बोट गाठण्याचं मनावर दडपण अशा स्थितीतल्या धावपळीतही एके ठिकाणी पूजा घसरून पाण्यात पडते. ओलेती होते. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि वेळात वेळ काढून `दुनिया भुला के' हे स्वप्नगीत सुरू!
 `अचानक'मध्ये गोविंदा आपल्या वाटय़ाच्या सर्व प्रसंगांमध्ये समरस होऊन अनिनय करण्याचा प्रयत्न करतो. पण, एकूण सिनेमातच सुसंगती नसल्यानं त्याचा प्रयत्न थिटा पडतो. मनिषा काही सिनेमे अभिनय करण्यासाठी. हा तिच्या दुसऱया `कॅटेगरी'तला सिनेमा आहे. राहुल रॉयने हल्ली व्यवस्थित कटिंग करायला सुरूवात केली आहे. त्याची झुलपं हटल्यानं हल्ली पूर्ण चेहरा दिसू लागलाय. त्यावर पुढेमागे भावही उमटतील कदाचित. परेश रावळ, फरहा सफाईदारपणे वावरतात. सईद जाफ्रींनी मात्र अनाहूतपणे जॉनी लिव्हरला विनोदी अभिनयात मात दिली आहे. अर्जुन-पूजा पळून आल्यावरच्या गंभीर प्रसंगामध्ये पोलिस आले म्हटल्यावर हे गृहस्थ चिरक्या तारस्वरात रेकत आणि कमालीचे हास्यास्पद हातवारे करीत जो काही भयाण अभिनयानुभव देतात, तो पाहून हसूनहसून मुरकुंडी वळते.
आपल्या साध्या, सरळ आयुष्यात अचानक काहीही, कसंही घडू शकतं, हे `अचानक' कथासूत्र लक्षात ठेवा.
 कोण जाणे! उद्या कदाचित कुणी खलनायक `अचानक' तुमच्यापुढे उभा ठाकून `अचानक'ची टिकिट देऊ करेल... तुम्हाला `अचानक' पाहण्याचा मोहही पडेल... तेव्हा आत्ताच सावध व्हा... जागे राहा.

(महाराष्ट्र टाइम्स)

Wednesday, April 27, 2011

यशस्वी फॉर्म्युल्याला रहस्याची फोडणी (खतरनाक-मराठी)


महेश कोठारे- लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीच्या `थरथराट', `झपाटलेला', `धडाकेबाज', `दे दणादण' या हिट सिनेमांमुळे त्यांच्या `ऍक्शन कॉमेडी'कडून प्रेक्षकांच्या काही खास अपेक्षा असतात. कारण, या जोडीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. लक्ष्या आणि महेश या नावांनीच ते सिनेमात वावरतात. एकमेकांचे मित्र असतात. लक्ष्या हा वेंधळा, बेरकीपणा करण्याच्या प्रयत्नात नेहमी फसणारा, भाबडा `चालू' इसम असतो; तर महेश दिलेर, जिगरबाज, हिंमतवान मर्दमराठा (बहुतेक वेळा इन्स्पेक्टर.) लक्ष्यानं घोळ घालायचे, महेशनं ते निस्तरायचे, हा यांचा पूर्णवेळ उद्योग, आणि त्यांच्या या उचापत्यांमधून कधीतरी एखादा खरतनाक गुन्हेगार किंवा टोळीच त्यांच्याकडून जेरबंद होते, हा या `महेश-लक्ष्या'पटांचा साचा आहे.
या हमखास यशस्वी फॉर्म्युलाला रहस्य आणि थराराची झकास फोडणी देणारा `खतरनाक' या जोडीकडूनच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो आणि वर अनपेक्षित असा बोनसही देतो.
`खतरनाक'मध्ये एक खतरनाक गुन्हेगार दर अमावस्येला गावातल्या एका उद्योगपतीचा बळी घेतो. स्वत:ला चलाख समजणारा पण प्रत्यक्षात बावळट, घाबरट असलेला इन्स्पेक्टर प्रताप तुंगारे (जॉनी लिव्हर) याच्या डोक्याला उगाच खुराक सुरू होतो. याच गावातला वकील पोटभरे (सदाशिव अमरापूरकर) हा तुंगारेनं पकडलेल्या गुन्हेगारांना वकिली युक्तिवादानं निर्देष सोडवण्यात पटाईत. त्यामुळे दोघांत कायम छत्तीसचा आकडा.
याच गावातला खळचट तरूण लक्ष्मीकांत लोखंडे (अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे) हा आपल्या रंगा (भरत जाधव) या सहकाऱयाच्या साथीनं `तिरळा डोळा' गुप्तहेर एजन्सी चालवतो. ती चालवताना घातलेल्या घोळांमधून सतत तुंगारेच्या हाती गुन्हेगार म्हणून सापडत राहतो.
दरम्यान, गावात हलकल्लोळ उडविणाऱया गूढ खुनांच्या तपासासाठी इन्स्पेक्टर महेश चौधरी (अर्थात महेश कोठारे) गावात येऊन दाखल होतो. पण, तो गावात आल्यानंतर गावातले सर्वात श्रीमंत उद्योगपती रावसाहेब निंबाळकर (शरद भथाडिया) यांचा खून होतोच.
रावसाहेबांचा शोकसंतप्त भाऊ (अविनाश नारकर) खुन्याची माहिती देणाऱयाला दोन लाखांचं बक्षीस जाहीर करतो. हे बक्षीस मिळवण्यासाठी लक्ष्या- रंगा मिळून
(अर्थातच पुढे अंगलट येणारी) एक युक्ती लढवतात...
लक्ष्या पुढे कसा लटकतो, असा सुटतो, रहस्य कसं उलगडतं वगैरे परिचित पण इंटरेस्टिंग कथाभाग इथे सांगण्याची गरज नाही.
 कथा-पटकथा- संवादकार शिवराज गोर्ले यांनी महेश- लक्ष्यापटांच्या मूळ फॉर्म्युलाला मोठा धक्का न लावता काही नवे घटक त्यात चपखलपणे मिसळले आहेत. `ऍक्शन कॉमेडी'ला उपयुक्त थरार या त्रिकुटाच्या आधीच्या सिनेमांमध्ये होताच. `खतरनाक'मध्ये त्यात रहस्याची भर पडली आहे. संशयाचा काटा याच्या- त्याच्यावर फिरवत ठेवायचा, हळूहळू कुणावर तरी रोखायचा आणि क्लायमॅक्सला भलताच खुनी पेश करायचा, ही रूढ पद्धत त्यांनी यशस्वीपणे वापरली आहे. शिवाय क्लायमॅक्सला डबल रहस्योद्घाटनाचा बोनस आहे.
 असाच बोनस त्यांनी दिला आहे तो महेश- लक्ष्याऐवजी प्रताप तुंगारेवर- म्हणजे जॉनी लिव्हरवर मुख्य फोकस ठेवून. महेश कोठारेच्या सिनेमाचे हुकमी प्रेक्षक आता या जोडगोळीच्या अदाकारीशी, रसायनाशी अतिपरिचित झाले आहेत. त्यांना केंद्रस्थानी ठेवलं तर ` अतिपरिचयात अवज्ञा' घडू शकते, याचं भान ठेवून त्यांनी प्रताप, खुनाच्या घटना, पोटभरे वकील आणि प्रत्येक खुनाच्या बळीकडे `योगायोगानं' कामाला असलेल्या भिकोबा (रवींद्र बेर्डे) या गडय़ाला आवश्यक फुटेज दिलं आहे. त्यासाठी एकेकाळचा अविभाज्य घटक असलेल्या पॅरडी साँगला कात्री लावण्याचं आणि महेश-लक्ष्याची प्रेमप्रकरणं आटोक्यात ठेवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. ते सिनेमाच्या पथ्यावर पडलं आहे.
 फार डोकेफोड करून पाहिला तर या सिनेमात, कथानकात काही तार्किक प्रश्न पडू शकतात. पण, हा एक करमणुकीचा खेळ आहे, याचं भान ठेवून (म्हणजे खरंतर भान विसरून) तो पाहिला, तर पटकथेचा वेग प्रेक्षकाला आपसूक खेचत घेऊन जातो.
दिग्दर्शक महेश कोठारे यांनी तांत्रिक हुकुमत पणाला लावून खुनांचं गूढ आणि थरार यांचा उत्तम मेळ राखलाय. बाकीचा कथाभाग सफाईदार हाताळणीनं प्रेक्षणीय केलाय. हिंदीच्या तोडीची चकचकीत निर्मितीमूल्यं, त्यांना न्याय देणारं- खास व्यावसायिक गुणवत्तेचं समीर आठल्ये यांचं छायालेखन आणि पटकथेचा वेग नेमकेपणानं पकडणारं संजय दाबके यांचं संकलन या तांत्रिक बाजूंनी `खतरनाक'ला आवश्यक `पॉलिश्ड' रूपडं दिलं आहे. खुनाचे प्रसंग आणि क्लायमॅक्सची पळापळी- पकडापकडी- हाणामारी यात दिग्दर्शक झ्र छायालेखक- संकलक यांची समतोल कामगिरी मजा आणते. सिनेमास्कोपच्या भव्य पडद्याच्या योग्य वापरामुळे ही मजा द्विगुणित होते.
 हिंदी स्टायलीतल्या `हाँटिंग' चालीच्या `शीर्षकगीतानंही रहस्य गहिरं करायला मदत केली आहे. राम- लक्ष्मण यांच्या संगीतातील अन्य गाणी ठेकेबाज आणि थिएटरात ऐकणीय- बघणीय श्रेणीची. मात्र, लोकप्रिय लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांना बेढब वेशभूषेत उगाच उत्तान हावभाव करायला लावणारं `कासार दादा सांगू कितीदा' हे द्वयर्थी ग्राम्य गीत दादा कोंडकेंची आठवण करून देतं. (कारण, ते दादांनीच आपल्या आगामी सिनेमासाठी निवडलेलं गाणं आहे. ही महेश कोठारेंची दादांना श्रद्धांजली की काय?)
 कलावंतांमध्ये महेश- लक्ष्या सराईत कामगिरी करून जातात. नूतन आणि आरती या त्यांच्या नवोदित नायिका मात्र बेतास बात. त्यांना मोठा वावही नाही. संशयाच्या सुईचं टोक खेचून घेण्याचं काम सदाशिव अमरापूरकर चोख बजावतात. डोळे वटारून मालकाकडे पाहणारा रवींद्र बेर्डेचा भिकोबा, लक्ष्याच्या वावटळीत टिकून राहणारा भरत जाधव, दादासाहेब निंबाळकराची दुहेरी तगमग साकारणारा अविनाश नारकर आणि साक्षात जॉनी लिव्हरच्या बरोबर राहूनही लक्ष वेधून घेणारा महेश कोकाटे (हवालदार मोरे) ही मंडळी विशेष उल्लेखास पात्र आहेत. प्रमोद पवारांचा संतप्त पत्रकारही पटकथेतल्या जबाबदाऱया हुशारीनं पेलतो.
 पण, अर्थातच `खतरनाक' चा हुकमाचा एक्क आहे ते या सिनेमातून प्रमुख भूमिकेत मराठीत पदार्पण करणारा जॉनी लिव्हर. त्याचा सर्वपरिचित लवचिक आत्रंगपणा इथे धमाल उडवून देतो. शिवाय, त्याचं डबिंग त्यानं स्वत:च केलं आहे. मराठी शब्दांच्या सहजोच्चारांमुळे पहिल्या काही प्रसंगांनंतर त्याला मराठी माणूस म्हणून स्वीकारता येतं. त्याच्या प्रकृतीला वाव देणारी आणि उत्स्फूर्त भर घालायला प्रोत्साहक भूमिका असल्यानं तो छानपैकी सुटलाय.
क्वचित किरकोळ रेंगाळणारा फुटकळ कथाभाग वगळता `महेश-लक्ष्या'पटांच्या प्रेक्षकांनी अगदी डोळे झाकून `खतरनाक'ला हजेरी लावावी. इतरांनी हे रसायन समजून घेण्यासाठी थिएटरची वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

Tuesday, April 26, 2011

त्रिगुणांचे त्रैराशिक (माणूस-नवा)


`माणूस' पाहताना चटकन विश्वास बसत नाही की, आपण मराठी सिनेमा पाहतो आहोत.
कारण मराठी सिनेमा असूनही इथे पार्श्वध्वनींचा कल्पक वापर समजतो आणि क्वचित नि:शब्द, नीरव शांतताही जाणवते. पार्श्वसंगीताच्या ढणढणाटात प्रसंग हरवत नाहीत.
लक्ष्मीकांत बेर्डे नायक असूनही पेटंट `लक्ष्याछाप अदा' दिसत नाहीत.
बटबटीत नाटय़मयतेला वाव देणारी कथा असूनही पटकथा-संवादांनी सिनेमा संयत, सहज लयीचा केला आहे.
बोधकथेचा (अंगभूत?) भाबडेपणा `माणूस'मध्ये आहेच; पण हाडामासांच्या माणसांची ही गोष्ट सांघिक प्रयत्नांतल्या प्रामाणिकपणाच्या बळावर उठून दिसते. काही काळ मनात रेंगाळते.
`प्रभात'च्या `माणूस'शी तुलना करण्याचा मोह आवरला, तर कोणताही आविर्भाव न आणता उलगडणारा एक सच्चा सिनेमा पाहिल्याचा अनुभव ए. राधास्वामी लिखित- दिग्दर्शित नवा `माणूस' ही देतो. राधास्वामी यांनी माणसांमधल्या सत्व, रज आणि तम या त्रिगुणांवर `माणूस'ची बोधकथा बेतली आहे. इथे एकेका गुणाचं प्रतिनिधीत्व एकेक व्यक्तिरेखा करते. सत्वगुणी सखाराम (लक्ष्मीकांत बेर्डे) हा अर्थातच नायक, एका खेडय़ात छोटा ढाबा चालवणारा परोपकारी, सरळमार्गी माणूस, एकदा पुण्यातला एक नामांकित वकील- रजोगुणी प्रभाकर करभरकर (रवींद्र मंकणी) रस्त्यात गाडी नादुरुस्त झाल्यामुळे सखारामच्या ढाब्यावर येतो. पत्नी पल्लवी (निशिगंधा वाड) हिला रात्रीच्या मुक्कामाला ढाब्यावर सोडून गाडी दुरूस्त करायला जातो. सखाराम पल्लवीला स्वत:च्या खोलीत झोपायला जागा देऊन स्वत: बाहेर झोपतो. रात्री तिच्या अंगावर पांघरूण टाकतो.
सखारामच्या माणुसकीमुळे भारावून, पुण्याला येणं झालं तर आपल्याकडे येण्याचं आमंत्रण सखारामला देऊन, प्रभाकर-पल्लवी सकाळी पुढच्या प्रवासाला निघतात.
पुढे सखारामचं गावातल्या प्रेमिकेशी- शांताशी (अर्चना नेवरेकर) लग्न होतं. तिच्या येण्यानं धंद्याला बरकत येते, संसार फुलू लागतो, तिला दिवस जातात. एक दिवस सखारामचा सहकारी नाम्या (जयवंत वाडकर) झाडावरून पडून जखमी होतो. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. भर रात्री भर पावसात त्याच्यासाठी औषधं न्यायला सखाराम निघालेला असतानाच प्रभाकर त्याच्या ढाब्यावर आश्रयाला येतो. सखारामच्या अनुपस्थितीत आत खोलीत शांत झोपलेल्या शांताला पाहून प्रभाकरची वासना चेतते. ती अनावर होऊन तो तिच्यावर बलात्कार करतो.
सकाळी घरी परतल्यावर सखारामला शांताचं कलेवरच पाहायला मिळतं; कारण बलात्काराचा कलंक सहन न होऊन तिनं आत्महत्या केलेली असते.
घरात बिछान्याजवळ पडलेल्या सिगरेटच्या थोटकांमुळे सखारामला शांतावर कुणी बलात्कार केला हे समजून जातं. शांताच्या मृत्यूनं सैरभैर झालेला सखाराम प्रभाकारला ठार मारून सूड घेण्यासाठी तिरमिरीनं पुण्याला जातो. तिथे प्रभाकरच्या घरी, त्याच्या अनुपस्थितीत पल्लवी आणि तिची मुलगी निकिता (स्वरांगी मराठे) सखारामला नकळत आधार देतात. लळा लावतात. त्यांच्या घरात सामावून घेतात. प्रभाकर परतल्यावर त्याला ठार मारू, असा विचार करून सखाराम तिथेच राहतो, स्वेच्छेनं स्वयंपाकाची जबाबदारी उचलतो. मात्र प्रभाकर परतल्यानंतरही सखाराम त्याला मारू शकत नाही. आधी परिस्थिती आणि मग सात्विक, विचारी वृत्ती त्याच्या निर्धाराला दुबळं बनवत जाते.
प्रभाकरही सखारामला आपल्या घरात पाहून चमकतो; नंतर त्याच्या हेतूचा अदमास लागल्यावर वरमतो. मग आतल्या आत तडफडू लागतो. आधी सखाराम आपल्याला ठार मारेल, ही भीती त्याला खात राहते. पण, सखाराम तसं काहीच न करता, सतत मूकपणे आक्रंदत समोर वावरत राहतो, तेव्हा प्रभाकर पश्चातापाच्या आगीत पोळू लागतो.
इथे कथानकात तमोगुणाचं आगमन होतं चंद्रकांत पाटील (उदय टिकेकर) या बेगुमान उद्योगपतीच्या रूपानं. एका बलात्काराच्या खटल्यातून- चंद्रकांतनं बलात्कार केलेला असूनही- प्रभाकर त्याला सहीसलामत निर्दोष सोडवतो. अशा लांडग्याला प्रभाकर एकदा आपल्या घरी मुक्कामाला बोलावतो... पुढे...
... पुढे काय होत असेल, याची कल्पना `चांदोबा' वाचणाऱया कोणत्याही प्रेक्षकाला येऊ शकेल. फ्लॅशबॅकमध्ये उलगडणाऱया या सिनेमाच्या प्रारंभी जन्मठेपेची सजा भोगून सुटलेला म्हातारा सखाराम दिसतो, हा `क्लू' दिला, तर पुढची कथा सांगायची गरज उरत नाही. कथा- पटकथाकार ए. राधास्वामी यांनी सिनेमाची सरळ सोपी मांडणी केली आहे. अडलेल्या तमासगिरीणीला परोपकाराच्या भावनेतून ढोलकीची साथ करणारा सखाराम, त्याचं आणि शांताचं प्रेमप्रकरण आणि लग्न, `पेंद्या'सदृश नाम्या या पटकथेतल्या युगतींच्या माध्यमातून त्यांनी लावणी, विनोद, श्रृंगार, कौटुंबिक नाटय़, प्रेमगीत आदी `लोकप्रिय' घटक चपखलपणे पेरले आहेत. त्यांच्या अटोपशीर- नेमक्या प्रसंगरचनेला प्रताप गंगावणे यांच्या ग्रामीण बोलीतील साध्या, रांगडय़ा, मार्मिक दृष्टांत देणाऱया संवादांची योग्य साथ मिळाली आहे. त्यामुळे हा कथाभाग पसरट होत नाही. वाहावत जात नाही. `भल्या सखारामच्या वैराण आयुष्यात हिरवळ आली न आली तोच...' या मूळ कथानकातल्या बेतशीर जागेतच हा कथाभाग नेमका बसला आहे.
शांतावरचा बलात्कार, सखारामचं सूडानं पेटणं, इथपासून ते चंद्रकांत पाटलाच्या नीचपणाला सखारामनं दिलेल्या शिक्षेपर्यंतचा पूढचा संपूर्ण कथाभाग निसरडा आहे. कारण त्यात अतिनाटय़मयतेच्या सर्व संधी ठासून भरल्या आहेत. मात्र हा अत्यंत नियंत्रित, (low key) प्रसंगांमधूनच उलगडतो, हेही पटकथाकार- संवादकारांचं यश आहे. पटकथाकार- संवादकार व्यक्तिरेखांच्या मनाचे तळ ढवळत नाहीत, कारण तो या सिनेमाचा `फोकस' नाही. त्यांना तीन वृत्तींचं प्रातिनिधिक दर्शन घडविणाऱया प्रमुख व्यक्तिरेखांच्या ढोबळ आरेखनांमधूनच बोधकथा दाखवायची आहे. ते काम त्यांनी चोख केलं आहे.
अर्थात, या ढोबळ मांडणीमुळे या कथानकात काही प्रश्नही पडत जातात; पण त्यापैकी एक सोडून, बाकी सगळे या प्रकारच्या मांडणीत अपरिहार्य अशी `सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणून सोडून द्यावे लागतात. असा सोडता न येणारा मुद्दा एकच पण महत्त्वाचा. प्रभाकर पल्लवीला सखारामच्या ढाब्यावर रात्री एकटीला सोडून जातो; तेव्हा ती फारच सहजपणे परक्या घरात, एका परपुरुषाच्या उपस्थितीत राहायला, खोलीत जाऊन झोपायला तयार होते. शिवाय निर्घोर झोपताना दाराला आतून कडीसुद्धा लावत नाही. बलात्काराच्या रात्री शांताही नेमकं असंच वागते. हा प्रकार तर्काला न पटणारा आहे आणि त्यात कथाभाग `घडविण्या'तली पटकथाकाराची असहाय्यता दिसते.
दिग्दर्शक म्हणून राधास्वामींनी लक्ष्मीकांत बेर्डेला गंभीर भूमिकेत निवडण्याचं धाडस दाखवलंय आणि त्याच्याकडून नियंत्रित पण प्रभावी कामगिरी करवून घेतली आहे. वेगळ्या वाटेच्या सिनेमांना सर्वात मोठा धोका त्यांच्या दिग्दर्शकांकडूनच असतो. कारण त्यांना अशा सिनेमात, प्रत्येक फ्रेममध्ये `दिसण्या'चा फार सोस असतो. खास दिग्दर्शिकाचे `टचेस' देण्याच्या हौशीपायी ते सहसा सगळा सिनेमा चिवडून ठेवतात. सुदैवानं राधास्वामी यांना या रोगाची लागण झालेली दिसतं नाही. शंकर बर्धन यांचं छायालेखन, शरद पोळ यांची कला, अनिल मोहिले यांचं संगीत आणि दिग्दर्शक राधास्वामी यांनीच केलेलं ध्वनीमुद्रण या तांत्रिक बाजूही आशयावर स्वार न होता आपापली कामगिरी नेमकेपणाने पार पाडतात. या गुणाची झलक सुबल सरकार यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या, टिपिकल स्वप्नगीत पद्धतीच्या, प्रेमगीतातही दिसतात, इथे नायक- नायिका नाचतात. पण तो `नृत्यदिग्दर्शित' नाच वाटत नाही. ते सहजस्फूर्त नृत्य वाटतं.
 लक्ष्मीकांत बेर्डेच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये सखारामचा सहज समावेश होईल. तो सखारामच्या सात्विक वृत्तीशी समरस झालेला दिसतो. त्यामुळे सुरूवातीच्या नर्मविनोदी प्रसंगांमध्येही त्याचा उत्स्फूतं हजरजबाबीपणा वगळता बाकीचे लोकप्रिय `गुणविशेष' झळकत नाहीत. रूढ इमेजच्या पलीकडची, संपूर्णपणे विरुद्ध स्वभावरचनेची ही भूमिका त्यानं जीव ओतून केली आहे, तिला न्याय दिला आहे. रवींद्र मंकणी आणि उदय टिकेकर यांनीही आपापली चपखल निवड सार्थ ठरवली आहे. बलात्कारासारखं घृणित कृत्य करणारा, भ्याडपणे थंड राहणारा, पुढे निर्लज्जपणे एका बलात्काऱयाला सजेपासून वाचवणारा प्रभाकर हा रवींद्र मंकणींनी दाखविलेल्या त्याच्या भावछटांमुळे खलनायक होत नही. स्खलनशील, कमअस्सल- पण माणूसच वाटत राहतो. उदय टिकेकरही चालीबोलीतून चंद्रकांत पाटलाचा जनावरी मस्तवालपणा जिवंत करतात. या त्रिगुणांना निशिगंधा वाडनं स्निग्ध, स्नेहाळ साथ दिली आहे. छोटय़ाशा भूमिकेत चटका लावून जाण्याची जबाबदारी अर्चना नेवरेकर सहजपणे पार पाडते. जयवंत वाडकरचा नाम्याही अगदी झकास, `आभाळमाया'ची `चिंगी' स्वरांगी मराठे हिला टिपिकल बालकलाकारांच्या साच्यातली भूमिका मिळाली आहे. तिचा चुणचुणीतपणा जाणवतो.
जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं, सोप्या शब्दांत थीम मांडणारं `माणूस कसा' हे शीर्षकगीत अनिल मोहिलेंच्या सुरेल चालीमुळे लक्षात राहतं. सिनेमात ते तुकडय़ातुकडय़ात पेरलेलं आहे.
 `मराठी सिनेमात आता घडवतोच क्रांती असल्या आक्रस्ताळ्या अभिनिवेशापासून मुक्त असलेला हा साधा- भाबडा पण अतिशय प्रामाणिक, सिनेमा भलत्या क्रांतिकारक अपेक्षा न ठेवता पाहिला तर मनाला भावून जाईल.

(महाराष्ट्र टाइम्स)